World Cup 2019 : 10 दिवसात 4 सामने, आता खरा भारतीय संघाचा कस!

| Updated on: Jun 25, 2019 | 3:31 PM

विश्वचषक सामन्यात भारतीय संघाने आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. भारत सेमी फायनलच्या जवळ आहे. भारताने आतापर्यंत पाच सामने खेळले आहेत.

World Cup 2019 : 10 दिवसात 4 सामने, आता खरा भारतीय संघाचा कस!
Follow us on

लंडन : विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. भारताने आतापर्यंत चार सामने खेळले आहेत. या चारही सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने 9 गुणांची कमाई केली आहे.  भारताने दक्षिण अफ्रिकेविरुद्धचा पहिला सामना जिंकून विश्वचषकात झोकात सुरुवात केली. भारताचा दुसरा सामना 9 जूनला ऑस्ट्रेलिया, 13 ला न्यूझीलंड, 16 जूनला पाकिस्तान आणि 22 जूनला अफगाणिस्तान विरुद्ध झाला.  भारताच्या पहिल्या चार सामन्यांमध्ये अनेक दिवसांचं अंतर होतं. मात्र पुढील चार सामन्यात टीम इंडियाचा खरा कस लागणार आहे. येत्या 10 दिवसात भारताला हे चार सामने खेळावे लागणार आहेत.

भारताचा पुढील सामना वेस्ट इंडिजविरुद्ध 27 जून रोजी आहे. त्यानंतर भारताचा मुकाबला 30 जूनला इंग्लंडविरुद्ध,  2 जुलै रोजी बांगलादेशविरुद्ध आणि 6 जुलै रोजी श्रीलंकेविरुद्ध होणार आहे.

अफगाणिस्तानविरुद्धचा सामना सोडला, तर भारताची कामगिरी आतापर्यंत दमदार झाली आहे. पण आता तशीच कामगिरी भारताला कायम ठेवावी लागणार आहे.

भारतासाठी येणारे चार सामने महत्त्वाचे आहेत. या सामन्यात भारतीय खेळाडूंच्या क्षमतेची चाचणी न होता, विरुद्ध संघावर मात करण्याच्या रणनीतीचे परीक्षणही केले जाईल.

क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी 

भारताची फलंदाजी सर्वोत्तम मानली जाते. मात्र यंदाच्या विश्वकचषकात भारताने गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणानेही जगाचे लक्ष वेधून घेतलं.  गोलंदाजांना क्षेत्ररक्षकांची साथ मिळत आहे. भारतीय क्षेत्ररक्षकांनी अनेक अवघड झेल टीपत उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केले आहे. शिवाय भारतीय गोलंदाजीही अव्वल दर्जाची होत आहे. त्यामुळेच यंदा भारतीय संघाला विश्वचषकाचा प्रबळ दावेदार मानलं जात आहे.