
T20 World Cup 2026, Abhishek Sharma Fitness : टी20 वर्ल्ड कप 2026 (T20 World Cup 2026) मध्ये टीम इंडियाने (Team India) दमदार सुरुवात केली आहे. भारताने दोन सामने खेळले आणि दोन्ही जिंकलेत, त्यामुळे टीम इंडिया आपल्या गटात अव्वल स्थानावर आहे. मात्र असं असलं तर ग्रुप स्टेजमध्ये भारताचा सर्वात मोठा सामना, हा 15 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. पण या सामन्यापूर्वी भारतीय संघासाठी सर्वात मोठी चिंतेची बाब आहे, ती म्हणजे अभिषेक शर्माच्या आरोग्याबद्दल. पोटाच्या आजारामुळे तो नामिबियाविरुद्धच्या सामन्याला मुकला होता. मग आता पाकिस्तानविरुद्धच्या या मोठ्या मॅचमध्ये तरी खेळू शकेल की नाही, मैदानात उतरेल की नाही ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. टीम इंडियाच्याच वरूण चक्रवतीने याबद्दल उत्तर दिलं आहे.
अभिषेक शर्माच्या प्रकृतीबाबत मोठे अपडेट्स
टी-20 वर्ल्डकपमध्ये अमेरिकेविरुद्धच्या सामन्यानंतर रुग्णालयात दाखल झालेल्या सलामीवीर अभिषेक शर्माच्या तंदुरुस्तीबद्दल भारतीय स्पिनर, वरुण चक्रवर्तीने सकारात्मक अपडेट दिले आहे. त्या सामन्यात तो डकवर आऊट झाला आणिला आणि नामिबियाविरुद्धचा सामनाही तो खेळू शकला नाही. मात्र आता त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे आणि तो सामन्यादरम्यान डगआउटमध्ये उपस्थित होता. नामिबियाविरुद्धच्या सामन्यानंतर, वरुण चक्रवर्ती यानेही आता एक महत्त्वाची अपडेट दिली. अभिषेकने नामिबियाच्या सामन्यापूर्वी सराव केला होता आणि त्याची प्रकृती चांगली दिसत होती. त्यामुळे आता आगामी सामन्यांमध्ये अभिषेक खेळेल अशी आशा त्याने व्यक्त केली.
वरुण चक्रवर्ती म्हणाला, “मला वाटतं तो पुढचा सामना खेळेल. मला खात्री नाही, पण मी त्याच्याशी बोललो, तो ठीक आहे असं दिसतंय. त्याने आज काही काळ सरावही केला. तो लवकरच पुनरागमन करू शकतो” असं त्याने सांगितल्याचं वरूणने नमूद केलं. मात्र, अभिषेक आणखी एक किंवा दोन सामने गमावू शकतो असं भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉसच्या वेळी सांगितलं होतं. त्यामुळे, जर अभिषेक कोलंबोला पोहोचेपर्यंत निरोगी असेल आणि खेळण्यास तयार असेल तर तो स्पर्धेतील सामन्यांत दिसू शरतो.
विजयासह मिळणार सुपर-8 चं तिकीट
दरम्यान, पाकिस्तानविरुद्धचा पुढचा सामना हा हाय-व्होल्टेज सामना टीम इंडियासाठी महत्त्वाचा असेल. विजयामुळे सुपर ८ मध्ये स्थान निश्चित होईल. सध्या, भारतीय संघ दोनपैकी दोन सामने जिंकून पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे. तर पाकिस्ताननेही त्यांचे दोन्ही सुरुवातीचे सामने जिंकले आहेत. त्यांचेही चार गुण आहेत, म्हणजेच हा सामना जिंकणारा संघ थेट सुपर 8 साठी पात्र ठरेल. त्यामुळे हा सामना चुरशीचा होणार हे नक्की…