
आजच्या डिजिटल युगात बहुतांश लोक वॉलेट न बाळगता फक्त मोबाइलद्वारे UPI वापरून व्यवहार करतात. मात्र, आज १ एप्रिल २०२५ पासून जर तुमचा असा कोणता मोबाइल नंबर जो बऱ्याच काळापासून बंद असेल आणि तोच नंबर UPIशी लिंक असेल, तर तुम्ही UPI द्वारे व्यवहार करू शकणार नाही. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने UPI व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी काही नवीन नियम लागू केले आहेत. जे वापरकर्त्यांना जाणून घेणे गरजेचे आहे.
१. न वापरलेले नंबर UPI साठी निष्क्रिय होतील
जर बँकेत नोंदलेला तुमचा मोबाइल नंबर ९० दिवसांपेक्षा अधिक काळ वापरात नसेल, तर संबंधित UPI आयडी आपोआप बंद होईल. टेलिकॉम कंपन्यांच्या नियमानुसार, असा नंबर बंद करून दुसऱ्या वापरकर्त्याला दिला जातो. अशा नंबरांना ‘चर्न्ड’ किंवा ‘रीसायकल्ड’ म्हणतात.
NPCI ने बँकांना व UPI अॅप कंपन्यांना दर आठवड्याला ग्राहकांच्या नंबरची स्थिती तपासण्याचे आदेश दिले आहेत, ज्यामुळे फसवणूक व चुकीचे व्यवहार टाळले जातील.
जर तुमचा जुना नंबर दुसऱ्या व्यक्तीकडे गेला, तर त्याच्यावर आधीची UPI ID चालणार नाही. त्यामुळे तुमच्या खात्याशी संबंधित कोणतीही माहिती नव्या वापरकर्त्याला मिळणार नाही.
बँका व अॅप्सना आता ग्राहकांकडून न्यूमेरिक UPI ID वापरण्याची स्पष्ट परवानगी घ्यावी लागेल. ही सेवा ‘ऑप्ट-आउट’ स्वरूपात असणार, म्हणजे ती तुम्हाला हवी असेल तर स्वतःहून सुरू करावी लागेल.
UPI हे भारतात सर्वात वेगाने वाढणारे डिजिटल पेमेंट माध्यम आहे. यावर २०२४ मध्ये तब्बल १७२.२ अब्ज व्यवहार झाले होते, जे २०२३ च्या तुलनेत ४६% अधिक होते. वाढत्या वापरामुळे सुरक्षेचा विचार करत NPCI ने हे नियम लागू केले आहेत.
म्हणूनच, जर तुम्हाला Google Pay, PhonePe, Paytm सारखी UPI अॅप्स सुरळीत वापरायची असतील, तर तुमचा मोबाइल नंबर नेहमी सक्रिय ठेवा आणि बँकेत अपडेट करून ठेवा!