ट्रेनचे तिकीट सुद्धा नाही मिळाले, जनरल कोचच्या टॉयलेटजवळ बसून पहिलवानांचा राष्ट्रीय स्पर्धेसाठी प्रवास, क्रीडा खात्याला लाज वाटते का?

69th National School Games Championship: क्रीडा खात्यातील महाघोटाळ्यांची मालिका प्रत्येक राज्यात आहे. भारत ऑलम्पिक स्पर्धा आयोजित करण्याचे स्वप्न पाहत आहे. पण खेळाडूंना पायाभूत सुविधा देण्यात अजूनही आपण अगदी अतिमागास आहोत हे पुन्हा सिद्ध झाले आहे. हे वृत्त वाचल्यावर तुमच्या पण तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही.

ट्रेनचे तिकीट सुद्धा नाही मिळाले, जनरल कोचच्या टॉयलेटजवळ बसून पहिलवानांचा राष्ट्रीय स्पर्धेसाठी प्रवास, क्रीडा खात्याला लाज वाटते का?
क्रीडा खात्याची लक्तरं वेशीवर
| Updated on: Dec 24, 2025 | 3:46 PM

Odisha Wrestlers Journey: भारत ऑलम्पिक स्पर्धा आयोजित करण्याचे स्वप्न रंगवत आहे. पण इथं खेळाडूंना सामान्य सोयी-सुविधा मिळवण्यात अडचणींचा डोंगर असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. ओडिशा राज्यातील जवळपास 18 शाळेतील खेळाडूंचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. उत्तर प्रदेशातील बलिया येथे 69 व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. तिथे रेसलिंग चॅम्पियनशिपसाठी हे पहिलवान ओडिशातून निघाले. इतक्या कडाक्याच्या थंडीत पुरेशे उबदार कपडे नसतानाही त्यांचा हा प्रवास तुमचे हृदय पिळवटून टाकल्याशिवाय राहणार नाही. या खेळाडूंना उत्तर प्रदेशमध्ये जाण्यासाठी कोणतीही तयार करण्यात आली नाही. ट्रेनची तिकीटं सुद्धा उपलब्ध करुन देण्यात आली नाही. ऐनवेळी कशीबशी तिकीटं मिळवून जनरल क्लासच्या टॉयलेटजवळ बसून प्रवास करण्याची वेळ या खेळाडूंवर आली आहे. यामुळे देशातील क्रीडा खात्याला लाज कशी वाटत नाही, असा संतप्त सवाल समाज माध्यमावर विचारल्या जात आहे.

हा व्हिडिओ या महिन्याच्या, डिसेंबर 2025 च्या सुरुवातीचा असल्याचा दावा करण्यात येत आहे. हा व्हिडिओ आता लिक झाला असून देशभरात क्रीडा खात्याविरोधात संतापाची लाट उसळली आहे. तर गलेलठ्ठ पगारावरील क्रीडा अधिकार्‍यांना बाहेर हाकला असा सूर सोशल मीडियावर उमटू लागला आहे. ओडिशाच्या अधिकार्‍यांनी या खेळाडूंसाठी रेल्वे तिकिटाची व्यवस्था केली नाही. त्यामुळे या खेळाडूंना वेळेवर टॉयलेटजवळ बसून प्रवास करावा लागला. अधिकार्‍यांच्या या कृतीमुळे कडाक्याच्या थंडीत या खेळाडूंना मोठ्या समस्येला तोंड द्यावं लागलं. या 18 जणांमध्ये 10 मुलं आणि 8 मुलींचा सहभाग होता. विशेष या खेळाडूंचा परतीचा प्रवास सु्द्धा असाच राहिल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांना तात्काळ घरचा रस्ता दाखवण्याची मागणी होत आहे. इतक्या कडाक्याच्या थंडीत इतका दूरचा प्रवास या खेळाडूंनी कसा केला असेल याची कल्पना न केलेली बरी. थंडी वाजू नये यासाठी हे खेळाडू अंग चोरुन एकमेकांशेजारी बसले होते. खेळण्याच्या जिद्दीने त्यांना हा खडतर प्रवास करावा लागला. तर आता त्यांच्या नावावर या अधिकाऱ्यांनी किती मलिदा लाटला याचा तपास झाला पाहिजे अशी मागणी समाज माध्यमांवर करण्यात येत आहे.

विरोधकांचा हल्लाबोल

दरम्यान याप्रकरणी आता विरोधक सक्रीय झाले आहेत. खेळाडू ते कोणत्याही भागातील असोत अशीच परिस्थिती असल्याचा आरोप करण्यात येत आहे. गेल्या दहा वर्षांत जाहिराती आणि प्रसिद्धीवर अधिक खर्च करण्यात आला. पण प्रत्यक्षात स्थितीत फारसा बदल झालेला नाही. तर ओडिशाच्या या उदाहरणावरून काँग्रेस नेते नवज्योती पटनायक यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. तरुण खेळाडूंच्या मनाला काय वेदना झाल्या असतील, याची भरपाई भाजप सरकार करू शकणार का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तर देशभरातील क्रीडा जगतातून याप्रकरणी संताप व्यक्त केला जात आहे. अनेक ठिकाणी अशीच स्थिती असल्याचा दावा करण्यात येत आहे. तर सोशल मीडियावर अशा असुविधांचे फोटो क्रीडा खात्याला, क्रीडा अधिकारी आणि क्रीडा मंत्र्यांना ट्विट करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.