Special Story | नंदूरबारच्या अविनाश पाटलांनी करुन दाखवलं, मिरची शेतीतून 5 महिन्यात कमावले 12 लाख

| Updated on: Jan 24, 2021 | 7:53 AM

नंदूरबारच्या अविनाश पाटील यांनी मिरची शेतीतून अवघ्या पाच महिन्यात १२ लाखांचं उत्पन्न मिळवलंय. (Avinash Patil Chilli Farming)

Special Story | नंदूरबारच्या अविनाश पाटलांनी करुन दाखवलं, मिरची शेतीतून 5 महिन्यात कमावले 12 लाख
अविनाश पाटील
Follow us on

नंदुरबार: गावोगावची तरणाई नोकरीसाठी मोठमोठ्या शहरांकडे धावताना दिसते. अनेक तरुणांची शेती आतबट्ट्याचा व्यवसाय झाल्याची धारणा झाली आहे. मात्र, शेतीत योग्य नियोजन केल्यास त्यातूनही लाखोचा फायदा होऊ शकतो हे नंदुरबार जिल्ह्यातील एका तरुणानं सिद्ध करुन दाखवलं आहे. उच्चशिक्षण घेतलेल्या अविनाश पाटील या तरुणाने शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी येथील वडिलोपार्जित शेतीला आधुनिकतेची जोड देत मिरची शेती यशस्वी करुन दाखवलीय. गुजरात राज्यात एका बँकेतील चांगल्या पगाराची नोकरी सोडून शेतीची वाट धरलेल्या अविनाश पाटलांनी शेतीची ताकद दाखवून दिली आहे. अविनाश पाटील यांनी सहा एकर क्षेत्रात मिरचीची लागवड करून पाचशे क्विंटल मिरचीचे उत्पन्न घेतले आहे त्यांना अजून मार्च महिन्यापर्यंत 500 क्विंटल उत्पन्न येण्याची अपेक्षा आहे. (Nandurbar Avinash Patil young farmer got 12 lakhs in chilli farming within five months)

पारंपारिक पीक बदलण्याचा निर्णय

अविनाश पाटील हे गुजरातमधील सुरत येथे कोटक महिंद्रामध्ये कामाला होते. उच्च शिक्षण घेतलेल्या अविनाश यांचे कोटक महिंद्राच्या नोकरीत मन रमलं नाही अखेर त्यांनी गावी येऊन शेती करण्याचा निर्णय घेतला. नंदुरबार जिल्ह्यात केळी आणि पपई या पिकांची सर्वाधिक लागवड केली जाते. दोन्ही पारंपारिक पिकांना पर्याय देत अविनाश यांनी मिरची लागवड करण्याच निर्णय घेतला. अविनाश पाटील यांनी 18 ऑगस्टला सहा एकरावर मिरची लागवड केली.

आधुनिक पद्धत आणि योग्य नियोजन

अविनाश पाटील यांच्या गावात पारंपारिक पद्धतीने केळी आणि पपईचे उत्पन्न घेतले जात असे. मात्र, याला पर्याय म्हणून त्यांनी मिरची पिकाकडे पाहिले. मिरची पिकाची निवड केल्यानंतर अविनाश पाटील गुजरात मधील समृद्धी या शेतकरी गटाला जॉईन झाले. शेतकरी गटाच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आधुनिक पद्धतीने आणि योग्य नियोजनाने शेती करण्यास सुरुवात केली. पाटील यांनी आतापर्यंत 500 क्विंटल मिरचीचे उत्पन्न घेतले आहे तर अजून त्यांना 500 क्विंटल उत्पन्न येण्याची अपेक्षा आहे.

साडेचार लाखामध्ये 12 लाखाचं उत्पन्न

अविनाश पाटील यांनी त्यांच्या शेतामधील सहा एकरांवरील मिरची लागवडीसाठी 4.50 लाख रुपये खर्च केले आहेत. ५०० क्विंटल मिरची विक्रीतून त्यांना आतापर्यंत 12 लाखाचे उत्पन्न आले आहे. अविनाश पाटील यांनी याविषयी बोलताना शेतातील मिरचीचा तोडा मार्च महिन्यापर्यंत चालणार असल्याचं सांगितलंय. येत्या दोन महिन्यात ५०० क्विंटल मिरचीचं उत्पादन होईल असा त्यांना अंदाज आहे. संपूर्ण मिरची विक्री झाल्यानंतर एकूण खर्च जाऊन २० लाख रुपयांचा नफा होईल, अशी अपेक्षा असल्याचं अविनाश पाटील यांनी सांगतिलय.

अविनाश पाटील या तरुण शेतकऱ्यानं योग्य नियोजन आणि आधुनिकतेची कास धरल्यास शेतीत लाखोचा नफा कमावता येतो हे सिद्ध केले आहे. दुसऱ्याची चाकरी करण्यापेक्षा शेती केल्यास त्यातूनही नफा कमावता येतो, याचं चांगलं उदाहरण म्हणून अविनाश पाटील यांच्याकडे पाहता येईल.


संबंधित बातम्या:

Special Story | Dragon Fruit चं गुजरातमध्ये नामकरण, महाराष्ट्रातील ड्रॅगन फ्रुट शेतीची स्थिती काय?

कृषीमंत्री आणि अन्न नागरी पुरवठा मंत्र्यांच्या जिल्ह्यात अवकाळी पावसानं बळीराजा दुहेरी संकटात

जिरेनियम: सुगंधी वनस्पती शेतीतून फुलवला संसार, नांदेडच्या शेतकऱ्याची यशोगाधा

(Nandurbar Avinash Patil young farmer got 12 lakhs in chilli farming within five months)