सेक्स पॉवरसाठी आंध्रात गाढवांवर संक्रांत? मोठ्या प्रमाणात कत्तलीच्या घटना उघड !

| Updated on: Jul 13, 2021 | 11:24 AM

आंध्र प्रदेशमध्ये लैंगिक क्षमता वाढावी यासाठी गाढवाची कत्तल करुन त्याचं मांस खाल्लं जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे (Donkey slaughter in Andhra Pradesh for increase sex power).

सेक्स पॉवरसाठी आंध्रात गाढवांवर संक्रांत? मोठ्या प्रमाणात कत्तलीच्या घटना उघड !
प्रातिनिधिक फोटो (सौजन्य : फेसबुक)
Follow us on

अमरावती (आंध्र प्रदेश) : गाढव! या प्राण्याला जगातील सर्वात शांत, संयमी आणि मेहनती प्राणी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. माणसाला शेतीपासून अनेक कामांसाठी गाढवाचा उपयोग होतो. गाढव त्याच्या मालकाचं ओझं वाहण्याचं काम करतो, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. याशिवाय गाढवीनीचं दूध हे आरोग्यासाठी पोषक असतं, असंही म्हणतात. या गाढवाने माणसाला अनेक माध्यमातून मदतच केलीय. मात्र, हाच माणूस गाढवाच्या अस्तित्वावर उठलाय. आंध्र प्रदेशमध्ये लैंगिक क्षमता वाढावी यासाठी गाढवाची कत्तल करुन त्याचं मांस खाल्लं जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे (Donkey slaughter in Andhra Pradesh for increase sex power).

आंध्र प्रदेशात अनेक भागांमध्ये गाढवाच्या कत्तली

भारतात अनेक लोक गाढवाचं देखील मांस खातात. आंध्र प्रदेशात गाढवाचं मांस खाण्याबाबत अनेक वेगवेगळे तर्क आहेत. गाढवाचं मांस खाल्ल्याने अनेक रोगांपासून दूर होता येतं, असं आंध्र प्रदेशच्या लोकांचं म्हणणं आहे. गाढवाचं मांस खाल्ल्याने श्वास घेण्यास अडथडा येत असलेली समस्या दूर होते. त्याचबरोबर गाढवाचं मांस खाल्लं तर लैंगिक क्षमता वाढते, असा त्यांचा दावा आहे. आंध्र प्रदेशच्या लोकांच्या अशा प्रकारच्या भावनांमुळे तेथील लोक अन्नात गाढवाचं मांस खातात. आंध्र प्रदेशमधील पश्चिम गोदावरीसह अनेक जिल्ह्यांमध्ये गाढवाच्या कत्तली केल्या जात आहेत. यामध्ये कृष्णा, प्रकाशम आणि गुंटूर यांचा समावेश आहे. या भागांमध्ये गाढवाच्या मांसाची खपत मोठ्या वेगात होते (Donkey slaughter in Andhra Pradesh for increase sex power).

आंध्र प्रदेशात गाढवाचं मांस 600 रुपये किलो

आंध्र प्रदेशात गाढवांच्या कत्तलीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. गाढवांची कत्तल करुन त्याचे अवशेष असेच कुठेतरी उघड्यावर किंवा गटारीत फेकले जात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या आरोग्यावरही त्याचा परिणाम होत आहे. याशिवाय तेथील बाजारात गाढवाचं मांस 600 रुपये किलोच्या किंमतीत विकलं जात आहे. मांस विकणारा व्यापारी एक गाढव 15 ते 20 हजार रुपयाच विकत घेत आहे. पण निष्पाप गाढवांच्या या कत्तली रोखणं सरकारपुढे मोठं आव्हान होऊन बसलं आहे.

महाराष्ट्रातही गाढवांची संख्या कमीच

आंध्र प्रदेशात 2019 मध्ये गाढवांची संख्या फक्त 5 हजार इतकी होती. याशिवाय महाराष्ट्रातही गाढवांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. महाराष्ट्रातील गाढवांची संख्या कमी होत असल्याने गेल्यावर्षी राज्याच्या अॅनिमल हज्बेंड्री डिपार्टमेंटने गाढवाच्या कत्तली रोखण्यासाठी सर्व जिल्हाधिकारींसाठी एक सर्कुलर जारी केला होता. विशेष म्हणजे पशू अधिकार कार्यकर्ता आणि केंद्रीय माजी मंत्री मेनकाल गांधी यांनीदेखील गाढवांची संख्या घटण्यामागे त्यांची होणारी कत्तल हेच कारण सांगितलं होतं.

गाढवांना मारणं हे बेकायदेशीरच

देशातील अनेक राज्यांमध्ये गाढवाची संख्या कमी होत चालली आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये अनेक राज्यांमध्ये एकही गाढव शिल्लक राहणार नाही, अशी भीती वर्तवली जात आहे. यामागे कारण म्हणजे गाढवाच्या मांससाठी त्याची सर्रासपणे कत्तल. त्यामुळे काही सामाजिक संस्थांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे भारतीय अन्न आणि मानक प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार गाढव हा ‘फूड अॅनिमल’ नाही. त्यामुळे त्याचं मांस खाण्यासाठी त्याला मारणं हे कायदेशीर नाही.

हेही वाचा : फोन घ्यायचा विचार करताय? हा फोन तब्बल 10 हजारांनी स्वस्त!