IND vs SA Final : फायनलमध्ये कमकुवत बाजूलाच टीम इंडियाने बनवलं ताकद, वर्ल्ड कप जिंकण्याचं हे एक प्रमुख कारण, VIDEO
IND vs SA Final : वर्ल्ड कप 2025 मध्ये महिला टीम इंडिया आपल्याबाजूने 100 टक्के देत होती. उत्तम प्रदर्शन करण्याचा प्रयत्न असायचा. पण काही सामन्यात मोक्याच्या क्षणी अपयश आलं. त्यामुळे अनेकांनी टीमच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. पण फायनलमध्ये टीम इंडियाने आपली कमकुवत बाजूच ताकदीमध्ये बदलली.

ICC वुमेन्स वर्ल्ड कप 2025 मध्ये टीम इंडियाने अनेक चढ-उताराचे क्षण अनुभवले. सेमीफायनलमध्ये टीम इंडियासमोर ऑस्ट्रेलियाचा अत्यंत कठीण पेपर होता. भारताच्या महिला संघाने सेमीफायनलमध्ये जबरदस्त खेळ दाखवत फायनलमध्ये प्रवेश केला. फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला भिडण्याआधी टीम इंडियासमोर एक मोठी समस्या होती, ती म्हणजे फिल्डिंगची. कॅच पकडण्याच्या बाबतीत टीम इंडिया या वर्ल्ड कपमधील सर्वात खराब टीम आहे. अनेकदा मैदानात त्यांच्याकडून मिसफिल्ड होताना पहायला मिळालं. म्हणजे क्षेत्ररक्षण करताना चेंडू हातात पकडता आला नाही. फायनल सारख्या महत्वाच्या सामन्यात टीम इंडियाला फिल्डिंगमध्ये कमालीची सुधारणा करणं आवश्यक होतं. टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिलं यश दमदार फिल्डिंगच्या बळावरच मिळालं.
नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडिअमवर रविवारी 2 नोव्हेंबर रोजी फायनलचा सामना झाला. टीम इंडियाने पहिली बॅटिंग करताना 298 धावांचा मोठा स्कोर बनवला. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेच्या टीमने चांगली सुरुवात केली होती. कॅप्टन लॉरा वुल्वार्च आणि टेजमिन ब्रिटस यांनी सुरुवातीला भारतीय गोलंदाजाचा संभाळून सामना केला. नंतर चौकार लगावून धावांचा वेग वाढवायला सुरुवात केली. दोघांना आऊट करणं भारतीय गोलंदाजासाठी कठीण ठरत होतं.
हेच घातक ठरलं
अशाचवेळी जबरदस्त चेंडू किंवा अद्भूत क्षेत्ररक्षणाची गरज असते. टीम इंडियाला पहिलं यश याच बळावर मिळालं. 10 व्या ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या 50 धावा झाल्या होत्या. टेजमिन ब्रिटसला सूर गवसलेला. याच ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर मिड ऑनला शॉट मारुन तिने धाव घेण्याची चूक केली. हेच घातक ठरलं. युवा खेळाडू अमनजोत कौरने वेगाने चेंडू उचलला. थेट नॉन स्ट्राइकला स्टम्पस उडवण्यासाठी थ्रो केला. अमनजोतचा थ्रो अचूक होता. ब्रिट्स क्रीजमध्ये पोहोचण्यापूर्वी बेल्स उडालेल्या. अशा प्रकरे रनआऊटने पहिला विकेट मिळवून दिला.
फायनलमध्ये 3 कॅच सोडल्या
संपूर्ण टुर्नामेंट दरम्यान फिल्डिंगमुळे टीम इंडियावर चहूबाजूंनी टीका सुरु होती. पण फायनलमध्ये चांगल्या फिल्डिंगनेच त्यांना पहिला विकेट मिळवून दिला. ब्रिट्स 25 धावांवर बाद झाली. त्यानंतर पुढची विकेट सुद्धा 2 ओव्हर्सच्या आत मिळाली. उलट दुसऱ्याबाजूला संपूर्ण टुर्नामेंटमध्ये उत्तम फिल्डिंग करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या टीमने फायनलमध्ये 3 कॅच सोडल्या. त्याची किंमत त्यांना 299 धावांसारख्या अवघड लक्ष्याचा पाठलाग करुन चुकवावी लागली.
