
ICC T-20 World Cup : आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेची जगभरात चर्चा आहे. या स्पर्धेत भारताने उपान्त्य फेरीत मजल मारली आहे. येत्या 5 मार्च रोजी भारत आणि इंग्लंड यांच्याविरोधात सामना होणार आहे. क्रिकेटच्या मैदानातील भारताचा पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानला मात्र यावेळी फारची चांगली कामगिरी करता आलेली नाही. पाकिस्तान उपान्त्य फेरीपर्यंतही पोहोचू शकला नाही. दरम्यान, पाकिस्तानी खेळाडूंची ही खराब कामगिरी लक्षात घेऊन या खेळाडूंना दंड ठोठवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. असे असतानाच पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदी याने पाकिस्तानाच्या खेळाडूंना चांगलेच सुनावले आहे. त्याने काही खेळाडूंना थेट बाहेरचा रस्ता दाखवायला हवा, असं मोठं विधान केलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तान क्रिकेट बोर्ड अर्थात पीसीबीने त्यांच्या खेळाडूवर तब्बल 50 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. शिस्तभंग केल्यामुळे नव्हे तर टी-20 विश्वचषकात चांगली कामगिरी न करू शकल्यामुळे हा दंड ठोठावण्यात आला आहे. साखळी सामन्यात भारताने पाकिस्तानचा 61 धावांनी पराभव केला. एवढ्या मोठ्या फरकाने सामना गमवावा लागल्याने पाकिस्तानी खेळाडूंवर ही कारवाई करण्यात आली आहे.
पाकिस्तानी क्रिकेट संघाचे माजी कर्णधार तसेच अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळख असलेल्या शाहीद आफ्रिदी यांनी पाकिस्तानी खेळाडूंवर मोठा संताप व्यक्त केला आहे. त्यांनी 50 लाख रुपयांचा दंड खूपच कमी आहे. आणखी जास्त दंड लावायला हवा होता, असे मत आफ्रिदी यांनी व्यक्त केले. तसेच पाकिस्तानी संघातील काही खेळाडूंना थेट दोन-दोन वर्षांसाठी घरी बसवायला हवे. त्यांना संघात स्थान द्यायला नको, असेही आफ्रिदी म्हणाले आहेत.
दरम्यान, पाकिस्तानी संघातील सर्वच खेळाडूंवर हा दंड ठोठावण्यात आला आहे. पाकिस्तानी संघातील शाहीदजादा फरहान या खेळाडूने चांगली कामगिरी केली. उर्वरित खेळाडू फार काही कमाल दाखवू शकलेले नाहीत. दरम्यान, आता शाहीद आफ्रिदी यांच्या या मताचा गांभीर्याने विचार केला जाणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.