
टीम इंडियासाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात खास झालेली नाही. भारतीय संघाला 3 मॅचच्या वनडे सीरीजमध्ये पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. या दरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू नवज्योत सिंह सिद्धू सोशल मीडियावर चर्चेत आहे. एक स्टेटमेंट फॅन्समध्ये व्हायरल झालं आहे. त्यात असा दावा करण्यात आला आहे की, नवज्योत सिंह सिद्धूने बीसीसीआयमधून गौतम गंभीर आणि अजित आगरकरला हटवण्याची मागणी केली आहे. त्यावर आता नवज्योत सिंह सिद्धूने त्याची बाजू मांडली आहे.
नवज्योत सिंह सिद्धूच्या नावाने एक पोस्ट व्हायरल झाली. त्यामुळे त्याला स्पष्टीकरण द्यावं लागलं. सिद्धूच नाव एका खोट्या स्टेटमेंटशी जोडलं गेलं. “भारताला 2027 चा वनडे वर्ल्ड कप जिंकायचा असेल, तर बीसीसीआयला लवकरात लवकर अजित आगरकर आणि गौतम गंभीरला हटवून रोहित शर्माला पुन्हा सन्मानाने कर्णधार बनवलं पाहिजे” असं सिद्धूच्या नावे ते स्टेटमेंट होतं. हे स्टेटमेंट व्हायरल झाल्यानंतर सिद्धूने एक्सवर पोस्ट शेअर करुन हा दावा फेटाळून लावला.
सिद्धू सोबत असच घडलं
“मी कधी असं म्हटलेलं नाही. खोट्या गोष्टी पसरवू नका. मी कधी असा विचार केलेला नाही. तुम्हाला लाज वाटली पाहिजे” असं नवज्योत सिंह सिद्धूने पोस्ट शेअर करताना लिहिलं. सिद्धूची पोस्ट खूप व्हायरल होतेय. असं होण्याची ही पहिली वेळ नाहीय. सोशल मीडियाच्या विश्वात अनेकदा प्रसिद्ध व्यक्तीमत्वाच्या नावानो खोट्या पोस्ट व्हायरल होतात. सिद्धू सोबत असच घडलं.
राजकारणाच्या पीचवर सुद्धा बॅटिंग
20 ऑक्टोंबर रोजी नवज्योत सिंह सिद्धूने आपला 62 वा वाढदिवस साजरा केला. नवज्योत सिंह सिद्धू त्याच्या काळात भारतीय फलंदाजीचा कणा होता. ओपनिंगला आणि मधल्या फळीत तो खेळायचा. क्रिकेटशिवाय त्याने राजकारणाच्या पीचवर सुद्धा बॅटिंग केली आहे. नवज्योत सिंह सिद्धूचा जन्म 20 ऑक्टोंबर 1963 रोजी पंजाबच्या पतियाळा येथे झाला. 1983 ते 1999 पर्यंत तो टीम इंडियाकडून खेळला. 2001 साली नवज्योत सिंह सिद्धूने कॉमेंटेटर म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. 2004 साली त्याने राजकीय इनिंग सुरु केली.