
India vs South Africa : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामना हा खऱ्या अर्थाने गतविजेत्या भारतासाठी टी20 वर्ल्ड कप 2026 मधील पहिली परिक्षा होता. टीम इंडियाच्या टी20 वर्ल्ड कपमधील सलग 12 विजयांना यामुळे ब्रेक लागला. 2024 च्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने सलग 8 आणि 2026 च्या वर्ल्ड कपमध्ये चार सामने जिंकले होते. टीम इंडियाचा काल दक्षिण आफ्रिकेने 76 धावांनी पराभव केला. दक्षिण आफ्रिकेने या विजयासह पराभवाची परतफेड केली असचं म्हणावं लागेल. कारण टीम इंडियाने याआधी 2024 च्या टी20 वर्ल्ड कप फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी नमवलं होतं. टी20 वर्ल्ड कपच्या इतिहासात भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या टीम्स आतापर्यंत नऊ वेळा आमने-सामने आल्या आहेत. त्यात त्यांनी तिसऱ्यांदा भारताविरुद्ध असा विजय मिळवला आहे.
दक्षिण आफ्रिकेने टी20 वर्ल्ड कपमध्ये 2009 साली भारताला 12 धावांनी आणि 2022 मध्ये 5 विकेट्सने हरवलं होतं. वर्ल्ड कपमधील पुढील सामन्याआधी टीम इंडियासाठी हा पराभव म्हणजे एक धडा आहे. कुठल्या कारणांमुळे पराभव झाला? त्याचा अभ्यास चुका सुधाराव्या लागतील. टी20 फॉर्मेटमध्ये अभिषेक शर्मा 193 च्या स्ट्राइक रेटने खेळतो. वर्ल्ड कप आधी तो सुपर फॉर्ममध्ये होता. पण वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्यापासून तो खराब फॉर्ममध्ये आहे. हा सगळ्यांसाठीच धक्का आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अभिषेक शर्माने दोन चौकार आणि एक षटकार मारुन 12 चेंडूत 15 धावा केल्या. यावर्षात अभिषेक शर्मा पाचवेळा शून्यावर आऊट झालाय. यात वर्ल्ड कपमध्येच तीन झिरो आहेत.
पावरप्लेमधील अपयश
अभिषेक शर्माच्या खराब फॉर्ममुळे पावर प्लेमध्ये टीम इंडियाची एकही मोठी पार्टनरशिप झाली नाही. त्याचा टीमला फटका बसतोय. अमेरिकेविरुद्ध 8 रन्सवर पहिली विकेट (अभिषेक 0), नामीबिया विरुद्ध 25 रन्सवर पहिली विकेट (संजू सॅमसन 22), पाकिस्तान विरुद्ध 1 वर पहिली विकेट (अभिषेक 0), नेदरलँड्स विरुद्ध 0 वर एक विकेट (अभिषेक 0) आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शुन्यवर विकेट (ईशान किशन 0) अजूनपर्यंत एकदाही भारतीय ओपनिंग जोडीने पावरप्लेचा पूर्ण फायदा उचलेला नाही. ते सुद्धा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभवाचं एक कारण आहे.
सुनील गावस्कर काय म्हणाले?
भारताचे माजी कर्णधार आणि कॉमेन्टेटर सुनील गावस्कर STAR SPORTS वर बोलताना म्हणाले की, ‘भारताची ही मोठी हार आहे. त्यांच्यासाठी धडा घेण्याची वेळ आहे’ “टीम इंडियाच्या फलंदाजांचं शॉट सिलेक्शन योग्य नव्हतं. तुम्ही पाहिलं असेल या पीचवर बॅटवर चेंडू नीट येत नव्हता, त्यावेळी दक्षिण आफ्रिकेचे डेविड मिलर आणि डेवाल्ड ब्रेविस यांनी कशी बॅटिंग केली व चांगला स्कोर उभा केला. पण भारतीय फलंदाज असं करु शकले नाहीत” असं सुनील गावस्कर म्हणाले.