लातूर : कापसाचे दर दिवसाला वाढत आहेत. यंदा उत्पादन कमी आणि मागणी अधिक असल्याने दरामध्ये वाढ होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. वाढत्या दरामुळे जर शेतकरी (Cotton crop) कापूस पिकाचे फरदड घेणार असेल तर त्याचे काय परिणाम होतात. हे आपण आज पाहणार आहोत. फरदड म्हणजे कापसाची वेचणी होऊनदेखील अधिकच्या उत्पादनासाठी कापूस शेतामध्येच ठेवणे. यामुळे थोड्याप्रमाणात शेतकऱ्यांना फायदा होणार असला तरी याचे नुकसान अधिक आहे.
यंदा कापसाचे दर हे 9 हजार रुपये क्विंटलपर्यंत पोहचलेले आहेत. त्यामुळे कापसाचे फरदड घेण्यावर शेतकऱ्यांचा भर असणार आहे. वेचणीचा हंगाम संपल्यानंतरही कापसाला पाणी देऊन त्याची जोपासना केली जाते. यातून अधिकच्या उत्पादनाची शेतकऱ्यांना अपेक्षा असते.
सध्या खानदेशासह राज्यात कापसाची वेचणी कामे सुरु आहेत. कापसाची वेचणी ही डिसेंबरअखेरपर्यंतच करण्याच्या सुचना कृषी विभागाकडून देण्यात येत आहेत. मात्र, अधिकच्या उत्पादनाच्या अपेक्षेने शेतकरी कापूस हा वावरातच ठेवतो. पाणी देऊन उत्पादन वाढणार असले तरी शेतजमिनीचा कस कमी होतो शिवाय बोंडअळीचा प्रादुर्भावही वाढत राहतो. त्यामुळे शेतजमिनीचेही नुकसान होते.
फरदडमुळे कपाशीचा दीर्घकाळ वाढणाऱ्या संकरित वाणांची लागवड होते. या वाणांवर गुलाबी बोंड आळी च्या जास्त पिढ्या पूर्ण होतात. परिणामी या अळीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून येतो. गुलाबी बोंड अळीच्या वाढीसाठी सतत अन्न पुरवठा होत असल्याने व जीवनक्रम एकमेकात मिसळल्याने त्यांच्या संख्येत वाढ होते. फरदड जास्त काळापर्यंत कच्चा कपाशीची जिनींग मध्ये आणि व्यापारी संकुलात साठवण केली जाते. त्यामुळे गुलाबी बोंड आळी आगामी हंगामात येण्यासाठी पोषक वातावरण तयार होते.
बोंड आळी मध्ये बीटी प्रतीना विरुद्ध प्रतिकारक्षमता तयार होऊ नये यासाठी बीटी जनुक विरहित कपाशीच्याआश्रित ओळी म्हणजे रेफ्युजी लावण्याची शिफारस केली जाते. परंतु बरेच शेतकरी रेफ्युजी लागवड करत नाहीत. यामुळे बोंडअळीतील प्रतिकारशक्ती अधिक वाढत जाते. यामुळे बाजारात उपलब्ध असलेल्या बहुतांश संकरित वानांवर शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भावकमी जास्त प्रमाणात दिसून येत आहे.
या रासायनिक कीटकनाशकांचा एकत्रित वापर झाल्याने फुले लपेटून अळीचा प्रादुर्भाव हिरव्या व फुटलेल्या बोंडामध्येदेखील आढळून येतो. ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी कृत्रिम व वनस्पतिजन्य कीटकनाशकांचा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये फवारणी केली. तसेच रासायनिक कीटकनाशकांचा वापर मर्यादित केला अशा ठिकाणी शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी होतो.
कापूस पिकाच्या फरदडमुळे उत्पादनात वाढ होणार असली तरी एकप्रकारे आपण बोंडअळीच्या वाढीलाच खतपाणी घालत असतो. त्यामुळे फरदड ही डिसेंबर अखेरपर्यंतच घेणे फायद्याचे ठरणार आहे. अन्यथा बोंडअळीचा प्रादुर्भाव इतर पिकावरही होतो.
रब्बीचा पीकविमा भरण्यासाठी कृषी संचालकांनी दिली ‘डेडलाईन’
सोयाबीनचे दर वाढूनही शेतकऱ्यांची चिंता कायम, काय आहे कारण?
शेतकऱ्यांच्या मजबुती करणासाठी केंद्र सरकारची कृषी पायाभूत सुविधा योजना, नेमकी आहे तरी काय?