क्वारंटाईन संपला, रोहित शर्माचं जंगी स्वागत, तिसऱ्या कसोटीसाठी सज्ज

| Updated on: Dec 30, 2020 | 5:43 PM

भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हिटमॅन रोहित शर्माचा (Rohit Sharma) क्वारंटाईन पिरियड आता संपला आहे (Warm Welcome of Rohit Sharma in team India)

क्वारंटाईन संपला, रोहित शर्माचं जंगी स्वागत, तिसऱ्या कसोटीसाठी सज्ज
Follow us on

सिडनी (ऑस्ट्रेलिया) : भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हिटमॅन रोहित शर्माचा (Rohit Sharma) क्वारंटाईन पिरियड आता संपला आहे. गेल्या चौदा दिवसांपासून तो ऑस्ट्रेलियातील एका हॉटेलमध्ये क्वारंटाईन होता. मात्र, आता त्याचा क्वारंटाईन पिरियड संपल्याने त्याला टीम इंडियाला भेटण्यासाठी परवानगी मिळाली. बीसीसीआयच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर ऑस्ट्रेलियात टीम इंडियाकडून कशाप्रकारे रोहित शर्माचं स्वागत करण्यात आलं, याचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. रोहित शर्माचं मनापासून स्वागत, असं कॅप्शन व्हिडीओला देण्यात आलं आहे. या व्हिडीओत रोहित शर्मा अनेक खेळाडूंसोबत गळाभेट घेताना दिसत आहे. रोहितच्या येण्याने अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे (Warm Welcome of Rohit Sharma in team India).

भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. एकदिवसीय आणि टी-ट्वेन्टी मालिका खेळल्यानंतर आता उभयतांमध्ये कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. पहिल्या कसोटीत भारताचा ऐतिहासिक पराभव झाला. मात्र, दुसऱ्या कसोटीत भारताने त्या पराभवाचा बदला घेतला. भारताने दुसरी कसोटी 8 विकेट्सने जिंकली. सध्या दोन्ही संघ मालिकेत बरोबरीत आहेत. यामुळे आगामी तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिकेत आघाडी घेण्याचा मानस दोन्ही संघांचा असणार आहे. या कसोट मालिकेतील तिसरा सामना 7 जानेवारी 2020 मध्ये खेळण्यात येणार आहे. हा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर खेळला जाणार आहे (Warm Welcome of Rohit Sharma in team India).

दरम्यान, कर्णधार विराट कोहली पहिली कसोटी खेळल्यानंतर मायदेशी परतला. तर टीम इंडियाचा विकेट टेकर बोलर मोहम्मद शमी जायबंदी झाला आहे. अशातच टीमला अनुभवी खेळाडूची गरज भासणार होती. हीच गरज पूर्ण करायला रोहित शर्मा ऑस्ट्रेलियात दाखल झाला. मात्र, ऑस्ट्रेलिया सरकारच्या प्रोटोकॉलनुसार त्याला 14 दिवस क्वारंटाईन राहावं लागलं. त्यामुळे त्याला दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळता आलं नाही. मात्र, पुढच्या दोन्ही कसोटीत त्याला खेळता येणार आहे. टीम इंडियामध्ये तिसऱ्या सामन्यात मयंकला डच्चू देऊन रोहितला स्थान देण्यात येऊ शकते.

रोहितची ऑस्ट्रेलियातील कामगिरी

रोहित ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकूण 5 कसोटी सामने खेळला आहे. यामध्ये त्याने 31 च्या सरासरीने 279 धावा केल्या आहेत. नाबाद 63 ही त्याची ऑस्ट्रेलियाविरोधातील सर्वोच्च धावसंख्या राहिली आहे.

रोहितने क्वारंटाईन पिरियडमध्ये काय केलं?

रोहित शर्माने क्वारंटाईन पिरियडमध्ये आपल्या खोलीमध्ये राहून फिटनेसकडे संपूर्ण लक्ष दिलं. यासाठी लवकर उठून तो खास व्यायाम करायचा. स्वत:ला फिट ठेवण्यासाठी तो कष्ट घेत होता. ऑस्ट्रेलियातमध्ये कोरोना पेशंट्सची संख्या वाढायला सुरुवात झाल्याने सरकारने कोरोनासंबंधीचे काही नियम बनवले आहेत.

आयपीएल संपल्यानंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी दुबईहून निघाली होती. मात्र वडिलांची प्रकृती स्थिर नसल्याने रोहित मुंबईत परतला होता. यानंतर रोहितने काही दिवस बंगळुरुतील राष्ट्रीय क्रिकेट एकेडमीत सराव केला. तसेच फिटनेस टेस्ट दिली. या फिटनेस टेस्टमध्ये पास झाल्यानंतर रोहित सिडनीला रवाना झाला होता.

हेही वाचा : Ind vs Aus | सिडनीची पसंती कांगारुंना, मात्र 42 वर्षांचा इतिहास बदलण्यास टीम इंडिया सज्ज