MI vs PBKS : ‘आता माझ्याकडे बोलण्यासारखं काही उरलेलं नाही, कारण..’ पराभवानंतर मनातून कोसळलेल्या हार्दिक पंड्याचे शब्द

MI vs PBKS : काल मुंबई इंडियन्सचा आयपीएलमध्ये सलग चौथा पराभव झाला. पाचवेळा आयपीएलचं विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्सची अशी हालत पाहून चाहत्यांना दु:ख होत आहे. कॅप्टन हार्दिक पंड्या सुद्धा संघाच्या या कामगिरीने निराश झाला आहे. त्याचे शब्दच सर्वकाही सांगून गेले.

MI vs PBKS : आता माझ्याकडे बोलण्यासारखं काही उरलेलं नाही, कारण.. पराभवानंतर मनातून कोसळलेल्या हार्दिक पंड्याचे शब्द
Hardik Pandya
Image Credit source: AFP
| Updated on: Apr 17, 2026 | 8:56 AM

आयपीएल 2026 मध्ये मुंबई इंडियन्सची सुमार कामगिरी सुरुच आहे. काल मुंबई इंडियन्सचा सलग चौथा पराभव झाला. ते सुद्धा घरच्या मैदानावर वानखेडेवर. याआधी मुंबई इंडियन्सचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स या टीमकडून पराभव झाला आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पहिल्या सामन्यात विजय मिळवून मुंबई इंडियन्सने 13 वर्षांची परंपरा खंडीत केली होती. कारण मुंबईला मागच्या तेरावर्षात सलामीचा सामना कधी जिंकता आला नव्हता. सीजनची सुरुवात चांगली झाल्यामुळे मुंबई यंदा कमाल करेल असं चाहत्यांना वाटलं होतं. पण असं घडलं नाही. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला सलग चौथा पराभव स्वीकारावा लागला. महत्वाचं म्हणजे मुंबई इंडियन्सकडे टॉपची टीम आहे.

कॅप्टन हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह आणि तिलक वर्मा यांच्यासारखे टीम इंडियातले दिग्गज खेळाडू मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये आहेत. मागच्या महिन्यात संपलेल्या वर्ल्ड कपमध्ये या तिघांनी जबरदस्त कामगिरी केली होती. त्यामुळे टीम इंडियाला सलग दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कप जिंकता आला. पण आयपीएल सुरु झाल्यापासून या चारही खेळाडूंचा सूर हरवला आहे. ते संघर्ष करताना दिसतायत. इतकी चांगली साईड असूनही एक सामना जिंकताना मुंबई इंडियन्स टीमचे नाकीनऊ आले आहेत.

हार्दिकला चेहऱ्यावरची निराशा लपवता आली नाही

मुंबई इंडियन्सने काल पंजाब किंग्स विरुद्ध फलंदाजी करताना 20 ओव्हर्समध्ये 6 विकेट गमावून 195 धावा केल्या. पंजाब किंग्सने हे लक्ष्य अवघ्या 16.3 षटकात 3 विकेट गमावून पार केलं. मुंबईला घरच्या मैदानात वानखेडेवर धूळ चारली. सलग चौथ्या पराभवानंतर हार्दिक पंड्याला चेहऱ्यावरची निराशा लपवता आली नाही. “प्रामाणिकपणे सांगायचं झाल्यास माझ्याकडे आता बोलायला जास्त काही नाहीय. आम्हाला बसून विचार करायची गरज आहे की, आम्ही कुठे कमी पडतोय, एक खेळाडू म्हणून टीम म्हणून. आमच्या योजना आणि काम करण्याची पद्धत दुरुस्त करावी लागेल” असं हार्दिक म्हणाला.

हार्दिक पंड्या काय म्हणाला?

हार्दिकने पंजाब किंग्सला विजयाचं श्रेय दिलं. “पंजाब किंग्सला या विजयाचं श्रेय जातं. चेंडू रिव्हर्स स्विंग होत होता. दुसऱ्या इनिंगमध्ये दव सुद्धा पडला. त्यांनी आम्हाला हरवलं. त्यांची गोलंदाजी आणि फिल्डिंग आमच्यापेक्षा चांगली होती. आम्हाला काही कठोर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे की, अशाच पद्धतीने पुढे जाऊन परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आम्हाला जबाबदारी घ्यावी लागेल” असं हार्दिक पंड्या म्हणाला.

Follow Us