
भारताने आशिया कपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. बांग्लादेशला 41 धावांनी हरवून टीम इंडियाची आशिया कपच्या फायनलमध्ये पोहोचण्याची ही 12 वी वेळ आहे. भारताने चालू आशिया कपमध्ये सलग पाच सामने जिंकले आहेत. दोनवेळा पाकिस्तानला हरवलं आहे. पण एकाबाबतीत टीम इंडिया पिछाडीवर आहे.पाकिस्तान भारताच्यापुढे आहे. टीम इंडिया आशिया कपमध्ये सर्वाधिक कॅच सोडणारी टीम बनली आहे. पाकिस्तान पाठोपाठ बांग्लादेश विरुद्ध सामन्यात भारतीय खेळाडूंनी खूप खराब फिल्डिंग केली. भारतीय टीम टुर्नामेंटमधील सर्वाधिक कॅच सोडणारा संघ बनला आहे.
आशिया कपमध्ये ड्रॉप कॅचबद्दल बोलायचं झाल्यास टीम इंडियाने सर्वाधिक 12 कॅच सोडल्या आहेत. भारताची कॅचिंग सरासरी 67.5 टक्के आहे. पाकिस्तान या बाबतीत टॉपवर आहे. पाकिस्तान टीमची कॅच पकडण्याची सरासरी 86.7 टक्के आहे. लाजिरवणी बाब म्हणजे बांग्लादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान, ओमान आणि यूएई यांची कॅचिंग सरासरी भारतापेक्षा चांगली आहे. भारतानंतर हॉन्कॉन्गच्या टीमने सर्वाधिक 11 कॅच सोडल्या आहेत. बांग्लादेशने 8, श्रीलंकेने 6 अफगाणिस्तान-ओमानने 4-4 कॅच सोडल्या आहेत. पाकिस्तानने 3 आणि यूएईने 2 झेल सोडले आहेत.
अन्यथा फायनलमध्ये महाग पडू शकतं
टीम इंडियाने दमदार फलंदाजी आणि गोलंदाजीच्या बळावर आशिया कपच्या फायनलमध्ये प्रवेश केला. पण फिल्डिंग त्यांच्यासाठी एक मोठा मुद्दा आहे. अभिषेक शर्मा आणि कुलदीप यादवने फिल्डिंगच्या बाबतीत निराश केलय. या दोघांनी बऱ्याच कॅच सोडल्या. बांग्लादेश विरुद्ध विजयानंतर वरुण चक्रवर्तीने मान्य केलं की, भारतासाठी फिल्डिंग एक गंभीर मु्द्दा आहे. फिल्डिंग कोच आता प्रत्येक खेळाडूचा क्लास घेऊ शकतात. दुबईच्या मैदानातील फ्लड लाइट्स हे सुद्धा खराब कॅचिंगच एक कारण असू शकतं. या फ्लड लाइट्स खांबांवर नसून स्टेडिअमच्या छतावर आहेत. त्यामुळे खेळाडूंना चेंडू जज करताना अडचणी येतात. टीम इंडियाला लवकर या समस्येवर उपाय शोधावा लागेल. अन्यथा फायनलमध्ये महाग पडू शकतं. दरम्यान काल टीम इंडियाने सुपर-4 राऊंडमध्ये बांग्लादेशवर 41 धावांनी शानदार विजय मिळवून दिमाखात आशिया कप 2025 च्या फायनलमध्ये प्रवेश केला.