Ethanol In Petrol : पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्यामुळे कारचा मायलेज कमी होतो का, देशाच्या पेट्रोलियम मंत्र्यांनी दिलं असं उत्तर
Ethanol In Petrol : सध्या सरकारने पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचं प्रमाण वाढवलं आहे. या बायोफ्यूलच्या वापरावरुन वाहन चालकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. कारचं इंजिन खराब होतं, मायलेज बिघडतो अशा अनेक तक्रारी आहेत. त्यावर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी उत्तर दिलं आहे.

सरकारने सध्या पेट्रोल मध्ये इथेनॉलचं प्रमाण वाढवलं आहे. या इथेनॉल मिश्रित पेट्रोलवरुन वाहन चालकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजीची भावना आहे. गाडीचं इंजिन खराब होतं, एवरेज कमी मिळतो अशी वेगवेगळी मतं आहेत. आता या पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रणावर पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी एक महत्वाचं स्टेटमेंट केलं आहे. ‘रेसिंग कारमध्ये इथेनॉलचा वापर होते. या बायो फ्यूलमुळे गाडी वेग पकडते’ असा दावा हरदीप सिंह पुरी यांनी केला आहे. बायोफ्लूयचा जो इंधनामध्ये वापर होतोय, त्याचं हरदीप सिंग पुरी यांनी समर्थन केलं. मध्य पूर्वेतील तणावामुळे पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले होते. त्यामुळे सरकारने बायोफ्यूलवर जास्त भर दिला आहे. इथेनॉल मिश्रित पेट्रोलचं प्रमाण वाढवलं आहे.
“काही जण म्हणतायत की फ्यूल मायलेज कमी होणार आहे. पण आता हे सिद्ध झालय की, इथेनॉलचा रेसिंग कारमध्ये सुद्धा वापर होतो. त्यामुळे वेग वाढतो. काय म्हणतात, त्याला नॉकिंग, नॉकिंग सुद्धा वाढतं. हो, मायलेज थोडं कमी होत असेल पण त्यामागे अन्य कारणं सुद्धा आहेत” असं हरदीप सिंग पुरी म्हणाले. “SIAM आणि ARAI अशा सर्व स्टोक होल्डर्सशी बोलल्यानंतर आम्ही या टप्प्यावर पोहोचलो आहोत. कोणी असं म्हणत होतं की, तुमचा इन्श्यूसरन्स कव्हर होणार नाही. पण विमा कंपन्यांनी हे सुद्धा स्पष्ट केलय की, असा कुठलाही मुद्दा येणार नाही. अशा चुकीच्या गोष्टी पसरवून कोणाचा फायदा होणार आहे?” असा प्रश्नही हरदीप सिंग पुरी यांनी विचारला.
इथेनॉलच प्रमाण 20 वरुन 25 टक्के कधी होणार?
“मी कुठलेही आरोप करणार नाही. पण एक गोष्ट स्पष्ट आहे. भारतातील वाढत्या ग्राहक बाजारपेठेत सर्व टेक्नोलॉजीना सामावून घेण्यासाठी पुरेशी संधी आहे. इथे इलेक्ट्रिक वाहनं, बायोफ्यूलवर चालणारी वाहनं आणि सध्या 20 टक्के इथनॉल मिश्रणावर चालणारी वाहन चालू शकतात” असं हरदीप सिंह पुरी म्हणाले. “सर्व आवश्यक चाचण्यांचे निकष पूर्ण झाल्यानंतरच आम्ही 20 वरुन 25 टक्क्यांवर जाऊ” असं पुरी म्हणाले. हायब्रिड आणि CNG गाड्यांसाठी सुद्धा भारतीय बाजारपेठेत संधी असल्याचं पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी म्हणाले.