
भारताचा मेहनती खेळाडू संजू सॅमसन (Sanju Samson) याने नाबाद 97 धावांची शानदार खेळी करत टीम इंडियाला टी20 वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये पोहोचवलं. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर काल झालेल्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध 5 विकेट्सनी विजय मिळवला. सॅनसने याने शेवटच्या ओव्हरमध्ये सिक्स आणि फोर मारून वेस्ट इंडिजने ठेवलेलं धावांचं टार्गेट पूर्ण केलं. विजयी होताच तो अतिशय भावूक झाला. मैदानावरच तो गुडघे टेकून बसला आणि देवाचे आभार मानले. सेमी फायनलमध्ये पहोचोताच टीम इंडियाच्या खेळाडूंचा आनंद गगनात मावेनासा झाला. सर्वांनीच संजूसोबत सेलिब्रेशन केलं आणि ड्रेसिंग रूममध्येही विजयाचं वातावरण होतं. त्याने त्याच्या बॅटलाही किस केलं.
5 शब्दांची पोस्ट.. कौतुकाचा वर्षाव
त्याच्या कारकिर्दीतील कदाचित सर्वोत्तम खेळी खेळल्यानंतर, संजू सॅमसनने सोशल मीडियावर त्याच्या भावना शेअर केल्या. त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर विजयानंतर मैदानावर बसलेला स्वतःचा एक फोटो शेअर केला आणि अवघ्या 5 शब्दांची कॅप्शन त्यासोबत लिहीली. It was all worth it – असं त्याने लिहीलं. त्याच्या या पोस्टवर अवघ्या 10 तासांत 40 लाखांपेक्षा अधिक लाईक्स, रिॲक्शन्स आणि हजारो कमेंट्स आल्या असून अनेकांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
संजू सॅमसनने टी20 वर्ल्डकपमध्ये धावांचा पाठलाग करताना भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या. यापूर्वी, हा विक्रम विराट कोहलीच्या नावावर होता, त्याने ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानविरुद्ध नाबाद 82 धावा केल्या होत्या. सॅमसनची नाबाद 97 धावांची खेळी ही टी 20 वर्ल्डकप मध्ये यशस्वी धावसंख्येचा पाठलाग करतानाची चौथी सर्वोच्च धावसंख्या आहे. एवढंच नव्हे तर, 2010 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरेश रैनाच्या शतकानंतर, टी-20 वर्ल्डकपमध्ये भारतीय खेळाडूने केलेली ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे.
सामन्यानंतर, सॅमसन त्याच्या खेळीबद्दल स्पष्ट बोलला. तसेच त्याने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मधील त्याच्या अनुभवाबद्दल आणि विराट कोहली आणि रोहित शर्मा सारख्या दिग्गजांकडून शिकण्याबद्दलही सांगितलं.
काय म्हणाला संजू सॅमसन ?
पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये संजू सॅमसन म्हणाला – ” मला वाटतं म्हणूनच मी इतक्या दिवसांपासून या फॉरमॅटमध्ये खेळत आहे. मी 10-12 वर्षं आयपीएल खेळलो आहे आणि गेल्या 10 वर्षांपासून देशासाठी खेळलोय. जरी मी जास्त सामने खेळलो नसलो तरी, डगआउटवरून, विराट कोहली आणि रोहित शर्मा सारख्या दिग्गजांकडून मी खूप काही शिकलो आहे. ते काय करतात ते पाहणं आणि त्यातून शिकणं खरोखर महत्वाचं आहे, असं मला वाटतं. मी कदाचित फक्त 5060 सामने खेळलो असेल, परंतु मी जवळजवळ 100 सामने पाहिले आहेत. दिग्गज खेळाडू मॅच कशी संपवतात , आणि खेळानुसार त्यांच्या रणनीती कशा जुळवून घेतात ते मी पाहिलं आहे, शिकलो आहे ” असे तो म्हणाला.