नवी दिल्ली | 7 ऑक्टोबर 2023 : भारतासाठी आजचा दिवस अत्यंत अनमोल असा ठरला आहे. भारतीय खेळाडूंनी आशियाई स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करत पदकांची लयलूट केली आहे. भारताने या स्पर्धेत आतापर्यंत 100 पदके पटकावली आहेत. यात 25 सूवर्ण, 35 रजत आणि 40 कांस्य पदकांचा समावेश आहे. भारताच्या या ऐतिहासिक कामगिरीवर सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. भारताने आजही तीन गोल्ड मेडल, एक रजत आणि एक कांस्य पदक जिंकलं आहे. नागपूरच्या ओजस देवतळेनेही दमदार कामगिरी करत सूवर्ण पदकाला गवसणी घातली आहे. त्यामुळे ओजसवर सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
चीनमध्ये गेल्या 14 दिवसांपासून आशियाई स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी करत पदकांची लयलूट करण्यास सुरुवात केली आहे. भारताने आजच्या दिवसातच पाच पदकांची कमाई केली आहे. कंपाऊंड तिरंदाजीत अदिती स्वामीने कांस्य, ज्योती वेन्नमने सूवर्ण, ओजस देवतळेने सूवर्ण आणि अभिषेक वर्माने रजत पदक मिळवलं आहे. तर महिला कबड्डी टीमनेही सूवर्णपदक मिळवलं आहे.
ओजस प्रवीण देवतळेने कंपाऊंड तिरंदाजीत सूवर्ण पदक पटकावण्याची कामगिरी केली आहे. त्याच्या या कामगिरीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचं कौतुक केलं आहे. दृढ संकल्प आणि एकाग्रता यामुळे ओजसने चाांगली कामगिरी केली आहे. त्याने सूवर्ण पदक जिंकून देशाचा गौरव वाढवला आहे, असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
आशिया स्पर्धेतील तिरंदाजीच्या वैयक्तिक प्रकारात ओजसेन सूवर्ण पदक जिंकलं आहे. त्याची अंतिम लढत त्याचाच सहकारी अभिषेक वर्मा विरोधात होती. ओजसच्या आईवडिलांनी घरी बसून हा सामना पाहिला. ओजसने पदक जिंकताच त्याच्या कुटुंबीयांनी एकच जल्लोष केला. ओजसने आर्चरी मिक्स कंपाऊंडमध्ये भारताला सूवर्ण पदक मिळवून दिलं होतं.
Congratulations to Ojas Praveen Deotale for striking Gold in the Compound Archery Men’s Individual event at the Asian Games. His precision, determination and unwavering focus have done it again and made our nation proud. pic.twitter.com/Eu5rZb9wBQ
— Narendra Modi (@narendramodi) October 7, 2023
ओजसच्या या यशाबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओजसचे कौतुक केलं होतं. फडणवीस यांनी ओजसचे वडील प्रवीण देवतळे आणि आई अर्चना देवतळे यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून त्यांचंही अभिनंदन केलं होतं.
ओजसला लहानपणापासून तिरंदाजीमध्ये आवड होती. त्याचा गोल ठरला होता आणि त्या दिशेने प्रयत्न करत होता. त्याने शालेय, राज्य आणि देशपातळीवर आपलं कौशल्य दाखवत अनेक मेडल मिळविले आहेत. मात्र देशाचा झेंडा सातासमुद्रापार फडकविण्याचा त्याचा निर्धार होता. त्यात त्याने स्वतःला झोकून देते मोठं यश मिळवलं आहे. त्याने एशियन गेममध्ये गोल्ड मिळवून देशाचा नावलौकिक केला आहे.