T20 World Cup 2026 : फॉर्मसाठी धडपडणाऱ्या अभिषेक शर्माला ऑस्ट्रेलियाई दिग्गज रिकी पाँटिंग एवढचं बोलला की, तू फक्त..

T20 World Cup 2026 : चालू टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा ओपनर अभिषेक शर्माचा धावांसाठी संघर्ष सुरु आहे. झिम्बाब्वे विरुद्ध अर्धशतकाचा अपवाद वगळता त्याला एकाही सामन्यात दमदार कामगिरी करता आलेली नाही. त्याला पाँटिंगने एक महत्वाचा सल्ला दिला आहे.

T20 World Cup 2026 : फॉर्मसाठी धडपडणाऱ्या अभिषेक शर्माला ऑस्ट्रेलियाई दिग्गज रिकी पाँटिंग एवढचं बोलला की, तू फक्त..
Abhishek Sharma
Image Credit source: PTI
| Updated on: Mar 04, 2026 | 1:19 PM

टीम इंडियाचा ओपनर अभिषेक शर्मा टी20 मधला नंबर 1 फलंदाज आहे. पण सध्या त्याचा धावांसाठी संघर्ष चालू आहे. यंदाचा टी20 वर्ल्ड कप त्याला लक्षात ठेवायला अजिबात आवडणार नाही. कारण सुपर-8 राऊंडमध्ये झिम्बाब्वे विरुद्ध अर्धशतकाचा अपवाद वगळता त्याला एकाही सामन्यात दमदार कामगिरी करता आलेली नाही. वेस्ट इंडिज विरूद्धच्या करो या मरो सामन्यात तो अपयशी ठरला. फक्त 10 रन्स करुन त्याने पॅव्हेलियनची वाट धरली. स्पिनर विरुद्ध अभिषेक शर्मा पुन्हा एकदा अपयशी ठरला. शिमरॉन हेटमायरला त्याने एक सोपा झेल दिला.

आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये खेळल्या गेलेल्या सहा सामन्यात अभिषेकने फक्त 80 धावा केल्या आहेत. USA, पाकिस्तान आणि नेदरलँड्स विरूद्धच्या सामन्यात तो शुन्यावर आऊट झाला. खराब फॉर्मचा सामना करणाऱ्या अभिषेक शर्माला ऑस्ट्रेलियाई दिग्गज रिकी पाँटिंगने सल्ला दिला आहे. वानखेडे स्टेडियमवर 5 मार्च रोजी होणार्‍या सेमीफायनल सामन्याआधी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार पाँटिंगने हा सल्ला दिला आहे. मानसिक दृष्ट्‍या ताजातवाना हो आणि रिलॅक्स हो असा सल्ला पाँटिंगने अभिषेकला दिला आहे.

पाँटिंगने काय सल्ला दिला?

“जेव्हा तुम्ही खराब फॉर्मचा सामना करत असता तेव्हा प्रत्येकवेळी नेट्समध्ये जाऊन तास-दीडतास प्रॅक्टिस करणं आवश्यक नाहीय. काहीवेळा मानसिक दृष्टया ताजातवाना होण्यासाठी सुट्टी घेणं केव्हाही चांगलं. तुमचं कौशल्य तुमच्यापासून दूर जाणार नाही” असं पाँटिंग म्हणाला. “अशा प्रकारच्या टुर्नामेंटमध्ये जेव्हा तुम्ही सतत दबावाखाली असता. रिझल्ट अपेक्षित येत नाही. त्यावेळी नेट्समध्ये जाऊन थोडी गोलंदाजी करावी, फिल्डिंग करावी” असं पाँटिंग म्हणाला.

अभिषेकला बाहेर बसवायचं तर कोणाला टीममध्ये इन करायचं?

“रिकी पाँटिंगने अभिषेक शर्मावर विश्वास व्यक्त केला. त्याचा इंग्लंड विरुद्ध चांगला रेकॉर्ड आहे. त्यामुळे हेड कोच गौतम गंभीरने त्याला टीममधून ड्रॉप करु नये” असं पाँटिंग म्हणाला. मागच्यावर्षी जानेवारी महिन्यात वानखेडेवर इंग्लंड विरुद्ध पाचव्या अखेरच्या टी20 सामन्यात अभिषेक शर्माने शतकी खेळी साकारली होती. संघ व्यवस्थापनाला सेमीफायनलच्या महत्वाच्या सामन्यात अभिषेकला ब्रेक द्यायचा असेल तर रिंकू सिंहचा टीममध्ये समावेश करावा असा पाँटिंगने सुचवलं आहे. “अभिषेकचा दिवस असतो तेव्हा तो मॅच विनर असतो. तुम्ही त्याला बाहेर बसवून रिंकूचा टीममध्ये समावेश करणार असाल तर तुम्ही दुसऱ्या मॅचविनरला टीममध्ये आणता आहात” असं पाँटिंग म्हणाला.

 

Follow Us