Asia Cup 2025 : टीम इंडियात आशिया कप स्पर्धेसाठी आमदाराच्या जावयाला संधी, Bcci चा मोठा निर्णय

Indian Cricket Team : आशिया कप स्पर्धेला अवघ्या काही दिवसांचा अवधी बाकी आहे. त्याआधी मोठी अपडेट समोर आलीय. आमदाराच्या जावयाला भारतीय संघात मोठी जबाबदारी मिळाली आहे. जाणून घ्या.

Asia Cup 2025 : टीम इंडियात आशिया कप स्पर्धेसाठी आमदाराच्या जावयाला संधी, Bcci चा मोठा निर्णय
Team India Pvr Prashanth
Image Credit source: PTI
| Updated on: Sep 03, 2025 | 4:37 PM

आशिया कप 2025 स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचं आयोजन हे यूएईमध्ये करण्यात आलं आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघ 4 सप्टेंबरला यूएईला रवाना होणार आहे. सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात गतविजेता भारतीय संघ आशिया कप स्पर्धेतील आपला पहिला सामना 10 सप्टेंबरला यूएई विरुद्ध खेळणार आहे. या स्पर्धेला अवघे काही दिवस बाकी असताना मोठी अपडेट समोर आली आहे. भारतीय संघात नव्या सदस्याचा समावेश करण्यात आला आहे. या सदस्यावर आशिया कप स्पर्धेत मोठी जबाबदारी असणार आहे.

टीम इंडिया आशिया कप स्पर्धेसाठी नव्या मॅनेजरसह रवाना होणार आहे. पीव्हीआर प्रसंथ याची आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या व्यवस्थापकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रसंथला प्रशासकीय कामकाजाचा अनुभव आहे. या अनुभवाच्या जोरावर बीसीसीआयने त्याला संधी दिल्याचं म्हटलं जात आहे.

पीव्हीआर प्रसंथ यांच्याबाबत थोडक्यात

पीव्हीआर प्रसंथ यांची राजकीय पार्श्वभूमी आहे. प्रसंथचे वडील माजी आमदार आहेत. तर प्रसंथचे सासरे आमदार आहेत. प्रसंथ यांचे वडील पुलपर्थी रामंजनेयुलु हे अंजी बाबू म्हणूनही ओळखले जातात. पुलपर्थी रामंजनेयुलु हे 2009 ते 2014 दरम्यान आमदार राहिले. रामंजनेयुलु यांनी 2024 साली पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षात प्रवेश केला. तर प्रसंथचे सासरे श्रीनिवास राव 2024 मध्ये भीमली विधानसभा मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आले. श्रीनिवास राव हे तेलगु देशम पार्टीचे नेते आहेत. तसेच प्रसंथ हे माजी मंत्रीही राहिले आहेत.

पीव्हीआर प्रसंथ यांना प्रशासकीय अनुभवाचा प्रदीर्घ अनुभव आहे. प्रसंथ एपीसीए अर्थात आंध्र प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष राहिले आहेत. तसेच प्रसंथ यांनी ओल्ड वेस्ट गोदावरी क्रिकेट संघाचं जिल्हास्तरावर प्रतिनिधित्व केलं आहे.

मॅनेजरची जबाबदारी काय?

भारतीय संघात मॅनजेरची भूमिका काय असते? याबाबत बऱ्याच क्रिकेट चाहत्यांना माहित नाहीय. खेळाडूंना काय हवंय नको? खेळाडूंच्या गरजा पुरवण्याची जबाबदारी मॅनेजरची असते. तसेच मॅनेजर हा बीसीसीआय आणि खेळाडू यांच्यातील दुवा असतो.

भारताचे साखळी फेरीतील सामने

दरम्यान टीम इंडिया आशिया कप 2025 स्पर्धेत 10 सप्टेंबरनंतर पुढील सामना 14 सप्टेंबरला खेळणार आहे. या सामन्याकडे साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून आहे. या सामन्यात भारत विरुद्ध पाकिस्तान आमनेसामने असणार आहेत. तसेच टीम इंडिया साखळी फेरीतील आपला तिसरा आणि शेवटचा सामना हा ओमान विरुद्ध खेळणार आहे.