Gen Z विद्यार्थ्यांनंतर आता Gen Z क्रिकेटरचंही आंदोलन, 250 हून अधिक तरुण रस्त्यावर उतरले, कारण काय?
विद्यार्थ्यांच्या पाठोपाठ आता 'Gen Z' क्रिकेटपटूही रस्त्यावर उतरले आहेत. २५० हून अधिक तरुण खेळाडूंनी, त्यांच्या पालकांसोबत, लखनौच्या अटल बिहारी वाजपेयी एकना स्टेडियमबाहेर आंदोलन केले.

Gen Z Cricketers: विद्यार्थ्यांच्या पाठोपाठ आता ‘Gen Z’ क्रिकेटपटूही रस्त्यावर उतरले आहेत. २५० हून अधिक तरुण खेळाडूंनी, त्यांच्या पालकांसोबत, लखनौच्या अटल बिहारी वाजपेयी एकना स्टेडियमबाहेर आंदोलन केले. या आंदोलनाचा उद्देश उत्तर प्रदेशात केवळ एक नव्हे, तर तीन रणजी ट्रॉफी संघांची मागणी करणे हा आहे. उत्तर प्रदेश क्रिकेट प्लेयर्स असोसिएशन आणि क्रिकेट असोसिएशन ऑफ पूर्वांचल यांच्या नेतृत्वाखाली, पूर्वांचल आणि मध्य उत्तर प्रदेशातील ‘Gen Z’ क्रिकेटपटू आणि त्यांच्या पालकांनी एकना स्टेडियममध्ये आंदोलन केले. या भागांतील खेळाडूंना समान संधी मिळावी यासाठी उत्तर प्रदेशात तीन रणजी ट्रॉफी संघ तयार करण्याची मागणी त्यांनी केली.
क्रिकेट प्लेयर्स असोसिएशनचे राज्य अध्यक्ष, अरविंद सिंग यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, उत्तर प्रदेशसारख्या विशाल राज्यातील सर्व खेळाडूंना त्यांचे हक्क आणि संधी मिळाव्यात यासाठी अनेक रणजी ट्रॉफी संघ तयार करण्याची शिफारस मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यापूर्वी केली आहे. त्यांनी सांगितले की, उत्तर प्रदेशची अंदाजे २५ कोटी लोकसंख्या पाहता, राज्यात तीन क्रिकेट संघटना म्हणजेच तीन रणजी संघ असायला हवेत. या मागणीसाठी २५० ‘Gen z’ खेळाडू आणि त्यांच्या पालकांनी लखनौच्या एकाना स्टेडियमवर आंदोलन केले.
सिंग यांनी असाही आरोप केला की, सध्या सुरू असलेल्या उत्तर प्रदेश टी-२० लीगमध्ये पूर्वांचल आणि मध्य उत्तर प्रदेशातील खेळाडूंकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यांनी सांगितले की, लीगच्या चालू हंगामात सहा संघांमधील अंदाजे १५० खेळाडूंपैकी केवळ १६ खेळाडू पूर्वांचल आणि मध्य उत्तर प्रदेशातील आहेत, तर ८९ खेळाडू पश्चिम उत्तर प्रदेशातील नऊ जिल्ह्यांतील आणि आठ खेळाडू दिल्लीतील आहेत.
महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये प्रत्येकी तीन रणजी संघ
सध्याच्या रणजी ट्रॉफी प्रणालीमध्ये महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये प्रत्येकी तीन संघ आहेत. महाराष्ट्रामध्ये, विदर्भ आणि मुंबई स्वतंत्र क्रिकेट संघटना/प्रादेशिक संघ म्हणून रणजी ट्रॉफी खेळतात, तर गुजरात, बडोदा आणि सौराष्ट्र हे एकाच राज्यातील संघ असून ते रणजी ट्रॉफीमध्ये खेळतात.