Farmer Pension Scheme: अवघ्या 55 रुपयांत 3,000 रुपयांची मासिक पेन्शन, शेतकऱ्यांसह मजूरांना मोठा फायदा

शेतकरी, शेतमजूर आणि असंघटित कामगारांसाठी सरकारची ही पेन्शन योजना खास आहे. कमी योगदानात शेतकऱ्यांना आयुष्याच्या उतारवयात 3,000 रुपयांची मासिक पेन्शन मिळू शकते. काय आहे ही योजना? कसा करावा अर्ज? जाणून घ्या.

Farmer Pension Scheme: अवघ्या 55 रुपयांत 3,000 रुपयांची मासिक पेन्शन, शेतकऱ्यांसह मजूरांना मोठा फायदा
शेतकरी पेन्शन योजना
| Updated on: Aug 30, 2026 | 2:32 PM

Farmer Pension Scheme: देशातील कोट्यवधी कामगार हे असंघटित क्षेत्रात काम करत आहेत. यामध्ये हातावरचे पोट असणारे, फेरीवाले, फुटपाथवरील विक्रेते, मजूर, बिगारी, शेतमजूर, टेलरिंग व्यवसायातील कामगार, चालक आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या अनेकांचा समावेश आहे. या कामगारांना केंद्रीय कर्मचारी भविष्य निधी संघटना, ग्रॅज्युटी वा इतर सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळत नाही. उतारवयात नियमित उत्पन्नाच स्त्रोत नसल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो.

केंद्र सरकारने पंतप्रधान श्रम योगी मानधन (PM-SYM) योजना सुरू केली आहे. ही एक ऐच्छिक पेन्शन योजना आहे. या योजनेचा उद्देश असंघटित क्षेत्रातील कामगारांना वृद्धापकाळात आर्थिक सुरक्षा पुरवणे हे आहे. या योजनेत 60 वर्षे पूर्ण झाल्यावर लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्यात 3,000 रुपयांची किमान पेन्शन देण्याचा उद्देश आहे.

अर्जदाराचे वय किती असावे?

या योजनेचा लाभ रोजंदार, रिक्षा चालक, बांधकाम मजूर, घरगुती कामगार, प्लंबर, टेलर, शेतमजूर, शेतकरी, चांभार, धोबी, वीडी मजदूर वा इतर बिगारी काम करणारे आणि असंघटित क्षेत्रातील श्रमिकांना मिळतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मासिक उत्पन्न 15,000 रुपयांपेक्षा अधिक नसावे. तर अर्जदाराचे वय 18 ते 40 वर्षांदरम्यान असावे, अशी अट आहे. पंतप्रधान श्रम योगी मानधन योजना ही असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा योजना आहे. दरमहा कमी योगदान देत, वृद्धापकाळात पेन्शनची हमी देणारी ही योजना आहे.

55 ते 200 रुपयांचे योगदान

या योजनेत जितके योगदान शेतकरी, शेतमजूर, अर्जदार करतो, तितकेच योगदान सरकार देते. या योजनेत 18 व्या वर्षी योगदान जमा केल्यास केवळ 55 रुपये प्रति महिना योगदान द्यावे लागते. तर 40 व्या वर्षी या योजनेसाठी अर्जदाराला 200 रुपये प्रति महिना योगदान द्यावे लागते. योजनेतंर्गत 60 वर्षे पूर्ण झाल्यावर प्रत्येक महिन्याला 3,000 रुपयांची कमीत कमी पेन्शन द्यावी लागते. जर अर्जदाराचा मृत्यू झाला तर त्याचा साथीदार योजनेत योगदान देऊ शकतो. पेन्शन सुरू झाल्यावर जर अर्जदाराचा मृत्यू झाला तर पती अथवा पत्नीला 50 टक्के पेन्शन मिळते.

अर्ज कसा आणि कुठे करावा?

या पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरवर जावे लागेल. आधार कार्ड, बँक वा जनधन योजना खात्याची इत्यंभूत माहिती द्यावी लागेल. त्याची कागदपत्रे सोबत ठेवा. त्यानंतर या पेन्शन योजनेसाठी अर्ज करा. तुमचा मोबाईल क्रमांक द्या. पहिला हप्ता भरल्यानंतर अर्जदाराला श्रमयोगी कार्ड देण्यात येते.

Follow Us