
आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी सनरायझर्स हैदराबादने नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. हा कर्णधार तात्पुरता स्वरूपाचा जरी असला तर भविष्याचा वेध घेणारा आहे. सनरायझर्स हैदराबादने पॅट कमिन्सच्या गैरहजेरीत इशान किशनच्या खांद्यावर कर्णधारपदाची जबाबदारी टाकली आहे. तर अभिषेक शर्माकडे उपकर्णधारपद दिलं आहे. पण इशान किशनला कर्णधारपद असंच मिळालेलं नाही. काव्या मारन आणि सनरायझर्स हैदराबाद व्यवस्थापनाने यामागे काही तरी विचार केला असणार, यात काही शंका नाही. शहबाज नदीम यांनी टाइम्स इंडियाशी बोलताना यापूर्वीच सांगितलं होतं की, कर्णधारपद काही नवी गोष्ट नाही. इशानने अनेकवेळा कर्णधारपद भूषवलं आहे. इशान किशनने अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत ही भूमिका बजावली आहे. त्याने झारखंड संघाचं नेतृत्व केलं आहे.त्यामुळे त्याला कर्णधारपद देणं एक चांगला निर्णय आहे.
शहबाज नदीम सध्या झारखंड क्रिकेट असोसिएशनचे जॉइंट सेक्रेटरी आहेत. त्यांनी सांगितलं की, कर्णधारपद अशी गोष्ट की तुमच्या अंगात भिनलेली असते. नेतृत्व जन्म घेतं. तुम्ही ते घडवू शकत नाही. इशान किशनच्या कर्णधारपद खूप जवळून पाहिलं आहे. मागच्या दोन वर्षात त्याने झारखंड संघाचं नेतृत्व केलं, ते कौतुकास पात्र आहे. त्यामुळे झारखंड संघाचा आत्मविश्वास वाढला आहे. त्याने युवा खेळाडूंसाठी सोपी वाट करून दिली आहे. त्यांना बिनधास्त खेळण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे. इशान कधीच कर्णधार असल्याचं भास होऊ देत नाही. एक संघ सहकारी म्हणून इतर खेळाडूंसोबत वागतो.
इशान किशनमध्ये कर्णधारपदाचे गुण तर आहेत. तसेच तो विकेटकीपरही आहे. त्यामुळे खेळ कसा पुढे जात आहे याचा अंदाज त्याला विकेटमागून येतो. खेळपट्टी कशी आहे आणि खेळपट्टीवर खेळाडू कसा खेळत आहे याचा अंदाज बांधता येतो. इतकंच काय तर फिल्डिंग तशा पद्धतीने लावता येत. शहबाज नदीम यांनी सांगितलं की, फलंदाजी करताना तुम्ही फलंदाजाच्या योजनेनुसार चालता. पण कर्णधाराची खरी परीक्षा ही क्षेत्ररक्षणावेळी असते. जर कर्णधार विकेटकीपर असेल तर फायद्याचं ठरतं.