Uddhav Thackrey : उद्धव ठाकरेनी थेट भाजपला घेतलं अंगावर, हिंदू माफ नही करेगा..; इशारा देत राज्यभर…
उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतील फुटीनंतर हिंदुत्वाचा आक्रमक पवित्रा घेतला आहे. राम मंदिरात कथित अपहार झाल्याच्या मुद्द्यावर त्यांनी भाजपला घेरण्यासाठी 'राम रक्षा आंदोलना'ची घोषणा केली आहे. "आता हिंदू माफ करणार नाही," अशी गर्जना करत, ५ जुलै रोजी दादर येथे या आंदोलनाची सुरुवात होईल. यातून भाजपच्या हिंदुत्वावरील विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न आहे.

आधी शिवसेना ठाकरे गटातील 6 खासदार फुटले, शिंदेसेनेत गेले. मग सर्वात जवळचे, विश्वासू असे मानले जाणार सचिन अहिर यांनीही उद्धव ठाकरे यांना राम-राम करत शिवसेना शिंदे गटाची वाट धरली. गेल्या महिन्याभरापासून फुटीचे अनेक धक्के खाणाऱ्या ठाकरे गटात यामुळे प्रचंड खळबळ माजलेली असतानाच आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी हिंदुत्वाची वाट पुन्हा निवडली असून राम मंदिरात झालेल्या कथित अपहार प्रकरणावरून ते आवाज उठवणारा आहेत. याचाच भाग म्हणून त्यांनी राम रक्षा आंदोलनाची घोषणा केली आहे. 90च्या काळात वाजपेयी म्हणाले होते की अब हिंदू मार नही खायेगा , तसं आता मी म्हणतोय की, अब हिंदू माफ नही करेगा. अशी डरकाळी फोडत त्यांनी सर्वांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले.
रविवारी 5 जुलै रोजी संध्याकाळी दादरच्या हनुमान मंदिराजवळ या आंदोलनाची सुरूवात होणार असून ज्यांनी हिंदुत्व सोडलं नाही, ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले नाही, त्यांनी यावं, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी आवाहन केले. त्यांचा हा आक्रमक पवित्रा चर्चेचा विष्य ठरला असून यामुळे भाजपच्या गोटातही खळबळ माजण्याची चिन्हे आहेत.
रविवारी संध्याकाळी ५ वाजता दादर कबुतरखान्याजवळ राम मंदिर आहे. तिथे तमाम हिंदूंना, ज्यांना ज्यांना वाटतं भाजपच्या कालखंडात हिंदुत्व धोक्यात आलं म्हणून मोर्चे काढले त्यांना, मी आमंत्रण देतो. रामभक्त आणि हिंदूंनी यावं. ज्यांना मंदिरातील चोरी सहन होत नाही त्यांनी यावं, असं म्हणत राम मंदिरातील दानाच्या अपहराचा पुन्हा उल्लेख करत, उद्धव ठाकरेंनी पुन्हा भाजपावर निशाणा साधला.
हिंदुत्वाच्या नावाने होणारी लूट सहन केली जाणार नाही
आम्ही राम रक्षा आंदोलन करत आहोत, असं उद्धव ठाकरे म्हणाले. पूर्वी महाआरती करत होतो, हिंदूंना जागं करण्यासाठी. आता हिंदू जागे झाले आहेत, हिंदू आता जाब विचारतील. जाब विचारण्यासाठी राम रक्षा म्हणू, हनुमान चालिसा आणि हनुमान स्तोत्रही म्हणू, असं त्यांनी नमूद केलं. रविवारी होणारा कार्यक्रम ही फक्त सुरूवात आहे, त्यानंतर प्रत्येक ठिकाणी, राज्यभर, जिल्हा पातळीवर शहरात आणि खेड्यात राम मंदिर आणि हनुमान मंदिर असेल तिथे राम भक्त आंदोलन करतील. वारी सुरू होतेय. वारकरीही एकत्र येऊन भाजपला उत्तरदायित्व स्वीकारायला लावल्याशिवाय राहणार नाही. मी सर्व हिंदू आणि राम भक्तांना आमंत्रत करत आहोत. हिंदुत्वाच्या नावाने होणारी लूट सहन केली जाणार नाही, असा थेट इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
