IND vs AUS : वॉर्नर-फिंचची शतकी खेळी, ऑस्ट्रेलियाकडून भारताचा दारुण पराभव

| Updated on: Jan 14, 2020 | 9:09 PM

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 10 विकेट्स राखून दारुण पराभव केला. सलामीवीर डेविड वॉर्नर आणि कर्णधार अॅरोन फिंच यांच्या शतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने हा सामना सहज जिंकला.

IND vs AUS : वॉर्नर-फिंचची शतकी खेळी, ऑस्ट्रेलियाकडून भारताचा दारुण पराभव
Follow us on

IND vs AUS : मुंबई : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 10 विकेट्स राखून दारुण पराभव केला. सलामीवीर डेविड वॉर्नर आणि कर्णधार अॅरोन फिंच यांच्या शतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने हा सामना सहज जिंकला. ऑस्ट्रेलियाने भारतावर 10 विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. डेविड वॉर्नरने 112 चेंडूत नाबाद 128 धावा केल्या, तर अॅरोन फिंच 144 चेंडूत 110 धावा करून नाबाद राहिला.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामधील तीन एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना आज मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आला. पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा दारुण पराभव केला. या सामन्यात टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. त्यामुळे प्रथम फलदांजीला आलेल्या भारताने सर्वाबाद 255 धावा केल्या. भारताने ऑस्ट्रेलियासमोर 256 धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारताचे हे आव्हान ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी अवघ्या 37.4 षटकात एकही विकेट न गमावता पूर्ण केलं.

डेविड वॉर्नरने 112 चेंडूत 17 चौकार आणि 3 षटकार लगावत नाबाद 128 धावा केल्या. अॅरोन फिंचने 114 चेंडूत 13 चौकार आणि 2 षटकार लगावत 110 धावा केल्या. दोन्ही खेळाडूंच्या दमदार खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 37.4 षटकांत विजयाला गवसणी घातली. भारतीय गोलंदाजांचे प्रयत्न डेविड वॉर्नर आणि अॅरोन फिंच यांची पार्टनरशीप तोडण्यात अयशस्वी ठरली आणि त्याचा परिणाम म्हणून भारताला हा लाजीरवाणा पराभव स्वीकाराला लागला. भारताकडून कुलदीप यादवने 10 षटकात सर्वाधिक 55 धावा दिल्या. त्यानंतर शार्दुल ठाकूरने अवघ्या 5 षटकात 43 धावा दिल्या.

रोहित शर्मा घरच्या मैदानात फेल

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून पहिले क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारताकडून फलंदाजीसाठी मैदानात उतरलेले सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांची जोडी फार काही कमाल करू शकली नाही. सलामीवीर शिखर धवनच्या 74 धावांच्या जोरावर भारताला 255 धावांपर्यांत मजल मारता आली. सलामीवीर रोहित शर्माला घरच्या मैदानात मोठी खेळी करता आली नाही. तो अवघ्या 10 धावा करुन माघारी परतला. त्यानंतर धवन आणि के एल राहुलने डाव सांभाळला. शिखर धवनने 91 चेंडूत 9 चौकार आणि 1 षटकार लगावत 74 धावांची खेळी केली. तर के एल राहुलने 61 चेंडूत 4 चौकार लगावत 47 धावा केल्या. अवघ्या 3 धावांनी राहुलचे अर्धशतक हुकले. त्यानंतर कर्णधार विराट कोहली 16 धावा करुन माघारी परतला. ऋषभ पंत 28 तर रवींद्र जडेजाने 25 धावांची खेळी केली. तर, श्रेयस अय्यर 4, पंत 28 धावा करुन बाद झाले. अवघ्या 49.1 षटकात भारतीय संघ सर्व बाद झाला.