हिवाळ्यात होईल दुध उत्पादनात घट, अशी घ्या जनावरांची काळजी

| Updated on: Oct 06, 2021 | 11:38 AM

थंडीच्या दिवसांमध्ये जनावरांना लाळ्या खुरकूत या संसर्गजन्य रोगाची लागण होत असते. वेळेत लक्ष न दिल्यास याची लागण इतर जनावरांनाही होण्याचा धोका असतो.

हिवाळ्यात होईल दुध उत्पादनात घट, अशी घ्या जनावरांची काळजी
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

मुंबई : हिवाळा जसा म्हशींसाठी अनुकूल आहे त्याच प्रमाणे हिवाळ्यातील थंडीचा परिणाम इतर जनावरांवरही होत असतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी विशेष:ता दुभत्या जनावरांची काळजी घेणे आवश्यक आहे. जनावरांच्या चाऱ्यापासून ते गोठ्याची निघराणी इथपर्यतच्या गोष्टी ह्या महत्वाच्या आहे.

शिवाय थंडीच्या दिवसांमध्ये जनावरांना लाळ्या खुरकूत या संसर्गजन्य रोगाची लागण होत असते. वेळेत लक्ष न दिल्यास याची लागण इतर जनावरांनाही होण्याचा धोका असतो. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जनावरांचे लसीकरण आणि टॅगिंग हे करणे आवश्यक आहे.

शेती या मुख्य व्यवसायाला राज्यात दुधव्यवसायाची जोड आहे. शेतीमध्ये झालेले नुकसान हे दुधाच्या व्यवसयातून शेतकरी भरुन काढतात. पण वातावरणातील बदलाचा परिणाम जनावरांच्या आरोग्यावरही होत असतो. त्यामुळे बारीक बाबींकडे जरी लक्ष दिले नाही तर त्याची किंमत शेतकऱ्यांना मोजावी लागते. त्यामुळे लसीकरणा बरोबरच शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी याची माहिती लातूरचे डॉ. प्रफुल्लकुमार पाटील यांनी दिलेली आहे.

अतिथंडीमुळे होणारे दुष्परिणाम :

– अतिथंडीमुळे जनावरांचे स्नायू हे आखडतात. त्यामुळे जनावरे लंगडतात तसेच त्यांची त्वचा खरबरीत होते.
– थंडीमुळे बऱ्याच वेळा जनावरांचे पोट गच्च होते तर रवंथ प्रक्रिया मंदावते.
– सडावर भेगा पडून दूध काढताना रक्त येते किंवा जनावर दूध काढू देत नाही, अस्वस्थ होते.
– थंडीमध्ये ऊर्जेची गरज वाढते त्यामुळे जनावरांना या काळात चाऱ्याची जास्त गरज असते. चारा कमी पडल्यास जनावर अशक्त दिसते.
– दुधाळ जनावर पान्हा व्यवस्थित सोडत नाही त्यामुळे दूध उत्पादनात घट होऊन दुधाच्या दर्जावरही परिणाम होतो.
– शेळ्यांची करडे आणि म्हशीची वासरं अतिथंडीमुळे गारठून मृत्युमुखी पडतात.
– हिवाळ्यात पाणी कमी पिण्यामुळे जनावरांच्या दूध उत्पादनात घट होते.

ही आहे उपाययोजना :

– हिवाळ्यात उघड्या गोठ्याच्या चारही बाजूने, खिडक्यांना पोत्याचे पडदे तयार करून बांधावेत. हे पडदे रात्रभर किंवा जास्त थंडीमध्ये बंद ठेवावी लागतात. जनावरांना एकदम उघड्या गोठ्यामध्ये ठेवू नये. शिवाय उबदारपणासाठी गोठ्यात जास्त वॅटचे बल्ब लावावेत.

– जनावरांना थंडीच्या काळात दुपारी ऊन असताना धुवावे.
– सकाळचे व सायंकाळचे ऊन येईल अशी गोठ्याची रचना केल्यास जनावरांना ते वातावरण हे पोषक राहणार आहे.

– सडाची त्वचा मऊ राहावी, भेगा पडू नयेत, यासाठी ग्लिसरीनचा वापर करावा. सडाला भेगा पडल्यास तात्काळ उपचार करावेत.
– धार काढताना कास धुण्यासाठी गरम-कोमट पाण्याचा वापर करावा.

– हिवाळ्यातील जास्तीच्या ऊर्जेची गरज भागवण्यासाठी जनावरांना पोषक चारा जास्त प्रमाणात उपलब्ध करून द्यावा. जास्त ऊर्जायुक्त खाद्य पदार्थांचा आहारात वापर करावा. संरक्षित स्निग्ध पदार्थांचा जनावरांच्या आहारात वापर करावा. जेणेकरून जास्तीच्या ऊर्जेची गरज पूर्ण होऊन जनावरातील अपचन टाळता येईल.

– करडांना उबदारपणा मिळण्यासाठी लाकडी डालीखाली गव्हाचे काड, भाताचे तूस पसरवून किंवा पोत्यावर ठेवावे. शेडमध्ये जास्त वॅटचे बल्ब लावावेत किंवा रुम हिटरचा वापर करावा. सायंकाळी शेडमध्ये थंड हवेचा पिलांशी प्रत्यक्ष संपर्क येणार नाही याची काळजी घ्यावी. गायी-म्हशीच्या वासरांनांही ऊबदार ठिकाणी ठेवावे.

– हिवाळ्यात हवामान थंड असल्यामुळे तसेच पाणीही थंड असल्यामुळे जनावर पाणी कमी पिते. जनावरे भरपूर पाणी प्यावेत, यासाठी कोमट पाणी उपलब्ध करून द्यावे. शक्यतो दुपारच्या वेळी जनावरांना उन्हात राहता येईल अशी सोय करावी व दुपारच्या वेळेस पाणी पिण्यास द्यावे.

– बहुवर्षीय चारा पिकांची वाढ अति थंडीमुळे हळूहळू होत असल्यामुळे या काळात लसूणघास, बरसीम किंवा चवळी या हिवाळ्यात वाढणाऱ्या पिकांची लागवड करून चारा उत्पादन घ्यावे. आहारात कडबा किंवा मुरघासाचा वापर करावा.

– गोठ्यातील सांडलेले पाणी, मूत्र निघून जावे यासाठी गोठ्यातील जमिनीला उतार देऊन नाली काढावी व गोठा कोरडा करावा. सकाळी पडदे उघडून हवा खेळती राहील अशी सोय करावी.

लाळ्या खुरकूत साथीचा आजार

हिवाळ्यात या रोगाचा प्रादुर्भाव होण्यास सुरवात होते. मात्र शेतकरी याकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे इतर जनावरांनाही याची लागण होते. शिवाय काळजी घेताना लहान बाबींकडे दुर्लक्ष होत असल्याने या आजाराची तीव्रताही वाढत जाते त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य वेळी लसीकरण आणि योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. (Proper care of animals needs to be taken in winter, otherwise impact on milk production)

संबंधित बातम्या :

शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी : शेतीमालावर मिळतेय 75 टक्के कर्ज

दावे झाले…पंचनामे झाले…नुकसानभरपाई मिळण्याची नेमकी प्रक्रिया काय ?

साखर आयुक्तालयांच्या नियमांचे पालन करा, अन्यथा कारखान्याच्या संचालकावर गुन्हा दाखल