Marriage insurance : लग्नाचा विमा काढणे कितपत फायदेशीर?, जाणून घ्या कोणत्या परिस्थितीत मिळते नुकसान भरपाई

| Updated on: May 05, 2022 | 5:40 AM

सध्या लग्नाचा विमा काढण्याचा नवीन ट्रेंड आला आहे, मात्र लग्नाचा विमा काढल्यास त्याचा खरच फायदा होतो का? कोणत्या परिस्थितीमध्ये नुकसान भरपाई मिळते? प्रीमियम किती भरावा लागतो या सगळ्या गोष्टींची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत.

Marriage insurance : लग्नाचा विमा काढणे कितपत फायदेशीर?, जाणून घ्या कोणत्या परिस्थितीत मिळते नुकसान भरपाई
Follow us on

नाशिकच्या शरदरावांनी मुलीच्या लग्नासाठी (Marriage) वाजंत्रीपासून ते हॉटेलपर्यंत (Hotel) सर्व काही बुक केलंय . पण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे मुलीच्या लग्नाची तारीख पुढे ढकलावी लागली. त्यामुळे त्यांना लाखो रुपयांचं नुकसान झालंय. शरदरावांनी लग्नाचा विमा (Marriage insurance) काढला असता तर त्यांना नुकसान भरपाई मिळाली असती. सध्या लग्नाचा विमा एक नवीन उत्पादन म्हणून समोर येत आहे. अचानक लग्न मोडणं, मौल्यवान वस्तूंची चोरी, वैयक्तिक दुर्घटना, नैसर्गिक आपत्ती इत्यादींमुळे होणाऱ्या नुकसानीला लग्नाचा विमा हा एक चांगला पर्याय आहे. लग्न ही एखाद्याच्या आयुष्यातील महत्वाची घटना असल्यानं खर्चाचं बंधन नसतं. अनेक कुटुंब एक किंवा दोन वर्ष आधीच लग्नाची खरेदी सुरू करतात. तसेच हॉटेल्स, मंगल कार्यालय, केटरिंग आणि ब्युटीशियन्स या सर्वाचे अॅडव्हान्स बुकिंग देखील करतात. matrimony.com च्या अहवालानुसार देशात दरवर्षी एक कोटी दहा लाख ते एक कोटी 30 लाख लग्न पार पडतात. देशातील लग्नाचा व्यवसाय 3 लाख 71 कोटी रुपयांचा आहे या व्यवसायात दरवर्षी 25 ते 30 टक्के दरानं वाढ होत आहे, अशी माहिती कन्सल्टन्सी कंपनी केपीएमजीच्या अहवालात देण्यात आलीये.

कोणत्या परिस्थितीत नुकसान भरपाई मिळते

लग्नाची तयारी करत असताना चोरी, आग किंवा अपघातासारख्या एखाद्या दुर्घटनेमुळे कुटुंबासमोर अडचणींचा डोंगर उभा राहतो. अशा प्रकारचे नुकसान भरून काढण्यासाठी लग्नाचा विमा हा एक सर्वोत्तम पर्याय आहे. भारतात विवाह विम्याचा ट्रेंड अजून फारसा रुळला नाही. युरोप आणि अमेरिकेसारख्या विकसित देशांमध्ये हा विमा खूप लोकप्रिय आहे. महागाईचा विचार करता , हा एक अतिशय स्वस्त पर्याय आहे. विवाह समारंभात अचानक एखादा अपघात झाल्यास विम्याद्वारे भरपाई मिळते, अशी माहिती आर्थिक सल्लागार जितेंद्र सोळंकी यांनी दिलीये. लग्न विम्यामध्ये बरीच जोखीम कव्हर केली जाते. कायदेशीर किंवा काही कारणांमुळे लग्न रद्द होणे, विवाहस्थळाचे नुकसान या सर्वांना विम्याचे कवच मिळते. लग्नादरम्यान दागिने, कपडे किंवा इतर कोणतीही मौल्यवान वस्तू चोरीला गेल्यास विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळते. पाऊस, वादळ किंवा भूकंपामुळे लग्न स्थळाच्या ठिकाणी नुकसान झाल्यास भरपाई मिळते. आजकाल विमा कंपन्या लग्न विम्यात वैयक्तिक अपघाताचाही समावेश करतात .अपघातात जखमी झाल्यास, अपंगत्व किंवा मृत्यू झाल्यास नुकसान भरपाई देण्यात येते.

कोणत्या परिस्थितीत नुकसान भरपाई मिळत नाही?

लग्नाच्या ठिकाणी एखाद्या वादामुळे लग्न रद्द करावं लागल्यास विमा कंपनी नुकसान भरपाई देत नाही. हुंड्याच्या मागणीमुळे लग्न मोडल्यास नुकसान भरपाई मिळत नाही. लग्नात निष्काळजीपणे किंवा जाणूनबुजून नुकसान करण्यात आलं आहे, असे विमा कंपनीला वाटत असल्यास नुकसान भरपाई मिळत नाही. आत्महत्या, आत्महत्येचा प्रयत्न आणि स्वत:ला इजा करण्याचा प्रयत्न केल्यास त्याला विमा कवच मिळत नाही.

प्रीमियम किती असतो?

सध्या ICICI Lombard, Future Generali, HDFC अर्गो, Bajaj Allianz General Insurance सारख्या कंपन्या मॅरेज इन्शुरन्स देत आहेत. सध्या विम्याच्या तुलनेत दाव्यांचं प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळे प्रीमियम देखील स्वस्त आहे. लग्न विम्याचा हप्ता एकूण विमा कव्हरच्या तुलनेत सुमारे 1 ते 1.5 टक्के असतो. दहा लाखांच्या विम्यासाठी पंधरा हजार रुपयांचा हप्ता बसतो. त्यामुळे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी लग्नाचा विमा काढण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो.