
उत्तर द्यायचं असेल, तर तोंडाची गरज काय? कामाने का उत्तर देऊ नये? श्रेयस अय्यरला ही गोष्ट खूप चांगल्या पद्धतीने समजते. म्हणूनच आपल्यावर झालेल्या प्रत्येक अन्यायाला तो कामाने उत्तर देतोय. श्रेयसवर झालेल्या अन्यायाची यादी मोठी आहे. आतापर्यंत त्याने आपल्या बॅटने उत्तर दिलय. प्रत्येकवेळी त्याने हवेची दिशा बदलली आहे. आता स्थिती अशी आहे की, श्रेयस अय्यर नावच पुरेसं आहे.
श्रेयस अय्यरसोबत झालेल्या ताज्या अन्यायाच प्रकरण 26 मे या तारखेशी संबंधित आहे. KKR ने या दिवशी आयपीएल किताब जिंकण्याला एक वर्ष पूर्ण झाल्याच सेलिब्रेशन केलं. पण ज्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही ट्रॉफी जिंकली, त्या श्रेयस अय्यरलाच त्यांनी लांब ठेवलं. श्रेयस अय्यरने त्याच्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या KKR ला 26 मे रोजीच आपल्या कामातून उत्तर दिलं. श्रेयसने त्याच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्सला क्वालिफायर 1 मध्ये पोहोचवलं. KKR ने आयपीएल 2025 च्या सीजनसाठी श्रेयसला रिटेन केलं नव्हतं.
टीम इंडियातून खेळतानाही अन्याय
टीम इंडियातून खेळतानाही श्रेयस अय्यरवर भरपूर अन्याय झालाय. पण इथे सुद्धा त्याने त्याच्या बॅटनेच उत्तर दिलय. भारतासाठी तो शेवटचा कसोटी सामना फेब्रुवारी 2024 मध्ये खेळला. खराब प्रदर्शनाच कारण पुढे करुन त्याला टीम बाहेर करण्यात आलं. टेस्ट टीममधून ड्रॉप केल्याची त्याच्या मनात खंत होतीच. पण जखमेवर मीठ चोळण्याचं काम बीसीसीआयने केलं. बेशिस्त वर्तनाच कारण देऊन त्याला कॉन्ट्रॅक्ट लिस्ट बाहेर ठेवण्यात आलं.
बीसीसीआयला आपला निर्णय बदलावा लागला
श्रेयस अय्यरने या सर्व अन्यायाला आपल्या पद्धतीने उत्तर दिलं. रणजी ट्रॉफी, विजय हजारे ट्रॉफी आणि सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने धावांचा पाऊस पाडला. 2024-25 च्या रणजी मोसमात त्याने 90.40 च्या सरासरीने 454 धावा केल्या. विजय हजारे ट्रॉफीमध्ये 325 रन्स केले. सैयद मुश्ताक अलीमध्ये 50 च्या सरासरीने 345 धावा केल्या. देशांतर्गत क्रिकेटमधील श्रेयसच हे जबरदस्त प्रदर्शन पाहून बीसीसीआयला आपला निर्णय बदलावा लागला. अय्यरला पुन्हा एकदा सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये स्थान दिलं.