आनंदाची बातमी: PMC बँकेच्या ‘त्या’ ग्राहकांना मिळणार 5 लाख रुपये

PMC Bank | अलीकडच्या काळात पंजाब अँण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक, लक्ष्मी विलास बँक, येस बँकेच्या ग्राहकांवर डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ आली होती. या बँका आर्थिकदृष्ट्या डबघाईला आल्यामुळे ठेवीदारांचे पैसे अडकून पडले होते.

आनंदाची बातमी: PMC बँकेच्या त्या ग्राहकांना मिळणार 5 लाख रुपये
पीएमसी बँक
| Edited By: Rohit Dhamnaskar | Updated on: Aug 31, 2021 | 8:29 AM

मुंबई: आर्थिक गैरव्यवहरांमुळे रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादल्याने पंजाब अँण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अनेक ग्राहकांचे पैसे खात्यातच अडकून पडले होते. मात्र, आता डिपॉझिट इन्शुरन्स अॅण्ड क्रेडिट ग्यारंटी कॉर्पोरेशनच्या (DICGC) नियमानुसार 30 नोव्हेंबरपासून बँकेतील ग्राहकांना 5 लाख रुपये मिळणार आहे. त्यामुळे आयुष्यभराची पुंजी बँकेत अडकून पडलेल्या ग्राहकांना काही अंशी दिलासा मिळणार आहे.

काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला होता. आर्थिक गैरव्यवहार किंवा अन्य कारणांमुळे एखादी बँक दिवाळखोरीत निघाली तर ग्राहकांना 90 दिवसांमध्ये त्यांचे पैसे परत करण्यासाठी कायदा मंजूर करण्यात आला होता. या कायद्याची अंमलबजावणी 1 सप्टेंबरपासून होणार आहे. मात्र, या कायद्यानुसार बँकेत ठेवी अडकून पडलेल्या ग्राहकांना केवळ 5 लाख रुपयांपर्यंतच पैशांची हम देण्यात आली आहे. त्यामुळे उर्वरित पैशाचे काय होणार, हा प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे.

पीएमसी बँकेच्या ग्राहकांचे पैसे का अडकले?

अलीकडच्या काळात पंजाब अँण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक, लक्ष्मी विलास बँक, येस बँकेच्या ग्राहकांवर डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ आली होती. या बँका आर्थिकदृष्ट्या डबघाईला आल्यामुळे ठेवीदारांचे पैसे अडकून पडले होते. अनेकांनी आपल्या आयुष्यभराची पुंजी बँकेत ठेवली होती. परंतु आर्थिक घोटाळ्यांमुळे रिझर्व्ह बँकेने संबंधित बँकांवर निर्बंध लादल्याने ग्राहकांना स्वत:चेच पैसे काढता येत नव्हते.

नव्या कायद्यामुळे नक्की काय फायदा होणार?

कोणतीही बँक दिवाळखोरीत निघाल्यास DICGC कडून ठेवीदारांना आणि खातेदारांना विमा कवच दिलं जातं. त्यानुसार ठेवीदारांना पाच लाखांपर्यंत रुपये दिले जातात. पण, हे पैसे बँकेचा परवाना रद्द केल्यानंतर आणि तिचं लिक्विडेशन म्हणजे संपत्ती विकल्यानंतरच दिले जातात. केंद्राच्या नव्या निर्णयामुळे ठेवीदारांना पैसे मिळण्याचा कालावधी निश्चित झाला आहे.

नियमाचा फायदा कोणाला होणार?

नियमांमध्ये म्हटले आहे की, जर एखादी बँक दिवाळखोरीत निघाल्यास त्या बँकेच्या ग्राहकांची पाच लाखांपर्यंतची रक्कम सुरक्षित राहील आणि ही रक्कम डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) या संपूर्ण मालकीच्या कंपनीअंतर्गत सुरक्षित आहे. सर्व वाणिज्यिक आणि सहकारी बँकांचा डीआयसीजीसीद्वारे विमा उतरविला जातो, त्याअंतर्गत ठेवीदारांच्या बँक ठेवींवर विमा संरक्षण उपलब्ध आहे. बँकेत बचत, फिक्स्ड, करंट, रिकरिंग अशा सर्व प्रकारच्या ठेवींचा डीआयसीजीसीद्वारे विमा उतरविला जातो. सर्व छोट्या मोठ्या बँका, सहकारी बँका त्याच्या कार्यक्षेत्रात येतात. जर निश्चित रकमेव्यतिरिक्त एखाद्या ग्राहकाकडे बँकेत पाच लाखांहून अधिक रक्कम जमा असेल तर उर्वरित रक्कम बुडण्याची भीती असते.

संबंधित बातम्या:

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत तब्बल दीड कोटींचा घोटाळा, ग्राहकांचे पैसे खात्यावर न टाकता स्वत: उधळले

बँक बुडाल्यानंतर तुमचे किती पैसे सुरक्षित असतील? जाणून घ्या…

चंद्रपूर जिल्हा बँकेच्या घोटाळ्यात नवनवे खुलासे, ग्राहक हादरले, अफरातफर करणारा रोखपाल मोकाट?

Follow Us