
स्मार्टफोनच्या वापरामुळे आज आपलं आयुष्य सहज आणि तंत्रज्ञानाशी जोडलेलं झालं आहे. मात्र, अनेकदा आपण फोन स्लो होतोय, हँग होतोय यामुळे त्रासून जातो. मग काही जण लगेच सर्व्हिस सेंटरला धाव घेतात, तर काहीजण नवीन फोन घेण्याचा विचार करतात. पण एक छोटीशी सवय तुम्हाला हे खर्च वाचवू शकते, आणि तुमचा स्मार्टफोन पुन्हा नव्यासारखा स्मूद चालवू शकते. ती सवय म्हणजे—फोन रीस्टार्ट करणे!
वेळोवेळी फोनमध्ये टेम्पररी फायली, कॅशे डेटा आणि बॅकग्राउंड अॅप्स साठत जातात, जे फोनच्या प्रोसेसिंगवर परिणाम करतात. यामुळे फोन हँग होणे, अॅप्स क्रॅश होणे किंवा बॅटरी लवकर संपणे अशा समस्या दिसून येतात. यावर अतिशय सोपा उपाय म्हणजे आठवड्यातून एकदा फोन रीस्टार्ट करणे.
जेव्हा आपण फोन रीस्टार्ट करतो, तेव्हा RAM क्लियर होते, बॅकग्राउंडमध्ये चालणारी अॅप्स बंद होतात आणि संपूर्ण ऑपरेटिंग सिस्टम ‘रिफ्रेश’ होते. त्यामुळे फोन हलका, जलद आणि स्मूद चालतो. तसेच, फोनचा ‘क्रॅश’ होण्याचा धोका कमी होतो.
मोबाईल कंपन्यांचे वेगवेगळे सल्ले आहेत. Samsung च्या मते Galaxy फोन रोज रीस्टार्ट केला पाहिजे, तर T-Mobile आणि इतर एक्सपर्ट्सच्या मते आठवड्यातून एकदा तरी फोन रीस्टार्ट करणं पुरेसं आहे. काही तज्ञ आठवड्यातून २-३ वेळा रीस्टार्ट करणेही फायदेशीर मानतात.
फोन रीस्टार्ट केल्यावर बॅकग्राउंड प्रोसेसेस थांबतात, जे बॅटरीचा अनावश्यक वापर करतात. त्यामुळे फोनवर एकाच चार्जमध्ये अधिक वेळ काम करता येतं आणि बॅटरी लाइफही चांगली राहते.
कधी कधी फोनमध्ये काही संशयास्पद अॅप्स किंवा नेटवर्क कनेक्शन्स वापरकर्त्याला न कळता चालू राहतात. रीस्टार्ट केल्याने अशा अॅक्टिव्हिटीज थांबतात आणि सिक्युरिटी सॉफ्टवेअर नव्याने सुरू होऊन संभाव्य जोखमीपासून संरक्षण मिळते.
कधी फोन Wi-Fi किंवा मोबाइल नेटवर्कला नीट कनेक्ट होत नाही. अशा वेळी रीस्टार्ट केल्यास नेटवर्क पुन्हा रिफ्रेश होतं आणि कनेक्टिव्हिटी समस्या दूर होतात. हे एक प्रकारचं ‘मिनी रिसेट’ म्हणून कार्य करतं.
विशेष तज्ज्ञ सांगतात की दररोज अनेक वेळा फोन रीस्टार्ट करणं आवश्यक नाही. यामुळे कोणताही अतिरिक्त फायदा होत नाही आणि इंटर्नल कंपोनेंट्सवर काहीसा ताण येऊ शकतो. त्यामुळे आठवड्यातून एकदा फोन रीस्टार्ट करणं हे एक परिपूर्ण आणि योग्य उपाय आहे.