धक्कादायक! आता शेतकऱ्यांच्या गृहलक्ष्मीचीही आत्महत्या, मराठवाडा- विदर्भात शेतकरी महिला आत्महत्या कशा थांबणार?

| Updated on: Oct 08, 2021 | 11:41 AM

औरंगाबादमधील गंगापूर तालुक्यात एका शेतकरी पत्नीने कर्ज, पिकांचे नुकसान आणि भविष्याची चिंता यापायी आत्महत्या केल्याची दुःखद घटना घडली आहे. ताराबाई कल्याण शेळके (40) असे या शेतकरी महिलेचे नाव आहे.

धक्कादायक! आता शेतकऱ्यांच्या गृहलक्ष्मीचीही आत्महत्या, मराठवाडा- विदर्भात शेतकरी महिला आत्महत्या कशा थांबणार?
गंगापूर तालुक्यातील शेतकरी ताराबाई शेळके यांची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
Follow us on

औरंगाबाद: मराठवाडा आणि विदर्भातील शेतकरी आत्महत्येची (Farmer Suicides in Marathwada And Vidarbha) मालिका सुरुच आहे. धक्कादायक म्हणजे शेतकऱ्यापाठोपाठ आता कुटुंबाचा मुख्य आधार मानल्या जाणाऱ्या गृहलक्ष्मीनेही खचून आत्महत्या केल्याचे प्रकार घडत आहेत. औरंगाबादमधील गंगापूर तालुक्यात (Gangapur, Aurangabad) नुकत्याच एका शेतकरी पत्नीने कर्ज, पिकांचे नुकसान आणि भविष्याची चिंता यापायी आत्महत्या केल्याची दुःखद घटना घडली आहे. ताराबाई कल्याण शेळके (40) (Tarabai Shelke) असे या शेतकरी महिलेचे नाव आहे. ताराबाईंच्या आत्महत्येमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या बांधावरील  तणाव घरातही किती खोलवर परिणाम करतोय, हे स्पष्ट दिसतंय.

मुसळधार पावसाने वाहून गेल्या माऊलीच्या आशा..

गंगापूर तालुक्यातील ताराबाई कल्याण शेळके यांचे दोन मुले, मुलगी व पती असे कुटुंब पूर्णतः शेतीवर अवलंबून होते. काही महिन्यांपूर्वी शेळके कुटुंबाने शेतीसाठी कर्ज घेतले होते. त्यात ताराबाई यांच्या मुलीच्या लग्नाचीही चर्चा सुरु होती. पण कुटुंबाच्या डोक्यावर आधीच शेतीसाठी घेतलेल्या कर्जाचं ओझं होतं. सध्या सुरु असलेल्या शेतीतूनही अपेक्षित असं उत्पन्न मिळत नव्हतं. या संकटांना तोंड देत असतानाच पोरा-बाळांचं आयुष्य तरी मार्गी लावावं, असं ताराबाईंना वाटत होतं. त्यासाठी घरातील मुलीच्या लग्नाची चर्चा सुरु होती. याची आशा लागून असतानाच गावात गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून सतत मुसळधार पावसाचा मारा सुरु आहे. त्यामुळे शेळके कुटुंबाच्या शेतीतचे होते-नव्हते ते सर्व पिक नष्ट झाले. त्यामुळे हे कुटुंब पूर्णपणे तणावात होते.

आई खचली.. अन् कुटुंब पोरकं झालं…

कुटुंबात एकावर एक संकट आदळत असल्याने ताराबाई शिंदेंचं कुटुंब तणावात होतं. बुधवारी ताराबाई कुटुंबासह शेतात काम करत होत्या. दुपारी मुलगा घरी गेला. मात्र संध्याकाळपर्यंत आई घरी न आल्याने मुलगा चुलत भावाला घेऊन तिला शोधण्यासाठी शेतात गेला तेव्हा ताराबाई दिसून आल्या नाहीत. अधिक शोध घेतला असता अचानक विहिरीजवळ त्यांना चपला दिसल्या. आत डोकावून पाहिले असता ताराबाई आढळल्या. त्यांना तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. निदान आपल्या मुला-बाळांचे कल्याण होईल, या आशेने धडपडणाऱ्या या माऊलीने अखेर मृत्यूलाच कवटाळले. यामुळे संपूर्ण कुटुंबच पोरकं झालं आहे.

आत्महत्यांसाठी जबाबदार कोण?

या वर्षीच्या मान्सूनमध्ये एकामागून एक अतिवृष्टीचा मारा झाल्यानं मराठवाड्यातील शेतकऱ्यावर मोठं संकट कोसळलं आहे. शेतात-घरात घुसलेल्या पाण्यानं संसार उध्वस्त झालेत. मातीच पाण्यानं वाहून नेल्यानं आता पुढचं बियाणं तरी कसं पेरायचं, हा प्रश्न शेतकऱ्याला सतावत आहे. अवघ्या जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांसमोरील या प्रश्नांची उत्तरं लवकरात लवकर शोधली नाही तर त्यांचं खचलेलं मनोबल वाढवणं आणखी कठीण होईल. एवढे दिवस शेतकरी कुटुंबातील पुरुष शेतकऱ्याच्या आत्महत्येची प्रकरणं समोर येत होती. घरातील कर्त्या पुरुषाने आत्महत्या केल्यावर अनेक कुटुंबातील माऊली पुढे आल्या, त्यांनी संसाराचा गाडा मोठ्या धीरानं पुढे चालवल्याची उदाहरणं आहेत. पण आता शेतीत येणाऱ्या संकटांनी घरातली माऊलीच खचून जात असेल तर याची जबाबदारी शासन घेईल का, असा प्रश्न विचारला जात आहे.

जुलै महिन्यातील अतिवृष्टीसाठी ऑक्टोबरमध्ये मदत

जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीसाठी राज्य शासनाने ऑक्टोबर महिन्यात मदत जाहीर केली आहे. गुरुवारी जाहीर झालेल्या निधीपैकी औरंगाबाद विभागासाठी 78 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच भरपाई पाठवली जाणार असल्याचेही सरकारने सांगितले आहे. मात्र जुलै महिन्यानंतरच्या दोन महिन्यातही अनेक वेळा मराठवाड्याला पावसाने झोडपून काढले आहे. त्यातील नुकसानीची दखल शासनाने घेतली आहे की नाही, विमा कंपन्यांच्या हाती सोपवलेल्या पंचनाम्यांवर शासनाचे नियंत्रण आहे की नाही, ही सर्व प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहेत. त्यामुळे मराठवाड्याच्या ग्रामीण भागाचे चित्र प्रचंड तणावपूर्ण आहे. शेतकऱ्यांसमोरील हे प्रश्न लवकरात लवकर सोडवणे आवश्यक आहेत.

इतर बातम्या- 

जुलैच्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई ऑक्टोबरमध्ये जाहीर, पुणे विभागाला सर्वाधिक मदत

पीक नुकसान तुमचे, जबाबदारीही तुमचीच ; शासनाच्या निर्णयामुळे शेतकरी हवालदिल