T20 World Cup 2021: न्यूझीलंडने अफगाणिस्तानला हरवलं तर टीम इंडियाचं काय होणार? रवींद्र जाडेजा म्हणतो…

| Updated on: Nov 06, 2021 | 10:52 AM

टी-20 विश्वचषक 2021 (T20 World Cup 2021) मधील उपांत्य फेरीच्या तिकिटासाठी, टीम इंडियाच्या हातात सध्या जे काही होतं ते त्यांनी केलं आहे. पण, आता अफगाणिस्तान संघ न्यूझीलंडचा पराभव करेल तेव्हाच पुढील वाटचाल यशस्वी होईल.

T20 World Cup 2021: न्यूझीलंडने अफगाणिस्तानला हरवलं तर टीम इंडियाचं काय होणार? रवींद्र जाडेजा म्हणतो...
Ravindra jadeja
Follow us on

मुंबई : टी-20 विश्वचषक 2021 (T20 World Cup 2021) मधील उपांत्य फेरीच्या तिकिटासाठी, टीम इंडियाच्या हातात सध्या जे काही होतं ते त्यांनी केलं आहे. पण, आता अफगाणिस्तान संघ न्यूझीलंडचा पराभव करेल तेव्हाच पुढील वाटचाल यशस्वी होईल. न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना 7 नोव्हेंबरला होणार आहे. भारताच्या हितासाठी या सामन्यात अफगाणिस्तानला विजय मिळवणे आवश्यक आहे. पण, हे शक्य नसेल तर समीकरण काय असेल? यावर स्कॉटलंडवर विजयाचा हिरो ठरलेल्या रवींद्र जडेजाने मजेशीर उत्तर दिले आहे. (What if New Zealand beat Afghanistan?, Ravindra Jadeja epic reply, watch video)

रवींद्र जाडेजाने स्कॉटलंडविरुद्ध भारताच्या 8 विकेट्स राखून मिळवलेल्या मोठ्या विजयात मोठा वाटा उचलला आहे, त्याने 4 षटकांत 15 धावांत 3 बळी घेतले. त्याच्या या कामगिरीमुळे त्याने टीम इंडियासाठी गेम सेट करण्याचे काम केले. यामुळेच भारताने केवळ विजयाची नोंद केली नाही तर घसरलेला नेट रननेटदेखील सुधारला आहे. जडेजाला त्याच्या दमदार कामगिरीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

न्यूझीलंडने अफगाणिस्तानला हरवले तर?

अशा परिस्थितीत जडेजा सामना संपल्यानंतर पत्रकार परिषदेसाठी आला तेव्हा त्याला विचारण्यात आले की, अफगाणिस्तानच्या संघाने न्यूझीलंडला हरवले, तर ठीक आहे. पण जर अफगाणिस्तान न्यूझीलंडला हरवू शकला नाही तर काय समीकरण असेल. यावर जडेजा म्हणाला, “मग काय होईल, बॅगा पॅक करायच्या आणि सरळ घरी जायाचं.” असे म्हणून तो हसू लागला, त्यात उपस्थित पत्रकारही सहभागी झाले.

असे खेळलो तर आम्हाला हरवणे कठीण : जडेजा

जाडेजा पुढे म्हणाला, “आम्ही फक्त चांगले क्रिकेट खेळू पाहत आहोत. मोठ्या फरकाने जिंकणे आमच्यासाठी किती महत्त्वाचे आहे हे सर्वांनाच माहीत होते. यासाठी आम्ही सर्वजण आपापल्या परीने सर्वोत्तम देत आहोत. संपूर्ण संघ मैदानावर 100 टक्के देत होता. आम्ही सर्व आनंदी आहोत. आता फक्त एकच सामना बाकी आहे. आशा आहे की तो सामनादेखील असाच खेळू. जर आम्ही असे खेळलो तर कोणताही संघ आम्हाला पराभूत करू शकणार नाही.” स्कॉटलंडने भारतासमोर विजयासाठी 86 धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे भारताने 6.3 षटकात 2 गडी गमावून पूर्ण केले. यासह ग्रुप ब मध्ये भारताचा नेट रनरेट सर्व संघांपेक्षा चांगला आहे.

भारताचा मोठा विजय

भारतीय क्रिकेट संघाने (Indian Cricket Team) टी20 विश्वचषकातील (T20 World Cup) पहिले दोन सामने गमावल्यानंतर तिसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानला (India vs Afghanistan) 66 धावांनी मात देत पहिला-वहिला विजय मिळवला. पण त्याहून तगडा विजय आज भारताने स्कॉटंलडला (India vs Scotland) 8 गडी राखून पराभूत करत मिळवला आहे. विशेष म्हणजे भारताने स्कॉटलंडला दिलेलं लक्ष्य केवळ 39 चेंडूत पूर्ण केल्याने गुणतालिकेतही भारत नेटरनेटमध्ये सर्वांच्या पुढे गेला आहे. पण केवळ 2 विजय खात्यात असल्याने तिसऱ्या स्थानावर सध्यातरी भारत आहे.

पहिल्या सामन्यात पाकिस्तानने 10 आणि नंतर न्यूझीलंडने 8 विकेट्सनी मात दिल्यानंतर भारतासाठी नंतरचे सर्व सामने करो या मरो असेच होते. त्यानुसार तिसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानला मात दिली. पण तरीही नेटरनरेटमध्ये पुढे जाण्यासाठी भारताला मोठ्या विजयाची अपेक्षा आहे. जी अपेक्षा आज उत्तम गोलंदाजी आणि नंतर फलंदाजीने भारताने पूर्ण केली आहे. आधी भेदक गोलंदाजीने भारताने स्कॉटलंडला 85 धावांमध्ये रोखलं. त्यानंतर सलामीवीर केएल राहुल आणि रोहित शर्मा यांनी उत्तम सुरुवात केली. रोहित, राहुल बाद होताच अवघ्या 4 धावांची गरज सूर्यकुमारने षटकार ठोकत पूर्ण करत अवघ्या 6.3 षटकात संघाला विजय मिळवून दिला.

इतर बातम्या

T20 World Cup: स्कॉटलंडवर मोठा विजय तर मिळवला, पण भारताचं सेमीफायनलमध्ये पोहचणं अजूनही अवघड, असं आहे गणित

T20 World Cup: स्कॉटलंडविरुद्ध बुमराहने रचला इतिहास, विश्वविक्रम नावे करत बनला भारताचा ‘विकेट वीर’

T20 world cup 2021: भारताविरुद्ध अफगाणिस्तान पराभूत, पण सामन्यात मिळाला बुमराहसारखा गोलंदाज, पाहा VIDEO

(What if New Zealand beat Afghanistan?, Ravindra Jadeja epic reply, watch video)