IndvsPak : बाबरची दांडी उडवणाऱ्या कुलदीपवर विराट फिदा, मॅचनंतर म्हणाला…

| Updated on: Jun 17, 2019 | 10:20 AM

India vs Pakistan : या सामन्यात भारताचा सलामीवीर रोहित शर्माने खणखणीत 140 धावा ठोकल्या. तर चायनामन फिरकीपटू कुलदीप यादवने महत्त्वपूर्ण 2 विकेट घेत, भारताच्या विजयात मोठा वाटा उचलला.

IndvsPak : बाबरची दांडी उडवणाऱ्या कुलदीपवर विराट फिदा, मॅचनंतर म्हणाला...
Follow us on

IndvsPak मँचेस्टर (इंग्लंड) : विश्वचषकातील (World Cup 2019)  हायव्होल्टेज सामन्यात भारताने पाकिस्तानचा 89 धावांनी धुव्वा उडवला. इंग्लंडमधील मँचेस्टरच्या (Manchester) ओल्ड ट्रॅफोर्ड मैदानात (old trafford stadium) झालेल्या सामन्यात विराट कोहलीच्या टीम इंडियाचा दबदबा पाहायला मिळाला. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 336 धावा ठोकल्या होत्या. पावसाने व्यत्यय आणलेल्या या सामन्यात, डकवर्थ लुईस नियमानुसार पाकिस्तानला सुधारित 40 षटकात 302 धावांचे आव्हान देण्यात आले होते. ते आव्हनही पाकला पेलवले नाही. पाकिस्तान 40 षटकांमध्ये केवळ 6 बाद 212 धावाच करता आल्या.

विराटची रोहित, कुलदीपवर स्तुतीसुमने

दरम्यान, या सामन्यात भारताचा सलामीवीर रोहित शर्माने खणखणीत 140 धावा ठोकल्या. तर चायनामन फिरकीपटू कुलदीप यादवने महत्त्वपूर्ण 2 विकेट घेत, भारताच्या विजयात मोठा वाटा उचलला. या कामगिरीमुळे टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने या दोघांचेही तोंडभरुन कौतुक केलं.

कोहली म्हणाला, “रोहितने आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात एकट्याच्या हिमतीवर विजय मिळवला होता. दुसऱ्या सामन्यात संपूर्ण संघाची एकजूट पाहायला मिळाली. त्यानंतर रोहितने पुन्हा पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात लाजवाब खेळी केली”.

कुलदीपचं कौतुक

कुलदीपबबात कोहली म्हणाला, “कुलदीपचा स्पेल जबरदस्त होता. पाकिस्तानी फलंदाज कशीतरी कुलदीपची गोलंदाजी खेळून काढू पाहात होते. त्याने मोठा स्पेल करावा यासाठी मी आग्रही होतो. कुलदीपने बाबर आझमला ज्याप्रकारे बाद केलं, ते जबरदस्त होतं. मला वाटतं या सामन्यात कुलदीपने केलेली गोलंदाजी ही वर्ल्डकपमध्ये त्याची सर्वोत्तम गोलंदाजी असेल”

 


पराभवानंतर सरफराज काय म्हणाला?

दरम्यान, या सामन्यातील पराभवानंतर पाक कर्णधार सरफराज अहमदने आपल्या संघाकडून चांगली कामगिरी झाली नसल्याचं नमूद केलं. टॉस जिंकून आम्ही योग्य निर्णय घेतला, मात्र दुर्दैवाने आम्ही योग्य टप्प्यावर गोलंदाजी करु शकलो नाही. रोहित शर्माने चांगली फलंदाजी केली.

रोहितची प्रतिक्रिया

दरम्यान या सामन्यात धडाकेबाज 140 धावा करणाऱ्या भारताच्या रोहित शर्माला सामनावीराचा किताब देण्यात आला. यावेळी रोहित म्हणाला, “ज्याप्रकारे भारतीय संघाने कामगिरी केली, ती निश्चितच आनंद देणारी आहे. आम्ही ठोस क्रिकेट खेळण्याच्या उद्देशाने मैदानात उतरलो होतो, आम्ही ते करुन दाखवलं.”

संबंधित बातम्या 

India vs Pakistan | विश्वचषकातील विजयाची परंपरा कायम, भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय   

IND vs PAK: केवळ 1 धाव करुनही धोनीच्या नावावर मोठा विक्रम  

WORLD CUP : विराट कोहलीचा नवा विक्रम, सचिनलाही मागे टाकले