IPL 2021 | आयपीएलचा 14 वा मोसम स्थगित, उर्वरित सामन्यांचं काय? जाणून घ्या सविस्तर

| Updated on: May 04, 2021 | 6:57 PM

आयपीएलच्या 14 व्या मोसमात (IPL 2021) आतापर्यंत 29 सामने खेळवण्यात आले आहेत. तर 31 सामने बाकी आहेत. त्यामुळे हे उर्वरित सामने केव्हा खेळवण्यात येणार, असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे.

IPL 2021 | आयपीएलचा 14 वा मोसम स्थगित, उर्वरित सामन्यांचं काय? जाणून घ्या सविस्तर
sourav ganguly anurag thakur
Follow us on

मुंबई | कोरोनामुळे (Corona) आणि खेळाडूंना बाधा झाल्याने बीसीसीआयने (BCCI) आयपीएलच्या 14 व्या (IPL 2021) मोसमातील उर्वरित सामने स्थगित करण्याचा निर्णय घेतला. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने ट्विट करत याबाबतची माहिती दिली. यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये नाराजीचं वातावरण पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या नको असेलेल्या पॉझिटिव्हीटीमध्ये आयपीएलमुळे चाहत्यांचं मनोरंजन होत होतं. मात्र अखेर स्पर्धा स्थगित झाली. यामुळे या मोसमातील उर्वरित सामन्याचं आयोजन केव्हापर्यंत होणार, असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. याबाबतच उत्तर आयपीएलचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी दिलं आहे. (When will the remaining matches of the 14th season of indian premier league take place)

पटेल काय म्हणाले?

“आयपीएलचा14 वा मोसम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. आम्ही उर्वरित सामन्यांचे आयोजन पुढील उपलब्ध वेळेत करण्याचे प्रयत्न करु. मात्र हे आयोजन मे महिन्यात शक्य नाही”,असं पटेल यांनी नमूद केलं. ते पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलत होते. यावेळेस त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. 14 व्या हंगामात साखळी फेरीतील 56 आणि बाद फेरीतील 4 असे एकूण 60 सामने खेळवण्यात येणार आहेत. त्यापैकी साखळी फेरीतील 29 सामने खेळवण्यात आले आहेत. त्यामुळे आता उर्वरित सामन्यांसाठी चाहत्यांना वाट पाहावी लागणार आहे.

पुढील काही महिन्यांमध्ये विविध क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. साधारणपणे एप्रिल-मे महिन्या दरम्यान आयपीएलचं आयोजन करण्यात येतं. मात्र आता आयपीएलच्या उर्वरित सामन्याचं आयोजन करणं हे बीसीसीआयसाठी आव्हानात्मक आहे. कोरोनामुळे एप्रिल-मे 2020 मध्ये आयपीएलं आयोजन करता आलं नाही. त्यामुळे बीसीसीआयने या स्पर्धेचं आयोजन सप्टेंबर-ऑक्टोबर 2020 मध्ये यूएईमध्ये केलं. तसेच या वर्षाअखेर टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजनही भारतात होणार आहे. त्यामुळे बीसीसीआयसमोर उर्वरित सामन्यांचे आयोजन करण्याचं तगडं आव्हान आहे.

किमान 1 महिन्याची आवश्यकता

उर्वरित सामन्यांसाठी किमान 1 महिन्याचा कालावधी अपेक्षित आहे. भारतीय खेळाडूंना सामन्यांसाठी वेळ काढणं शक्य आहे. मात्र परदेशी खेळाडूंना हे कितपत शक्य होईल, हा मोठा प्रश्न आहे. त्यात टीम इंडिया जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी इंग्लडला रवाना होणार आहे. टीम इंडिया 19 जून पासून न्यूझीलंड विरुद्ध विजेतपदासाठी भिडणार आहे. यानंतर जुलैपर्यंत टीम इंडियाच्या   खेळाडूंकडे वेळ असेल. मात्र त्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंना इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. मात्र त्या रिकामी वेळात खेळाडूंना भारतात बोलावून जूलैआधी आयपीएल स्पर्धेतील उर्वरित सामने खेळणंही शक्य नसेल.

सप्टेंबरमध्ये शक्यता

टीम इंडिया सप्टेंबरमध्ये इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिका संपवून भारतात परतेल. त्यानंतर न्यूझीलंड भारत दौऱ्यावर येणार आहे. ही मालिका टी 20 वर्ल्ड कपआधी पार पडणार आहे. तसेच यादरम्यान टी 20 मालिका खेळवण्यात येणार असल्याचीही चर्चा आहे. मात्र बीसीसीआय या वेळापत्रकात बदल करुन आयपीएलचं आयोजन करु शकते. या कालावधी दरम्यान इतर कोणत्याही संघाचा दौरा प्रस्तावित नाही. त्यामुळे उर्वरित सामन्यांचे आयोजन सप्टेंबरमध्ये करण्यात येऊ शकते.

सप्टेंबरमध्ये आयोजन करावं, अशी बीसीसीआय अधिकाऱ्यांचीही इच्छा आहे. बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी याबाबतची शक्यता व्यक्त केली. “या वर्षादरम्यान आयपीएलचं आयोजन करु शकतो का, याबाबतची शक्यता आम्ही पडताळून पाहणार आहोत. हे सप्टेंबरमध्ये शक्य होऊ शकतं. मात्र अजूनही ही शक्यताच आहे”, असं शुक्ला यांनी स्पष्ट केलं.

संबंधित बातम्या :

PHOTO | कोरोनाचा क्रीडाक्षेत्राला दणका, IPLसह ‘या’ मोठ्या स्पर्धा स्थगित

IPL 2021 | “वॉर्नरचा तळतळाट लागला”, आयपीएल स्थगितीनंतर सोशल मीडियावर मीम्सचा धुमाकूळ

(When will the remaining matches of the 14th season of indian premier league take place)