फसवेगिरीला चाप, कॉलरचा खोटारडेपणा उघड होणार, पण लफड्यावाल्यांची मोठी पंचाईत होणार

TRAI DoT : फोनवरील फसवेगिरीला आता आळा बसणार आहे. कॉलरचा खोटारडेपणा लवकरच उघडा होईल. पण या नवीन सुविधेमुळे काही जणांची मात्र चांगलीच पंचाईत होणार आहे. त्यांना लपवाछपवी करता येणार नाही.

फसवेगिरीला चाप, कॉलरचा खोटारडेपणा उघड होणार, पण लफड्यावाल्यांची मोठी पंचाईत होणार
| Updated on: Oct 29, 2025 | 1:16 PM

अनोळखी क्रमांकावर फोन आल्यावर आणि टेलेकॉलर्समुळे अनेक जण रोज हैराण असतात. कधी कधी तर हा कॉल घ्यावा की नाही अशा संभ्रमात काहीजण असतात. पण आता युझर्सची ही समस्या लवकरच दूर होणार आहे. आता मोबाईलची रिंग वाजल्यानंतर लागलीच फोन क्रमांक तर दिसेलच पण त्यासोबत हा नंबर ज्याच्या नावावर नोंदवलेला आहे. त्याचे नावही समोर येईल. हे नवीन फीचर एका आठवड्यात सुरू होणार आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी (TRAI) आणि डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन्सने (Department of Telecommunications- DoT) ही सुविधा सुरू केली आहे. विशेष म्हणजे हे फीचर आपोआप सुरू होईल. पण यामुळे लफडेबाजांचे मात्र धाबे दणाणणार आहे. कारण मोबाईलवर कुणाचा कॉल आला, त्या व्यक्तीचे नाव दिसेल. अनेकांनी वेगवेगळ्या नावांनी मोबाईलमध्ये नावं सेव्ह केलेले असते. पण आता स्क्रीनवर खरं नाव समोर येईल.

या नवीन फीचरमुळे स्कॅम आणि स्पॅम कॉलची लागलीच ओळख होईल. नागरिकांची फसवणूक रोखणे आणि डिजिटल सुरक्षा वाढवण्यासाठी हे पाऊल टाकण्यात आले आहे. ही सेवाची सुरुवात 4G आणि त्यावर आधारीत नेटवर्कवर सुरु होईल. यामुळे सामान्यांची खोट्या कॉलपासून सुटका होईल. 2G आणि 3G वर बँडविड्थ कमी असल्याने तांत्रिक अडचण आहे. त्यामुळे या सेवाचा वापर करणाऱ्या कॉलरचे नाव समोर येणार नाही.

60 दिवसांपर्यंत प्रयोग

मनीकंट्रोलच्या वृत्तानुसार, DoT ने टेलिकॉम रेग्युलेटरला याविषयीचे निर्देश दिले. त्यानुसार ऑपरेटर्सने 4G आणि नेटवर्कसाठी कॉलिंग नेम प्रेझेंटेशन (CNAP) सेवेचे ट्रायल यशस्वीरित्या पूर्ण करता येणार आहे. ही सुविधा एका आठवड्यात सुरु होत आहे. आता तुमच्या मोबाईलवर पण कॉलरचे नाव दिसेल. जर एखाद्या जुन्या मित्राने तुम्हाला कॉल केला आणि त्याचे नाव तुमच्याकडे सेव्ह नसेल तर आता त्याला ओळखणे अवघड नसेल. मनीकंट्रोलने सूत्रांच्या आधारे दिलेल्या माहितीनुसार, ऑपरेटर्सला हा पथदर्शी प्रकल्प सुरू करण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. हा पायलट प्रकल्प पुढील 60 दिवसांपर्यंत सुरू असेल. हा प्रयोग यशस्वी झाल्यावर तो लागलीच देशभरात लागू होईल. टेलिकॉम कंपन्यांना याविषयीचा दर आठवड्याचा अहवाल सरकारकडे सादर करावा लागणार आहे. अंमलबजावणी करताना काही अडचण येत असेल तर या अहवालामुळे ती दूर होईल.

एक मोठा दिलासा

यापूर्वी ही सेवा जर सुरू करण्याची विनंती केली तरच लागू होईल असे ठरले होते. पण DoT या मुद्दावर तयार नव्हती. ऑपरेटर्सने सरसकट ही सेवा देण्याचे मंत्रालयाने निर्देश दिले. त्यानंतर मोबाईल नंबर कनेक्शन घेताना जे आयडी प्रुफ देण्यात येते. त्याआधारे जे नाव नोंदवल्या जाईल. तेच नाव समोरच्या व्यक्तीला दिसणार आहे.

पण काही लोकांना यामुळे मोठी अडचण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी दिलासा देण्यात आला आहे. जर एखाद्याला ही सुविधा नको असेल तर त्याला ही सेवा डिॲक्टिवेट करता येईल. त्याला ही सुविधा नाकारता येईल. त्यानंतर त्याच्या स्क्रीनवर अनोळखी नंबरवरून आलेल्या कॉलरचे नाव दिसणार नाही. मुंबई आणि हरियाणा सर्कलमध्ये गेल्यावेळी टेलिकॉम कंपन्यांनी ट्रायल रन घेतला होता.