Weather Update: राज्यात पावसाचा मोठा खंड, पिकं करपू लागली, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट

| Updated on: Jul 07, 2021 | 10:30 AM

पावसाचा मोठा खंड पडल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली असल्याचं दिसून येत आहे. पावसाअभावी कापूस, सोयाबीन पिकांच्या दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांवर ओढवण्याची शक्यता आहे.

Weather Update: राज्यात पावसाचा मोठा खंड, पिकं करपू लागली, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

नागपूर : महाराष्ट्रात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल झाला. मात्र, जूनच्या अखेरच्या दिवसानंतर राज्यातील विविध ठिकाणी पावसानं दडी मारली आहे. विदर्भात यंदा मान्सून वेळेआधी दाखल झाला होता. सुरुवातीच्या पावसाच्या जोरावर विदर्भातील शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. मात्र, पावसाचा मोठा खंड पडल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली असल्याचं दिसून येत आहे. पावसाअभावी कापूस, सोयाबीन पिकांच्या दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांवर ओढवण्याची शक्यता आहे. (Weather Update Vidarbha farmers facing problem due to lack of rain during Monsoon Season )

पिकं करपायला लागली

मान्सूनच्या पावसामध्ये विदर्भात मोठा खंड पडला असल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसाअभावी कापूस, सोयाबीन पिकांच्या दुबार पेरणीचं संकट ओढावण्याची शक्यता आहे. पावसाचा 10 ते 15 दिवसांचा खंड पडल्याने पिकं करपायला लागली आहेत. पावसानं दडी मारल्यानं धान रोपांचे पऱ्हे करपल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट

शेतकरी मान्सून दाखल होतो तेव्हा पैशांची तजवीज करुन पेरणी आणि इतर कामं उरकतो. आता मात्र, पावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यांसमोर मोठं आर्थिक संकट उभं राहिलंय. दुबार पेरणीसाठी बियाणं – खतं खरेदीसाठी शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी सरकारनं मदत करावी, अशी मागणी केली आहे.

30 जून पर्यंतचे राज्यातले पावसाचे चित्र

राज्यात मान्सून सक्रिय झाल्यापासून सातारा, कोल्हापूर, मुंबई, जालना, परभणीमध्ये सर्वाथिक पाऊस झाला असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. तर सर्वात कमी पाऊस अकोला, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये झाला आहे. तर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पुणे, सांगली,पालघर, औरंगाबाद, बीड, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा आणि चंद्रपूर मध्ये नियमित सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झालीय. तर, नाशिक, अहमदनगर, बुलडाणा, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली, गडचिरोली, गोंदियामध्ये देखील समाधानकारक पाऊस झाला आहे.

इतर बातम्या :

Weather Report : राज्यातील 6 जिल्ह्यांवर दुष्काळाचं सावट, पावसाने दडी मारल्यामुळे दुबार पेरणीचं संकट

Weather Alert : पुढील 5 दिवसात पाऊस कुठे पडणार? हवामान विभागानं काय सांगितलं, सिंधुदुर्गात पावसाचं कमबॅक

(Weather Update Vidarbha farmers facing problem due to lack of rain during Monsoon Season )