तूर खरेदी केंद्र सुरु होत असतानाच व्यापाऱ्यांचा असा ‘हा’ निर्णय, शेतकरीही गेले चक्रावून

| Updated on: Dec 30, 2021 | 2:58 PM

खरीप हंगामातील नवीन तूर बाजारपेठेत दाखल होऊन महिना लोटला आहे. या महिन्याभरात एकदाही तुरीला दिला गेलेल्या हमीभावात व्यापाऱ्यांनी तुरीची खरेदी केली नाही. त्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती ती खरेदी केंद्राची. आता 1 जानेवारीपासून नाफेडच्या वतीने खरेदी केंद्र ही सुरु होत आहेत. आता 2 दिवसांचा आवधी राहिला असताना तुरीच्या दरात व्यापाऱ्यांनी वाढ केली आहे.

तूर खरेदी केंद्र सुरु होत असतानाच व्यापाऱ्यांचा असा हा निर्णय, शेतकरीही गेले चक्रावून
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

लातूर : खरीप हंगामातील नवीन तूर बाजारपेठेत दाखल होऊन महिना लोटला आहे. या महिन्याभरात एकदाही तुरीला दिला गेलेल्या हमीभावात व्यापाऱ्यांनी तुरीची खरेदी केली नाही. त्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती ती खरेदी केंद्राची. आता 1 जानेवारीपासून नाफेडच्या वतीने खरेदी केंद्र ही सुरु होत आहेत. आता 2 दिवसांचा आवधी राहिला असताना तुरीच्या दरात व्यापाऱ्यांनी वाढ केली आहे. गुरुवारी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमीभावापेक्षा अधिक दर मिळाला आहे. अचानक झालेल्या या बदलामुळे शेतकरीही चक्रावून गेले आहेत. तर दुसरीकडे सलग चौथ्या दिवशी सोयाबीनचे दर हे 6 हजार 400 रुपयांवर स्थिरावले आहेत.

आतापर्यंत 6 हजारापर्यंतच दर

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून नवीन तुरीची आवक बाजारपेठेत सुरु झाली होती. हंगामाच्या सुरवातीला तर तुरीला 5 हजार 800 दर मिळत होता. वातावरणातील बदलामुळे पिकांवर झालेला परिणाम किंवा शेंगाच पोसल्या नसल्याचे सांगत दर कमी होत गेले. आता दोन दिवसांपूर्वीच तुरीच्या दरात कमालीची वाढ होत आहे. गुरुवारी तर पांढऱ्या तुरीला 6 हजार 330 रुपये दर मिळाला होता. त्यामुळे खरेदी केंद्र सुरु होण्यापूर्वीची अवस्था आणि आता बदललेले चित्र शेतकऱ्यांसाठी चक्रावून टाकणारेच आहे.

1 जानेवारीपासून 186 खरेदी केंद्र होणार सुरु

केंद्र सरकारने तुरीला 6 हजार 300 रुपये प्रति क्विंटलचा दर ठरवलेला आहे. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून प्रत्यक्षात खरेदी केंद्राला सुरवात झाली नसल्याने शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांशिवाय पर्याय राहिलेला नव्हता. मात्र, आता 1 जानेवारीपासून राज्यात 186 खरेदी केंद्र सुरु होत आहेत. त्यामुळे किमान 6 हजार 300 रुपये तरी तुरीला मिळणार आहेत. सध्या तुरीची खरेदी करण्यासाठी आवश्यक असलेली नोंदणी प्रक्रिया खरेदी केंद्रावर सुरु आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सातबारा, आठ अ, आधारकार्ड, पिक पेऱ्याची नोंद घेऊन नोंदणी करावी लागत आहे. प्रत्यक्षात खरेदी केंद्र सुरु झाल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सोयाबीनची आवक वाढली दर मात्र, स्थिरच

चालू आठवड्याच्या सुरवातीलाच सोयबीनच्या दरात 250 रुपयांची वाढ झाली होती. त्यामुळे सोयाबीनचे दर 6 हजार 400 वर गेले आहे. गेल्या चार दिवसांपासून सोयाबीनचे दर हे स्थिर आहेत. दुसरीकडे आवकही वाढत आहे. शेतकरी आता टप्प्याटप्प्याने सोयाबीनची विक्री करीत आहेत. कारण मध्यंतरी घसरलेले दर आणि अधिकची वाट पाहिली तर पुन्हा उन्हाळी सोयाबीन बाजारात दाखल झाल्यास दरात अणखीन घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संबंधित बातम्या :

ठरलं तर मग : शेतकऱ्यांना मिळाला फरदड कापसाला योग्य पर्याय, आता आंतरपिकातून उत्पादनही वाढणार

Agricultural pump : वीजप्रश्न पेटला, अख्खं गाव बैल-बारदाणा घेऊन महावितरणच्या दारी

अतिवृष्टीची नुकसनभरपाई जमा होताच अवकाळीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे, काय आहे शिवारातील चित्र?