सेंद्रिय पद्धतीने शेती करा, लाखो रुपये कमवा, पीकं पाहायला शेतकऱ्यांची गर्दी

हळदीची शेती शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रेरक असून तालुक्यातील शेतकरी त्यांच्या शेतात भेट देऊन माहिती घेत आहेत

सेंद्रिय पद्धतीने शेती करा, लाखो रुपये कमवा, पीकं पाहायला शेतकऱ्यांची गर्दी
Cultivation of Turmeric
Image Credit source: tv9marathi
| Updated on: Mar 03, 2023 | 12:35 PM

शहापूर : राज्याच्या काही भागांमध्ये विशिष्ट पिकांची वर्षानुवर्षे लागवड (Cultivation) केली जात आहे. मात्र काही प्रयोगशील शेतकरी (shahapur farmer)आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या शेतीमध्ये धाडसी प्रयोग करीत असल्याचं पाहायला मिळत आहे, असाच एक प्रयोग मुंबईला लागून असलेल्या शहापूर तालुक्यातील प्रकाश कोर व रामनाथ उंबरगोंडे या शेतकऱ्यांनी यांनी केला आहे. पारंपारिक शेतीला छेद देत त्यांनी आपल्या शेतामध्ये सेंद्रिय पद्धतीने हळदीची लागवड केली आणि त्यातून लाखो रुपयांचे उत्पन्न सुध्दा मिळविले आहे. हळदीची शेती (Cultivation of Turmeric) शहापूर तालुक्यातील तरुण शेतकऱ्यांना प्रेरक असून तालुक्यातील मोठ्या प्रमाणात शेतकरी त्यांच्या शेतात भेट देऊन माहिती घेत आहेत अशी माहिती शेतकरी प्रकाश कोर यांनी दिली आहे.

पूर्वी किचकट मानले जाणारे हळद उत्पादन आता शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे उत्पन्न देत आहे. शहापूर तालुक्यातील बेडेकोन व टेंभा येथील शेतकरी रामनाथ उंबरगोंडे व प्रकाश कोर यांनी आपल्या शेतावर भात पिकाला जोड धंदा म्हणून वायगाव व प्रगती जातीच्या हळदीची लागवड केली होती. या पिकातून एकरी सहा-सात रुपयांचेही उत्पन्न घेत आहेत अशी माहिती शेतकऱ्यांनी सांगितली आहे.

हळद ही शेतावर अंतरपीक म्हणून ही घेता येते, हळदीच्या काढणीसाठी लागणारे मनुष्यबळ, तसेच काढणी झाल्यावर शिजविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लागणार लाकूडफाटा. त्याचबरोबर सदर हळद सुकवून पुन्हा मशीन मध्ये तिची पावडर बनवून ती पॅकिंग करून विक्रीसाठी बाजारात आणली जाते. सदर हळद ही पूर्ण पणे सेंद्रिय असल्यामुळे तिला बाजारात एका किलो मागे 300 ते 400 रुपये भाव मिळतोय. मी २५ गुंठ्यात दोन ते तीन लाख उत्पन्न काढले असल्याची माहिती शेतकरी रामनाथ उबंरगोंडे यांनी दिली आहे.

शेतकरी पारंपारीक शेतीला आता बाजूला करताना दिसतं आहेत, त्याचबरोबर विविध पद्धतीचा अभ्यास करुन ते वेगळ्या पद्धतीचं पीक घेत आहेत. राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी वेगळे प्रयोग करुन लाखो रुपयांचं उत्पादन काढलं आहे. त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांनी प्रयोग करायला हवा असंही म्हटलं आहे.