खूपच आक्रमक आणि… त्याला विचारण्याचा प्रयत्न केला! अजिंक्य रहाणेने विराटबाबत नेमकं काय सांगितलं?
अजिंक्य रहाणेने नुकतंच क्रिकेटच्या सर्व फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. अजिंक्य रहाणेचा पुढचा प्लान काय असेल? याबाबत काहीच माहिती नाही. असं असताना त्याने संघातील काही गुपितं मात्र उघड केली आहे.

भारताचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे याने क्रिकेटला नुकताच रामराम ठोकला आहे. आंतरराष्ट्रीय, देशांतर्गत आणि व्यावसायिक क्रिकेटही खेळणार नसल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे अजिंक्य रहाणे पुढे कोणत्या भूमिकेत दिसेल मात्र सांगणं कठीण आहे. असं असताना अजिंक्य रहाणे याने निवृत्तीनंतर एक मुलाखत प्रसिद्धीस आली आहे. या मुलाखतीत त्याने अनेक पैलूंवर प्रकाशझोत टाकला आहे. इतकंच क्रिकेटमधील काही जुन्या आठवणींना उजाळाही दिला आहे. यावेळी त्याने क्रिकेटमधील काही गुपित उघड केली. विराट कोहलीसोबतचं त्याचं नातं आणि त्या काळाबाबत त्याने बरंच काही सांगितलं. विराट कोहलीचा स्वभाव आणि त्याच्यासोबत फलंदाजी करताना काय अनुभव आला? याबाबतही मुलाखतीत सांगितलं. इतकंच काय तर एका गोष्टीसाठी अजिंक्य रहाणे विराट कोहलीच्या मागे लागला होता, पण त्याने ते गुपित कायम ठेवलं. त्याचा सुगावा त्याने कधी लागू दिला नाही, असं अजिंक्य रहाणे म्हणाला.
काय आहे विराट कोहलीचं गुपित?
व्हाईट बॉल क्रिकेट सामन्यात धावांचा पाठलाग करताना विराट कोहलीबाबत अजिंक्य रहाणे मुलाखतीत म्हणाला की, ‘हे त्याचं मन आणि त्याच्या मनातले हिशोब आहेत. पण ते त्याचं गुपित आहे. मी त्याला अनेकदा विचारण्याचा प्रयत्न केला, पण तो काही सांगत नाही. तो तुम्हाला कोणताही सुगावा देl नाही. योग्य वेळी विचारपूर्वक जोखीम घेण्याची त्याची क्षमता हीच गुरुकिल्ली आहे. एमएस धोनीसुद्धा तसाच होता. पण विराटच्या डोक्यातील हिशोब काही वेगळाच होता.’ अजिंक्य रहाणे याने रवी शास्त्री आणि विराट कोहलीची स्तुतीही केली. अजिंक्य म्हणाला, ‘विराट कोहली आणि रवी शास्त्री यांनी भारतीय क्रिकेटला विशेषतः परदेशातील कसोटी सामन्यांमध्ये अधिक कणखर बनवले.आम्ही बचावात्मक राहण्याऐवजी अधिक आक्रमक, धाडसी आणि नेहमीच पुढाकार घेणारे बनलो.’
विराटसोबत फलंदाजीबाबत रहाणे काय म्हणाला?
अजिंक्य रहाणेने त्याच्या सोबतच्या भागीदारीवर मन मोकळेपणाने व्यक्त झाला. अजिंक्य रहाणे म्हणाला की, ‘त्याचा आक्रमक स्वभाव आणि माझा शांत स्वभाव यामुळे आम्ही एकमेकांना खूप चांगल्या प्रकारे पूरक ठरलो. आमच्या यशस्वी भागीदारींमागे सकारात्मक आणि स्पष्ट संवाद हे कारण होते. ऑस्ट्रेलियाविरुद्ध आमच्या अनेक चांगल्या भागीदारी झाल्या. त्यामध्ये, जेव्हा कधी विराट एखाद्या विशिष्ट गोलंदाजाविरुद्ध खेळण्याचा विचार करायचा आणि जर माझा प्रतिसाद सकारात्मक असेल, तर तो ते अधिक चांगल्या प्रकारे करायचा.’
..म्हणून विराटला टीका करणारे लोकं आवडायचे
अजिंक्य रहाणे म्हणाला की, ‘विराटला त्याच्यावर टीका करणारे लोक नेहमी आवडायचे. तो मला विचारायचा की विरोधी खेळाडूला परत स्लेजिंग करायचं का? मी त्याला म्हणायचो, ‘हो, नक्की कर’, कारण त्याच्यासाठी तेच उपयोगी पडायचं. आमची मैत्री खूप छान होती आणि आम्ही मैदानाबाहेरही खूप वेळ एकत्र घालवायचो. आम्ही क्रिकेटबद्दल खूप बोलायचो, जे आजकाल बघायला मिळत नाही. तो नेहमी सकारात्मक असायचा आणि मला सांगायचा की गोलंदाजावर हल्ला करायला कधीही संकोच करू नकोस.’
