सांगा पिकं जगावयची कशी? 88 वर्षीय आजीबाईंचा महावितरण अधिकाऱ्यांसमोरच टाहो..!

| Updated on: Mar 04, 2022 | 1:25 PM

पिकं ऐन बहरात असताना विद्युत पुरवठा खंडीत केल्यावर काय होते याचा पाढाच माढा तालुक्यातील चव्हाणवाडी येथील 88 वर्षीय सुभद्राबाई यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांसमोर वाचून दाखवला आहे. तळहातावरील फोडाप्रमाणे पिकांची जोपसणा करुन आता अंतिम टप्प्यात विद्युत पुरवठ्याअभावी जर नुकसान होणार असेल तर जगायचं कसं असा सवालच आंदोलनात सहभागी झालेल्या आजीबाईंनी उपस्थित केल्यावर बांधावरची नेमकी स्थिती काय याचे दर्शन झाले होते.

सांगा पिकं जगावयची कशी? 88 वर्षीय आजीबाईंचा महावितरण अधिकाऱ्यांसमोरच टाहो..!
Follow us on

संदीप शिंदे : माढा : पिकं ऐन बहरात असताना (Electricity Supply) विद्युत पुरवठा खंडीत केल्यावर काय होते याचा पाढाच माढा तालुक्यातील चव्हाणवाडी येथील 88 वर्षीय सुभद्राबाई यांनी (MSEB) महावितरणच्या अधिकाऱ्यांसमोर वाचून दाखवला आहे. तळहातावरील फोडाप्रमाणे (Rabi Crop) पिकांची जोपसणा करुन आता अंतिम टप्प्यात विद्युत पुरवठ्याअभावी जर नुकसान होणार असेल तर जगायचं कसं असा सवालच आंदोलनात सहभागी झालेल्या आजीबाईंनी उपस्थित केल्यावर बांधावरची नेमकी स्थिती काय याचे दर्शन झाले होते. महावितरणच्या अधिकाऱ्यांना काय समजणार पिकांच अन् शेतकऱ्यांचं नातं. तुमची कारवाई होत असली तरी आमचा जीव जाण्याची वेळ आल्याचे आजीबाई म्हणताच टेंभुर्णी येथे सुरु असलेल्या आंदोलनात कमालीची शांतता पसरली होती. चव्हाणवाडीच्या शिवारातलं वास्तव आजीबाई सांगत होत्या आणि आंदोलनात सहभागी झालेले शेतकरी अन् महावितरणचे कर्मचारी हे त्यांचे गऱ्हाणे ऐकूण घेत होते.

कोटेशन भरुनही विद्युत पुरवठा नाही

एकीकडे वाढत्या थकबाकीमुळे शेतकऱ्यांच्या कारभारावर बोट ठेवले जात असले तरी दुसरीकडे महावितरणच्या गलथान कारभाराकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. 88 वर्षीय महिला शेतकरी असलेल्या सुभद्राबाई यांनी वीज कनेक्शनसाठी कोटेशन अर्थात अनामत रक्कम महावितरणकडे अदा केली आहे. असे असताना त्यांना अद्यापही हक्काची लाईटच मिळालेली नाही. तर दुसरीकडे कृषीपंपाचा विद्युत पुरवठा खंडीत केल्याने पिके करपून जात आहेत. त्यामुळे महावितरणच्या कारवाईमुळे जगंण मुश्किल झालं असून नेमके बांधावरचे प्रश्न काय आहेत याचा पाढाच त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांसमोर वाचून दाखवला आहे.

आंदोलना दरम्यान महावितरणच्या कार्यालयाला टाळे

गेल्या काही दिवसांपासून सुरळीत विद्युत पुरवठा होत नाही. त्यामुळे रब्बी पिकांसह या भागातील ऊसाचे मोठे नुकसान होत आहे. महावितरणच्या कारभारामुळे उत्पादनात घट होईल असे चित्र झाले आहे. त्यामुळे टेभुर्णीच्या महावितरणच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी आक्रोश ठिय्या आंदोलन केले होते. संजय पाटील भिमानगरकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी हे आंदोलन केले होते.दरम्यान, शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना कार्यालयाबाहेर काढुन कुलूप ठोकुन घोषणाबाजी केली.

अधिकारी-शेतकऱ्यांमध्ये खडाजंगी

कृषीपंपाना होत असलेल्या विद्युत पुरवठ्यावरुन शेतकरी संतप्त आहेत. नियमित वीज पुरवठा तर होतच नाही पण वाढत्या थकबाकीच्या नावाखाली अनेकांचा विद्युत पुरवठा खंडीत आला आहे. यापूर्वी निसर्गाच्या लहरीपणामुळे खरिपातील पिकांचे नुकसान तर झालेच आहे पण आता महावितरणच्या कारवाईमुळे ऊस आणि रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान होत आहे. आजीबांईंच्या टाहोनंतर तरी या भागातील विजेचा प्रश्न मार्गी लागणार का नाही हे पहावे लागणार आहे.

संबंधित बातम्या :

Photo : कृषीपंपाचा विद्युत पुरवठा प्रश्न पेटला, कोल्हापूर, सांगलीत आंदोलनानंतर इचलकरंजीत ‘स्वाभिमानी’ची भूमिका काय?

‘E-Pik Pahani’ : शेतकऱ्यांच्या हितासाठी पुन्हा निर्णयात बदल, आता किती दिवसांची मुदत?

ओ भाऊ, रोजंदारीने या अन्यथा गुत्ते घ्या पण हरभरा वावरच्या बाहेर काढा..! पीक जोमात काढणीविना कोमात