
Budget 2026: देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला आणि शिक्षणाकडे विशेष लक्ष दिलं आहे. शिक्षण क्षेत्राला बळकटी देण्यासाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहे. विशेषतः आयुर्वेद, फार्मा, डिझाईन, तांत्रिक शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या सुविधांवर सरकारने विशेष लक्ष दिलं आहे. बजेट 2026 मध्ये हे स्पष्ट दिसत आहे की, येणाऱ्या काही वर्षात शिक्षणाला रोजगार आणि विकासाशी जोडण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांत शिक्षणात मोठे बदल दिसून येणार आहेत.
आयुर्वेद शिक्षणाला चालना देण्यासाठी अर्थसंकल्पात एक मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे. सरकारने देशभरात तीन नवीन आयुर्वेद संस्था स्थापन करण्याची घोषणा केली आहे. औषधांची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी ड्रग टेस्टिंग लॅब्स देखील सुधारल्या जातील. आयुर्वेद ही केवळ भारताची पारंपारिक औषध प्रणाली नाही तर, ती नवीन रोजगार आणि संशोधनाच्या संधी देखील निर्माण करू शकते… असा सरकारचा मानस आहे.
याव्यतिरिक्त, तीन नवीन आयुर्वेद महाविद्यालये उघडण्याची घोषणा निर्मला सीतारामण यांच्याकडून करण्यात आली आहे. यामुळे आयुर्वेदाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध होतील आणि या क्षेत्रातील प्रशिक्षित डॉक्टरांची संख्या वाढेल.
2026 च्या अर्थसंकल्पातील एक प्रमुख घोषणा म्हणजे देशभरातील पाच विद्यापीठ टाउनशिपचा विकास… या टाउनशिपमध्ये शिक्षण, संशोधन, वसतिगृहे, क्रीडा आणि स्टार्टअप्ससाठी एकच ठिकाणी अनेक सुविधा उपलब्ध केल्या जातील. विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना, नवीन विचार आणि नवीनतेवर देखील कमा करु शकतील असं वातावरण देण्यात येणार आहे. एवढंच नाही तर, पाच नवीन विद्यापीठे उघडण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे उच्च शिक्षणाची सुविधा सुलभ होईल आणि विविध राज्यांमध्ये शिक्षणाच्या नवीन संधी उपलब्ध होतील.
सरकारने फार्मा सेक्टरला बजेटमध्ये खास जागा दिली आहे. बजेटच्या नुसार, 3 नवीन फार्मास्युटिकल शिक्षण संस्था सुरु करण्यात येणार आहेत. या संस्थांमध्ये औषध निर्मिता, संशोधन आणि गुणवत्ता यावर खास लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. यामध्ये भारताला फार्मा सेक्टरमध्ये बळकटी देण्यास मोठी मदत होणार आहे.
डिझाईन आणि रचनात्मक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने पूर्व भारतात एक नवीन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन, IIT नाही तर IIND उघडण्याची घोषणा केली आहे. यामुळे या प्रदेशातील विद्यार्थ्यांना देशाच्या इतर भागात जाण्याची गरज भासणार नाही आणि त्यांना स्थानिक पातळीवर चांगलं शिक्षण मिळेल.
डिजिटल आणि क्रिएटिव्ह स्किल्स वाढवण्यासाठी सरकारने ABGC कंटेंट क्रिएटर लॅब सुरु करण्याची योजना आखली आहे. या योजने अंतर्गत IIT मुंबईच्या मदतीने देशाच्या 15 हजार माध्यमिक शाळा आणि 500 कॉलेजमध्ये कंटेंट क्रिएटर लॅबची सुरुवात होणार आहे. या लॅममध्ये, विद्यार्थ्यांना डिजिटल कंटेंट, गेमिंग, अॅनिमेशन आणि नवीन तंत्रज्ञानाशी संबंधित कौशल्ये शिकता येतील. उच्च शिक्षण संस्थांसाठी प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी वसतिगृहे बांधण्याची घोषणा देखील अर्थमंत्र्यांनी केली.