रब्बी हंगामानंतर उन्हाळी मूग लागवड ठरते फायदेशीर, काय आहे कृषितज्ञांचा सल्ला?

| Updated on: Feb 06, 2022 | 4:00 AM

सध्या रब्बी हंगामातील पिके बहरात आहेत. खरीप हंगामातील पिकांचे पावसामुळे नुकसान झाले होते. शिवाय रब्बी हंगामातही वातावरण पोषक राहिलेले नाही त्यामुळे उत्पादनात वाढ होईल असे चित्र नाही. असे असताना रब्बीनंतर उन्हाळी मूगासाठी पोषक असल्याचे कृषितज्ञांचे मत आहे. उन्हाळ्यातील वातावरण हे मूग लागवडीसाठी पोषक वातावरण असते शिवाय वाढत्या उन्हामुळे उत्पादनात वाढ होणार आहे.

रब्बी हंगामानंतर उन्हाळी मूग लागवड ठरते फायदेशीर, काय आहे कृषितज्ञांचा सल्ला?
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

लातूर : सध्या रब्बी हंगामातील पिके बहरात आहेत. खरीप हंगामातील पिकांचे पावसामुळे नुकसान झाले होते. शिवाय (Rabbi Season) रब्बी हंगामातही वातावरण पोषक राहिलेले नाही त्यामुळे उत्पादनात वाढ होईल असे चित्र नाही. असे असताना रब्बीनंतर उन्हाळी मूगासाठी पोषक असल्याचे कृषितज्ञांचे मत आहे. उन्हाळ्यातील वातावरण हे (Sowing Green Gram) मूग लागवडीसाठी पोषक वातावरण असते शिवाय वाढत्या उन्हामुळे उत्पादनात वाढ होणार आहे. आतापर्यंत खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांवर निसर्गाची अवकृपा राहिलेली होती. त्यामुळे झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी शेतकरी (Cash Crop) नगदी पिकांवर भर देत आहेत. यंदा उन्हाळी हंगामात विक्रमी सोयाबीनचा पेरा झाला आहे. आता रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा या पिकानंतर मूगाची लागवड होऊ शकते. यासाठी पाण्याची उपलब्धता असलेल्या ठिकाणी रब्बी हंगामातील पिकानंतर उन्हाळी मूग लागवड फायदेशीर ठरते. मूग पीक साधारण 60 ते 65 दिवसांत पक्व होते. या काळात पाण्याच्या किमान 5 ते 6 पाळ्या देणे गरजेचे आहे.

योग्य जमिन अन् पेरणीचा कालावधी

मूग लागवडीसाठी योग्य वातावरण शेत जमिन हीच महत्वाचे आहे. यंदा तर पाण्याची उपलब्धता आहे शिवाय झालेले नुकसान भरुन काढण्याची संधी शेतकऱ्यांसमोर आहे. मात्र, पेरणी करताना मध्यम ते चांगल्या प्रतीची शेतजमिन असणे गरजेचे आहे. पाण्याचा निचरा होणारी जमिन आवश्यक आहे. पाण्याची साठवणूक होत असलेल्या जमिनीत पेरा झाला तर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे पाण्याचा निचरा होणारी जमिनीची निवड करणे गरजेचे आहे. तर पेरणी फ्रेबुवारीच्या शेवटचा आठवडा ते मार्चचा पहिला पंधरवड्यात करता येणार आहे. पेरणी तिफणीच्या साहयाने करुन दोन ओळींत 30 सेंमी आणि दोन रोपांत 10 सेंमी ठेवावे लागणार आहे. एकरी 5 ते 6 किलो बियाणे पुरेसे आहे. घरचे बियाणे वापरल्यास दर 3 वर्षांनी त्यामध्ये बदल करणे गरजेचा आहे.

जैविक बिजप्रकिया

बुरशीनाशकांची बिजप्रक्रिया केल्याच्या 3 तासांनंतर रायझोबिअम व पीएसबी या जिवाणू संवर्धकाची 25 ग्रॅम प्रतिकिलो बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. जैविक बिजप्रक्रियेमुळे पिकाच्या मुळांवरील गाठींचे प्रमाण वाढण्यास मदत होते.

असे करा खताचे व्यवस्थापन

खताचे व्यवस्थापन योग्य पध्दतीने केल्यास उत्पादनात वाढ होणार आहे. त्यामुळे पूर्वमशागती वेळी चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट हेक्टरी 10 ते 15 गाड्या टाकावे लागणार आहे. लागवडीवेळी एकरी 8 किलो नत्र आणि स्फुरद 16 किलो याप्रमाणे खतमात्रा द्यावी लागणार आहे. पीक फुलोऱ्यात असताना 2 टक्के युरिया 20 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी लागणार आहे. शेंगा भरत असताना, 2 टक्के डीएपी 20 ग्रॅम प्रतिलिटर पाणी फवारणी करावी लागणार आहे.

(सदरील माहिती ही बदनापूर कृषी विज्ञान केंद्रातील डॉ. दीपाली कांबळे यांच्या लेखातून घेतलेली आहे. शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांचा सल्ला घेऊनच पेरणी करावी.)

संबंधित बातम्या :

Drone Farming : कृषी संस्थांसह कृषी पदवीधारकांनाही अनुदानावर मिळणार ‘ड्रोन’, शेती व्यवसयात बदल अन् हाताला कामही

Sugarcane Harvesting : गळीत हंगाम जोमात तरीही फडातला ऊस ‘कोमात’, तोडणी रखडल्याने काय होते नुकसान?

Rabi Season: उत्पादन घटूनही खर्चात वाढ, मुख्य पिकालाचे रोगाने घेरले