Raj Thackeray : …म्हणून अट्टाहास सुरु, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? खपवून घेणार नाही; राज ठाकरेंचा थेट इशारा
राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून ‘राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा 2024’ तयार करण्यात आला आहे. या आराखड्यानुसार आता तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषा सक्तीची करण्यात आली आहे. यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळतंय.
राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४ नुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात आली आहे. यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली भूमिका फेसबूकच्या माध्यमातून शेअर केली आहे. महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी भाषा सक्ती करण्यात आल्याने मनसे चांगलीच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत यासंदर्भात थेट इशारा दिल्याचे पाहायला मिळाले आहे. महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी भाषा अनिवार्य करण्यात आली आहे, हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही, असं राज ठाकरे यांनी म्हटले आहे. तर केंद्राचं सर्वत्र हिंदीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहे. हे हिंदीकरण राज्यात आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असे म्हणत राज ठाकरे यांनी इशारा दिला आहे.

