CSK vs RR : धोनीशिवाय एकटा पडला ऋतुराज गायकवाड! कोणावर फोडलं दारुण पराभवाचं खापर?
CSK vs RR IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्ससाठी आयपीएल 2026 ची सुरुवात निराशाजनक झाली आहे. सलामीच्या सामन्यातच त्यांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला. महेंद्र सिंह धोनीशिवाय खेळणाऱ्या या टीमचं नेतृत्व पुण्याचा ऋतुराज गायकवाड करतोय.

गोलंदाजांची चोख कामगिरी आणि वैभवची स्फोटक अर्धशतकी खेळी याच्या बळावर राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपरकिंग्सला 8 विकेटने हरवलं. आयपीएल 2026 च्या तिसऱ्या सामन्यात वैभव सूर्यवंशीने अवघ्या 15 चेंडूत अर्धशतक झळकावलं. त्याच्या झंझावातासमोर चेन्नईचे गोलंदाज निष्प्रभ ठरले. बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सची टीम 128 धावांच्या सोप्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरली होती. राजस्थान टीमने अवघ्या 12.1 ओव्हरमध्ये विजयी लक्ष्य गाठलं. सलामीच्या सामन्यात झालेल्या पराभवानंतर टीमचा कॅप्टन ऋतुराज गायकवडने मोठं वक्तव्य केलं. चेन्नई सुपर किंग्सची टीम या सामन्यात महेंद्रसिंह धोनी शिवाय खेळत होती. एमएस धोनीला दुखापत झालीय. त्यामुळे पुढचे दोन आठवडे तो आयपीएलच्या एकाही सामन्यात दिसणार नाही.
ऋतुराज गायकवाडने सीएसकेच्या पराभवाचं खापर फलंदाजांच्या डोक्यावर फोडलं. “खरं सांगायचं झाल्यास मी जास्त हैराण नाहीय.सुरुवातीला जोफ्रा आर्चर आणि बर्गरच्या गोलंदाजीचा सामना करताना मला परिस्थिती थोडी कठीण वाटली. त्यांनी चांगल्या लेंथवर गोलंदाजी केली. त्यानंतर मीडियम पेसरसाठी थोड्या अडचणी होत्या. पण फिरकी गोलंदाजांना मदत मिळत होती. फलंदाजी आम्ही चांगली करायला पाहिजे होती. मॅचला शेवटापर्यंत घेऊन जाता आलं असतं. चांगल्या फलंदाजीचं प्रदर्शन करायला पाहिजे होतं. कदाचित स्कोर 150-160 पर्यंत नेता आला असता” असं ऋतुराज गायकवाड म्हणाला.
चुकांनी सुरुवात करणं सुद्धा चांगलं
“आजकाल चांगला स्कोर काय हे कोणी सांगू शकत नाही. त्यामुळे खेळत रहावं लागतं. मला वाटतं आजचा दिवस थोडा कठीण होता. म्हणून मी अजिबात निराश नाहीय. हा पराभव विसरुन पुढे चला. तीन दिवसानंतर आमचा अजून एक सामना आहे. सगळे खेळाडू चांगल्या मूडमध्ये असतील हे सुनिश्चि करावं लागेल. एक चांगली बाब म्हणजे टीममध्ये युवा खेळाडू आहेत. त्यामुळे कदाचित सुरुवातीला थोडी भिती असेल. एक मॅच खेळून सुरुवात करणं चांगलं आहे आणि चुकांनी सुरुवात करणं सुद्धा चांगलं आहे” असे असं ऋतुराज गायकवाड म्हणाला.
आज असं काही झालं नाही
“मी प्रत्येक सामन्यात शेवटपर्यंत खेळण्याचा समर्थक नाही. जेव्हा तुम्हाला 150, 160 किंवा 170 धावांचा बचाव करायचा असतो, तेव्हा मॅच 20 व्या ओव्हरपर्यंत रोमांचक ठरेल असं नेहमीच होत नाही. म्हणून फलंदाजांनी स्वत:वर आणि आपल्या खेळावर विश्वास ठेवणं गरजेच आहे. जर तुमच्या एरियामध्ये चेंडू येत असेल तर त्याचा फायदा उचला. आज असं काही झालं नाही. पण आम्ही फलंदाजी अजून चांगली करु शकतो. फलंदाजी करताना तुम्ही सकारात्मक राहिलं पाहिजे. परिस्थिती अनुकूल असेल तर फलंदाज चांगला स्कोर करु शकतात” असं ऋतुराज गायकवाड म्हणाला.