Special Report | प्रकाश आंबेडकर मराठा मोर्चात जाण्याचे अर्थ काय?
वंचित आघाडीनं महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना धडकी भरवली होती. पण त्यांना हवं तसं यश मिळालं नाही ही गोष्ट वेगळी. तरीही प्रकाश आंबेडकरांचं राजकीय महत्व कमी होत नाही.
प्रकाश आंबेडकर हे भारिप बहुजन महासंघाचे नेते आहेत. त्यांच्याच वंचित आघाडीनं महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना धडकी भरवली होती. पण त्यांना हवं तसं यश मिळालं नाही ही गोष्ट वेगळी. तरीही प्रकाश आंबेडकरांचं राजकीय महत्व कमी होत नाही. एक विचार करणारा, मांडणारा नेता म्हणूनच महाराष्ट्र त्यांचा आदर करतो. विशेष म्हणजे राजकीय तोटा दिसत असतानाही ते निर्णय घ्यायला मागे पुढे पाहत नाहीत. त्यामुळेच बाळासाहेबांचे निर्णय कधी धाडसी वाटतात तर कधी आत्मघातकी. पण एक निश्चित. ते कधीच कुणाच्या दावणीला बांधलेले नेते नसतात. म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचं स्वतंत्र अस्तित्व आहे आणि त्यांना मानणारा मोठा वर्गही. तो वर्ग फक्त दलित आहे असं नाही तर बारा बलुतेदार आणि अठरापगड जातीत तो पसरलेला आहे. आता तर त्यांनी थेट मराठा मोर्चात सहभागी होऊन सर्वांनाच धक्का दिला आहे. तसच नव्या राजकीय आघाडीची तर ते तयारी करत नाहीत ना अशी चर्चा आता रंगू लागलीय.