IND vs AUS | ‘पिच’र अभी बाकी है…! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीपूर्वी खेळपट्टीचं गूढ वाढलं

बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेत विजयापेक्षा सर्वात जास्त चर्चा रंगली ती खेळपट्ट्यांची...आयसीसीपासून आजी माजी खेळाडूंनी टीका केल्याने खेळपट्ट्यांचा वाद वाढला आहे. आता चौथ्या कसोटीसाठी खेळपट्टी कशी असेल? याबाबत चर्चा होत आहे.

IND vs AUS | पिचर अभी बाकी है...! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीपूर्वी खेळपट्टीचं गूढ वाढलं
INDvsAUS | चौथ्या आणि निर्णायक सामन्याआधी बीसीसीआयची मोठी 'खेळी'
Image Credit source: Twitter
| Updated on: Mar 07, 2023 | 3:33 PM

मुंबई : बॉर्डर गावसकर कसोटी मालिका सुरु असून तीन सामने झाले आहेत. या मालिकेत भारताने दोन, तर ऑस्ट्रेलियाने एक सामना जिंकला आहे. मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना आता उरला आहे. तत्पूर्वी मालिकेतील तिन्ही सामने तिसऱ्या दिवशीच संपल्याने पिचचा वाद वाढला आहे. मालिका सुरु होण्यापूर्वी सुरु झालेला वाद अजूनही शमताना दिसत नाही. त्यात आयसीसीने दखल घेतल्याने हा वाद आणखी चिघळला आहे. कारण आयसीसीने इंदुर खेळपट्टीबाबत सर्वात खराब खेळपट्टी असा शेरा दिला होता.

आयसीसीची टीका आणि आजी माजी खेळाडूंनी साधलेला निशाणा यामुळे अहमदाबादच्या खेळपट्टीबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.अहमदाबादमध्ये असलेल्या भारतीय आणि ऑस्ट्रेलियन पत्रकारांच्या सोशल मीडियावरील अपडेट्सनुसार, चौथ्या आणि शेवटच्या कसोटीसाठी दोन खेळपट्ट्या तयार केल्याचं बोललं जात आहे. पण नेमकी कोणती खेळपट्टी सामन्यासाठी आहे? याबाबतचं गूढ मात्र कायम आहे.

क्युरेटर्सने दोन खेळपट्ट्या तयार ठेवल्या आहेत का? त्यांनी अद्याप खेळपट्टीचा निर्णय घेतला नाही का? असे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. सामना सुरु होण्यासाठी 48 तासांपेक्षा कमी अवधी असताना खेळपट्टीचा निर्णय अद्याप झालेला नाही. दोन खेळपट्ट्यांवरील कव्हर्समुळे या बातम्यांना उधाण आलं आहे. याबाबत अधिकृतरित्या कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही.

आयसीसी सामनाधिकारी काय म्हणाले होते?

“खेळपट्टी खुपच ड्राय होती. फलंदाजी आणि गोलंदाजीसाठी पुरक नव्हती. ही खेळपट्टी फिरकीपटूंच्या बाजूने झुकलेली पहिल्या दिवसापासून पाहायला मिळाली. सामना सुरु झाल्यानंतर पाच चेंडूवरच खेळपट्टी उखडण्यास सुरुवात झाली होती. चेंडू सीम होत नव्हता. त्याचबरोबर चेंडू उसळी घेत नव्हता, असं दिसून आलं.”, असं आयसीसी सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी सांगितलं.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी भारताला चौथा सामना काहीही करून जिंकावाच लागेल. अन्यथा श्रीलंका न्यूझीलँड कसोटी मालिकेवर अवलंबून राहावं लागेल. श्रीलंकेने दोन सामन्यांची मालिका 2-0 ने जिंकल्यास अंतिम फेरीतील स्थान निश्चित होणार आहे.

दोन्ही संघांची प्लेईंग 11

टीम ऑस्ट्रेलिया | स्टीव्ह स्मिथ (कॅप्टन), स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मॅट कुहनेमन, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, मिचेल स्टार्क आणि मिचेल स्वीपसन.

टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, इशान किशन, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव , सूर्यकुमार यादव आणि जयदेव उनाडकट