Lottery : 25 कोटींची लॉटरी जिंकली, पण आनंद काही टिकला नाही..कशामुळे झाला हा नशीबवान नाराज..

| Updated on: Nov 08, 2022 | 6:54 PM

Lottery : 25 कोटींची लॉटरी जिंकूनही केरळमधील एक नशीबवान व्यक्ती नाराज झाला आहे..त्यामागची कारणं तरी काय..

Lottery : 25 कोटींची लॉटरी जिंकली, पण आनंद काही टिकला नाही..कशामुळे झाला हा नशीबवान नाराज..
लॉटरी जिंकून झाला ताप
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

कोच्ची, केरळ : मंडळी, सहजासहजी कोणाचं नशीब काही चमकत (Flashes of Luck) नाही. ज्याचं चमकतं, त्याच्याविषयी समाजात कोण अप्रुप असतं नाही का? ज्याला लॉटरी (Lottery) लागली, त्याला तर आभाळ ठेंगणं होतं. काय करु अन् काय नाही, असं त्याला होतं. पण सर्वच नशीबवानांच्या आयुष्यात असं सूख असतं का?

केरळमधील अनूप बी यांना या वर्षी सप्टेंबर महिन्यात 25 कोटींची लॉटरी लागली होती. लॉटरी जिंकल्यामुळे त्यांचा आनंद गगनात मावेना. यासंबंधीच्या बातम्यांनी त्यांना प्रसिद्धीच्या झोतात आणले. त्यांच्यावर अभिनंदनाचा, शुभेच्छांचा वर्षाव झाला.

पण त्यांचा हा आनंद काही जास्त काळ टिकला नाही. 32 वर्षाच्या अनूप यांना लॉटरी जिंकल्यानंतर आपलं आयुष्यच पालटून जाईल. एकदमच आनंदाचं, सूखाचं भरतं येईल असं त्यांचं स्वप्न अल्पायुषी ठरलं.

हे सुद्धा वाचा

त्यांच्या आयुष्यात असा काही बदल होईल याची त्यांनी कल्पनाही केली नव्हती. लॉटरी जिंकल्यानंतर रातोरात स्टार झालेल्या अनूप यांना शहरच काय देशात प्रसिद्धी मिळाली. पण ही प्रसिद्धीच त्यांची डोकेदुखी ठरली आहे.

कारण या लॉटरी आणि प्रसिद्धी पाठोपाठ त्यांच्या मागे पैसे मागणाऱ्यांची गर्दी उसळली. त्यामुळे ते हैराण झाले. प्रत्येक जण पैसा मिळण्याच्या आशेनेच त्यांना भेटायला येत आहे. पैशावरुन त्यांचे अनेक मित्र आणि नातेवाईक त्यांच्यावर नाराज आहेत.

“माझ्या जीवाभावाच्या लोकांनी माझ्याशी बोलणंच बंद केलं आहे.” लॉटरी जिंकणाऱ्या अनूप यांना ही बाब मनाला खात आहे. रिक्षा चालवून आणि हॉटेलमध्ये शेफ म्हणून काम करणाऱ्या अनूप यांना लोकांमधील हा बदल जिव्हारी लागत आहे.

अनेक ठिकाणी वस्तू खरेदी करताना, लोक त्यांना उरलेली रक्कम परत करत नाही. कारण अनूप यांना आता लॉटरी लागल्याने त्यांना पैशांची गरज उरली नाही असा समज लोकांनी करून घेतला आहे.

गरजू लोकांना मदत करण्याचे आश्वासन अनूप यांच्या पत्नी माया यांनी एका मुलाखती दरम्यान दिले होते. तोच धागा पकडून त्यांच्या घरी दररोज अनेक लोक यायला लागले. विमा कंपनीचे एजंट, स्वंयसेवी संस्था एवढचं काय चित्रपट काढण्यासाठी पैसा मिळावा म्हणून ही लोकांनी त्यांच्याकडे तगादा लावला आहे. त्यामुळे ते वैतागले आहेत.