Paddy Crop : अतिवृष्टीने भातशेती पाण्यात, शेतकऱ्यांचे केविलवाणे प्रयत्न येणार का कामी?

| Updated on: Jul 24, 2022 | 3:26 PM

खरीप हंगामात वेळेत धान पिकाची लागवड झाली तर उत्पादनात वाढ होते. त्यामुळे जूनचे मुहूर्त साधण्यावर शेतकऱ्यांचा भर होता. पण जूनमध्ये पावसाने हुलकावणी दिली. तर समाधानकारक पावसाने जुलैच्या पहिल्या आठवड्यात भातशेतीची लागवड करण्यात आली. लागवड होताच लागून राहिलेला पाऊस तब्बल 18 दिवस कायम राहिला होता. त्यामुळे पिकांच्या वाढीवर तर परिणाम झालाच आहे पण आता किडीचाही प्रादुर्भाव वाढत आहे.

Paddy Crop : अतिवृष्टीने भातशेती पाण्यात, शेतकऱ्यांचे केविलवाणे प्रयत्न येणार का कामी?
पावसाचे पाणी भातशेतीमध्ये साचले असून ते बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.
Follow us on

अहमदनगर : सध्या राज्यात (Rain) पावसाचा जोर कमी झाला असला तरी मध्यंतरीच्या अतिवृष्टीच्या खुणा अधिक गडद होत आहेत. राज्यातील सर्वच भागात अतिवृष्टीचा परिणाम पाहवयास मिळत आहे. अकोले तालुक्यातील (Small holder farmer) अल्पभूधारक शेतकऱ्यांवर मात्र, दुहेरी संकट ओढावले आहे. पावसामुळे लागवड केलेल्या (Paddy Crop) धान पिकाचे नुकसान तर झालेच पण हाताला कामही नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा असा सवाल शेतकऱ्यांसमोर आहे. भातशेतीची लागवड करताच मोलमजुरी ही ठरलेलेच आहे मात्र, यंदा निसर्गाचा लहरीपणा आणि हाताला काम मिळत नसल्याने अल्पभूधारक शेतकरी त्रस्त आहे. उत्पादनातील घट बरोबरच इतर समस्यांनाही सामोरे जावे लागत आहे. अतिवृष्टीमुळे भातशेतीमध्ये पाणी साचून राहिल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे.

जूनमध्ये पावसाची प्रतिक्षा अन् जुलैमध्ये सर्व नुकसान

खरीप हंगामात वेळेत धान पिकाची लागवड झाली तर उत्पादनात वाढ होते. त्यामुळे जूनचे मुहूर्त साधण्यावर शेतकऱ्यांचा भर होता. पण जूनमध्ये पावसाने हुलकावणी दिली. तर समाधानकारक पावसाने जुलैच्या पहिल्या आठवड्यात भातशेतीची लागवड करण्यात आली. लागवड होताच लागून राहिलेला पाऊस तब्बल 18 दिवस कायम राहिला होता. त्यामुळे पिकांच्या वाढीवर तर परिणाम झालाच आहे पण आता किडीचाही प्रादुर्भाव वाढत आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम थेट खरिपातील उत्पादनावर होणार आहे. शेतकऱ्यांना जूनमध्ये पावसाची प्रतिक्षा होती तर जुलैमध्ये याच पावसाने सर्वकाही पाण्यात असल्याचे चित्र आहे.

मजुरीसाठी स्थलांतर

आदिवासी पट्ट्यातील बहुसंख्य शेतकरी अल्पभूधारक तसेच भात खासराच्या छोट्या छोट्या जमिनी असलेले आहेत. कमी क्षेत्रावर गुजरान करावी लागत असल्याने अगोदरच वर्ष कसे काढायचे हा प्रश्न निर्माण झालेला असतो. बहुसंख्य शेतकरी खरिपाची कामे आवरल्यानंतर दोन पैसे हातात पडावेत म्हणून मोलमजुरीसाठी आपली गावे सोडून काही काळासाठी स्थलांतर करीत असतात. त्यातच यंदा अतिवृष्टीमुळे भात रोपे म्हणावी तेवढी सुदृढ आणि तजेलदार नसल्याने शेतकरी वर्गात चिंता आहे. त्यामुळे अपेक्षित उत्पादन तर पदरी पडते की नाही याबद्दल शंका उपस्थित होत आहे.

हे सुद्धा वाचा

शेतकऱ्यांचे प्रयत्न

पावसामध्ये सातत्य राहिल्याने अनेक ठिकाणी पावसाचे पाणी हे साचून राहिले आहे. पाण्याचा निचरा झाल्याशिवाय पिकांची वाढ होणार नाही. त्यामुळे रोपवाटिकेत जास्त झालेले पाणी शेताबाहेर काढून देण्याचे नियोजन बहुसंख्य शेतकरी करीत आहेत. मात्र, शेतकऱ्यांचे हे केविलवाणे प्रयत्न कामी येणार का हे पहावे लागणार आहे. धान पीक हे पावसाळी पीक असले तरी लागवडीनंतर काही काळ का होईन पाण्याचा निचरा होणे गरजेचे आहे. मात्र, मध्यंतरीच्या पावसाने जागोजागी पाणी साचलेले आहे. उत्पादनात घट झाली तर अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या उदनिर्वाहाचा प्रश्न निर्माण हो आहे.