मुंबई: पाचवेळा IPL चं विजेतेपद मिळवणारा Mumbai Indians चा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाह्रेर गेला आहे. सलग आठ पराभवांमुळे मुंबई इंडियन्सचं किताब जिंकण्यााचं स्वप्न भंग पावलं. आता मुंबई इंडियन्सचा संघ प्रतिष्ठा राखण्यासाठी आणि मोसमाचा चांगला शेवट करण्यासाठी खेळेल. पण आता मुंबई इंडियन्सचा प्रत्येक विजय दुसऱ्या संघांचा खेळ बिघडवणारा असेल. रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सचा पुढचा सामना कोलकाता नाइट रायडर्स (KKR) विरुद्ध होणार आहे. केकेआरला काल लखनौ सुपर जायंट्सने पराभूत केलं. त्यामुळे त्यांचा मार्ग थोडा खडतर झालाय. पण अजूनही ते प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहेत. डी.वाय.पाटील स्टेडियमवर दोन्ही संघ आमने-सामने येणार आहेत.
पॉइंटस टेबलमध्ये कोलकाताचा संघ 11 सामन्यात चार विजय आणि सात पराभवासह आठव्या स्थानावर आहे. त्यांचे अजूनही तीन सामने बाकी आहेत. केकेआरने आपल्या पुढच्या तिन्ही मॅच जिंकल्या तर त्यांचे 14 पॉइंटस होतील. या गुणांमुळे त्यांना प्लेऑफमध्ये दाखल होण्याची हमी मिळणार नाही. पण अन्य काही समीकरणांवर अवलंबून रहावं लागेल.
लखनौ विरुद्ध मागच्या सामन्यात केकेआरचा पराभव झाला होता. फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागात केकेआरने सुमार कामगिरी केली होती. कोलकाता अजूनही आपली योग्य प्लेइंग-11 सापडलेली नाही. ही त्यांची खरी समस्या आहे. ते सतत आपल्या टीममध्ये बदल करतायत. पण अजून त्यांना सातत्यपूर्ण विजयी मार्ग सापडलेला नाही. अजूनपर्यंत सलामीच्या जोडीने धावा केलेल्या नाहीत. वेंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे, एरॉन फिंच आणि बाबा इंद्रजीत यांनी सलामीवीराची भूमिका वठवली आहे. पण सातत्य कोणाच्याही कामगिरीत नाहीय. रहाणे आणि वेंकटेशला बाहेर बसवण्यात आलं आहे. मागच्या सामन्यात इंद्रजीत आणि फिंचने ओपनिंग केली होती. पण ते यशस्वी ठरले नाहीत.
मधल्याफळीत टीम नितीश राणा आणि श्रेयस अय्यरवर अवलंबून आहे. पण त्यांच्याही कामगिरी सातत्य नाहीय. आंद्रे रसेल अपेक्षेनुसार प्रदर्शन ,करु शकलेला नाही. मागच्या सामन्यात त्याने 19 चेंडूत 45 धावा ठोकल्या होत्या.
फलंदाजीच नाही, गोलंदाजीतही कोलकाताची टीम विशेष काही करु शकलेली नाही. पॅट कमिन्स सारखा गोलंदाज बाहेर बसलाय. फिरकी गोलंदाजीत वरुण चक्रवर्ती बाहेर बसलाय. सुनील नरेन धावा देत नाहीय. पण त्याला विकेट काढण्यात यश मिळालेलं नाही.
सलग आठ पराभवानंतर मुंबई इंडियन्सने मागचे दोन सामने जिंकलेत. कोलकाता विरुद्ध जिंकून हॅट्ट्रिुक करण्याची मुंबईकडे संधी आहे. मुंबईच्या फलंदाजी आणि गोलंदाजीत सातत्य दिसलेलं नाही. तीच त्यांची मुख्य समस्या आहे. रोहित शर्मा-इशान किशनच्या जोडीला सूर गवसतोय, असं मागच्या सामन्यात दिसलं होतं. या दोघांनी उद्या चांगली सलामी देणं आवश्यक आहे. टिम डेविडनेही मागच्या दोन सामन्यात स्फोटक फलंदाजीच प्रदर्शन केलं होतं. त्यामुळे उद्या फलंदाजी आणि गोलंदाजीत मुंबईने आपला स्तर उंचावला, तर विजय निक्की मिळू शकतो.