वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धा होणार की नाही? आयोजक देशाच्या पंतप्रधानांवर पळून जाण्याची वेळ

भारतीय पुरुष संघाची टी20 वर्ल्डकप स्पर्धा नुकतीच पार पडली. आता महिला टी20 वर्ल्डकप स्पर्धेचे वेध लागले आहेत. यासाठी सर्व तयारी झाली असून फक्त 60 दिवसांचा अवधी शिल्लक आहे. असं असताना आयोजक देशाच्या पंतप्रधानांवर पळून जाण्याची वेळ आली आहे.

वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धा होणार की नाही? आयोजक देशाच्या पंतप्रधानांवर पळून जाण्याची वेळ
Image Credit source: ICC
| Updated on: Aug 05, 2024 | 4:29 PM

आयसीसी वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धा 3 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेत 10 संघ भाग घेणार आहेत. 17 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत एकूण 23 सामने होणार आहेत. 3 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबरपर्यंत साखळी फेरीचे सामने होतील. त्यानंतर प्रत्येक गटातील टॉप दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. 17 आणि 18 ऑक्टोबरला उपांत्य फेरीचा सामना पार पडेल. या स्पर्धेचा अंतिम सामना 20 ऑक्टोबरला होणार आहे. अ गटात ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंका हे संघ आहेत. तर ब गटात बांग्लादेश, इंग्लंड, स्कॉटलँड, दक्षिण अफ्रिका आणि वेस्ट इंडिज हे संघ आहेत. या स्पर्धेची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मात्र ही स्पर्धा होणार की नाही याबाबत आता शंका आहे. कारण या स्पर्धेचं आयोजन बांगलादेशमध्ये होणार आहे. बांगलादेशमधील सद्यस्थिती पाहता या देशात स्पर्धेचं आयोजन करणं कठीण दिसत आहे. त्यामुळे ही स्पर्धा तात्पुरती स्थगित किंवा इतर देशात आयोजित करावी लागू शकते, असं क्रीडाप्रेमी सांगत आहे. कारण बांगलादेशमध्ये परिस्थिती इतकी चिघळली आहे की, पंतप्रधान शेख हसीना यांना पळ काढावा लागला आहे.

बांगलादेशमध्ये ठिकठिकाणी जाळपोळीच्या घटना सुरु आहेत. हजारोंच्या संख्येने लोकं रस्त्यावर उतरली आहेत. तसेच सरकारी संपत्तीची नासधूस सुरु आहे. आंदोलकांनी शेख हसीना यांच्या कार्यालयालाही आग लावली आहे. त्यामुळे हे आंदोलन आणखी चिघळणार यात शंका नाही. नोकरीतील आरक्षण दूर करण्यासाठी आणि पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलक आक्रमक झाले आहेत. या हिंसाचारात आतापर्यंत 19 पोलीस, तर 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच शेकडो लोक जखमी झाले आहेत. हिंसक परिस्थिती पाहता देशात अनिश्चित काळासाठी कर्फ्यू लावण्यात आला आहे. तसेच इंटरनेट वापरावर बंदी घालण्यात आली आहे.

बांगलादेशमधील सध्याची स्थिती पाहता बीएसएफने सीमेवर सुरक्षा वाढवली आहे. बांगलादेशमधील स्थिती पाहता भारतातही अलर्ट जारी करण्यात आला आहे. अशी सर्व स्थिती असताना टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. बांगलादेश वगळता इतर संघांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार? अशी स्थिती असेल तर काही देश बांगलादेशमध्ये होणाऱ्या स्पर्धेतून माघार घेऊ शकतात. या स्पर्धेसाठी फक्त 60 दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. राजकीय उलथापालथीमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येईल. दुसरीकडे, पंतप्रधान शेख हसीना यांनी पळ काढलेला पाहून लष्कराने सत्ता हातात घेण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. पाकिस्तानप्रमाणे आता बांगलादेशातही तशीच स्थिती निर्माण होऊ शकते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us