“मी केएल राहुलला स्पष्टच बोललो असतो बस्सं झालं…”, माजी निवड समिती अध्यक्षांनी सुनावलं

केएल राहुलने आपल्या 47 कसोटी सामन्यात एकूण 7 शतकं झळकावली आहेत. ही शतकं ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेविरुद्ध केली आहेत. पण असं असताना 47 कसोटी सामन्यात 33.44 च्या सरासरीने धावा केल्या आहेत.

मी केएल राहुलला स्पष्टच बोललो असतो बस्सं झालं..., माजी निवड समिती अध्यक्षांनी सुनावलं
केएल राहुलला प्लेईंग 11 मध्ये सहभागी केल्याने माजी निवड समिती अध्यक्ष भडकले, म्हणाले; मी असतो तर...
Image Credit source: PTI
| Updated on: Feb 22, 2023 | 3:18 PM

मुंबई : टीम इंडियाचा सलामीचा फलंदाज केएल राहुल सध्या खराब फॉर्मात आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत त्याची कामगिरी सुमार राहिली आहे. त्याच्या खेळीवर माजी क्रिकेटपटू आणि क्रीडाप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. असं असताना त्याला प्लेईंग 11 मध्ये वारंवार संधी मिळत असल्याने आता संताप व्यक्त करण्यात येत आहे. केएल राहुलने आपल्या 47 कसोटी सामन्यात एकूण 7 शतकं झळकावली आहेत. यापैकी 6 शतकं विदेशी धरतीवर झळकावली आहेत. ही शतकं ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेविरुद्ध केली आहेत. पण असं असताना 47 कसोटी सामन्यात 33.44 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. मागच्या 10 कसोटी डावात त्याची 23 ही सर्वोत्तम खेळी राहिली आहे त्यामुळे प्लेईंग इलेव्हनमध्ये त्याच्याऐवजी शुभमन गिलला संधी देण्याची मागणी जोर धरत आहे.

दुसरीकडे, कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविडनं त्यांची पाठराखण केली आहे. त्याचबरोबर वाढता दबाव पाहता त्याच्याकडून उपकर्णधारपद हिसकावून घेतलं आहे. यामुळे दोन कसोटीत त्याच्याऐवजी शुभमन गिलला संधी मिळेल असेच संकेत मिळत आहेत. आता माजी निवड समिती अध्यक्ष के श्रीकांत यांनी केएल राहुलच्या निवडीवरून खडे बोल सुनावले आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून थोडं दूर जाण्याचा सल्लाही केएल राहुलला दिला आहे.

“मी केएल राहुलचा खूप मोठा चाहता आहे. त्याच्याकडे बॅटिंगचा क्लास आहे. त्याचमुळे मी त्याला रॉयस राहुल असं म्हणतो. पण या काळात मी तसं म्हणू शकत नाही. जर मी निवड समितीचा अध्यक्ष असतो तर मी त्याच्याकडे गेलो असतो आणि त्याला सांगितलं असतं आता थोडा आराम कर.”, असं के श्रीकांत यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं.

“मला असं वाटतं तिसऱ्या कसोटीत केएल राहुल ऐवजी शुभमन गिलला संधी दिली पाहिजे. कारण तो त्याच्या करिअरमधील सर्वोत्तम फॉर्मात आहे. त्याला तुम्ही डगआऊटमध्ये बसवून खराब करू शकत नाही. राहुलच्या खेळावर मला शंका नाही पण आता त्याने थांबणं गरजेचं आहे. त्याने थोडा आराम करून पुन्हा नव्या ताकदीने पुनरागमन केलं पाहीजे.”, असंही के. श्रीकांत यांनी पुढे सांगितलं. के. श्रीकांत 2011 वर्ल्डकप स्पर्धेवेळी निवड समितीचे अध्यक्ष होते.

भारतीय संघ – चेतेश्वर पुजार, केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), श्रेयस अय्यर, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, अक्षर पटेल, आर. अश्विन, रविंद्र जडेजा, इशान किशन, श्रीकर भारत, जयदेव उनाडकट, कुलदीप यादव, मोह्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us